लावणीसम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर कालवश 
लावणीसम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर (वय १०३) यांचे वाई येथे १५ मे रोजी निधन झाले. कृष्णाकाठच्या या कलासाधिकेने सारं आयुष्य कलेसाठीच अर्पण केलं.


३१ डिसेंबर १९१५ रोजी यमुनाबाई वाईकर यांचा जन्म वाई (जि. सातारा) येथील कोल्हाटी समाजात झाला. आयुष्याच्या मार्गातील अनेक खडतर प्रसंगाना सामोरे जात त्यांनी स्वतःच्या कलेने, लावणीस सम्राज्ञीपदावर पोहचवले. कलेबरोबरच गावाला, समाजाला आणि याच वाटेने चालणाऱ्या असंख्य कलाकारांना आनंदाचे वाटेकरी केले.

तसेच यमुनाबाईंनी कोल्हाटी-डोंबारी समाजास केंद्रशासनाच्या दप्तरी अत्यंत गौरवाचे स्थान मिळवून दिले. महाराची पोर नाटक बघावयास साने गुरुजी आले होते. या प्रयोगाचे सर्व उत्पन्न यमुनाबाईंनी गुरुजींच्या समाजकार्याला दिले. 

त्यांच्या या तमाशाफडात दडलेले नाट्य आणि संगीत गावोगावच्या रसिकांना अनुभवायला मिळाले आहे. त्यांच्या निधनाने पारंपारिक लावणी जपणाऱ्या कलावंतास देश मुकला आहे.



निवृत्तिवेतनासाठी आधारची सक्ती नाही 
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन मिळण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य नाही, असे कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

स्वयंसेवी संस्थांच्या तिसाव्या बैठकीत त्यांनी सांगितले, की बँकेस भेट न देता जिवंत असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी एक अतिरिक्त सुविधा म्हणून आधारचा वापर केला जावा अशी अपेक्षा आहे, पण आधार कार्ड अनिवार्य नाही.

बँक खात्याला आधार जोडलेले नसल्यामुळे अनेक वृद्धांना निवृत्तिवेतन मिळत नाही अशी तक्रार असून, या बाबत आता मंत्र्यांनीच खुलासा केल्याने संभ्रम दूर झाला आहे. 

सिंह यांनी सांगितले, की सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतनासाठी आधार कार्डची सक्ती केलेली नाही. केंद्र सरकारचे ४८.४१ लाख कर्मचारी असून ६१.१७ लाख निवृत्तिवेतनधारक आहेत. 

किमान निवृत्तिवेतन मर्यादा आता ९००० रुपये करण्यात आली आहे, तर अंशदान हे २० लाखांपर्यंत ठेवले आहे. वैद्यकीय भत्ता महिना १००० रुपये आहे अशी माहिती त्यांनी दिली. सातत्यपूर्ण उपस्थिती भत्ता ४५०० रुपयांवरून ६७५० रुपये करण्यात आला आहे.



दुबराज तांदूळाचे उत्परिवर्तीत वाण BARC द्वारा विकसित 
भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC) ने दुबराज तांदूळाचे एक उत्परिवर्तीत (mutant) वाण विकसित केले आहे. हे कमी उंचीची वाढ असणारे आणि अधिक उत्पादन देणारे वाण आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते आपत्ती व्यवस्थापनासंबंधी एकात्मिक केंद्राचे उदघाटन करण्यात आले आहे, जे राष्ट्राला रासायनिक, जैविक, किरणोत्सर्गी आणि आण्विक आणीबाणी प्रसंगी अधिक प्रभावीपणे प्रतिसाद देण्यास मदत करेल. 

वीन सुविधेमुळे संपूर्ण देशभरात ५०४ विकिरण संवेदकांच्या (सेंसर) जाळ्यामधून किरणोत्सर्गी माहिती गोळा केली जाणार.

भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC) याची ३ जानेवारी १९५४ रोजी स्थापना करण्यात आली. ही भारतातली प्रमुख अणुसंशोधन सुविधा आहे. याचे मुख्यालय मुंबई (महाराष्ट्र) येथे आहे. याचे संस्थापक डॉ. होमी जे. भाभा हे आहेत.


आयसीसी अध्यक्षपदी पुन्हा शशांक मनोहर यांची निवड 
आयसीसीच्या अध्यक्षपदी भारताच्या शशांक मनोहर यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. १५ मे रोजी झालेल्या बैठकीत यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे.

२०१६ साली शशांक यांची अध्यक्षपदावर बिनविरोध निवड करण्यात आली होती, यानंतर अध्यक्षपदाची मनोहर यांची ही दुसरी टर्म असणार आहे.



‘मॅक्स थंडर’: अमेरिका-दक्षिण कोरिया संयुक्त युद्धाभ्यास 
अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांचा ‘मॅक्स थंडर’ नावाचा नियमित संयुक्त युद्धाभ्यास ११ मे २०१८ पासून १५ दिवसांसाठी सियोल (दक्षिण कोरिया) शहराबाहेर असलेल्या हवाई दलाच्या तळावर चाललेला आहे.

अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांनी दोन्ही राष्ट्रांच्या हवाई दलांमध्ये चांगल्या प्रकारे समन्वय साधण्याच्या उद्देशाने २००९ सालापासून ‘मॅक्स थंडर’ नावाखाली नियमित संयुक्त युद्धाभ्यास आयोजित करण्यास सुरुवात केली. यावर्षीचा हा २५वा सराव आहे



नदीचे व्यवस्थापन आणि धरणांचे बांधकाम यासाठी नेपाळला भारताकडून अनुदान 
नदीचे व्यवस्थापन आणि धरणांचे बांधकाम करण्यासाठी नेपाळला भारताकडून १८.०७ कोटी नेपाळी रुपयांचे (NRs) अनुदान प्राप्त झाले आहे.

हा निधी नेपाळमधील लालबकेया, बागमती आणि कमला या नदींचे व्यवस्थापन करण्यासाठी खर्च केला जाईल. तसेच धरण निर्मिती, संबंधित प्रशिक्षण, पूर नियंत्रण याबाबतही हा निधी खर्च केला जाईल. 

या बाबतीत भारत सरकारने नेपाळला २००८ पासून आतापर्यंत १३ हप्त्यांमध्ये एकूण ४६८ कोटी नेपाळी रुपये दिले आहेत.



झिया बॉयू (चीन) दोन्ही कृत्रिम पाय असून एव्हरेस्ट सर करणारा पहिला व्यक्ती 
झिया बॉयू नावाचा चीनी व्यक्ती दोन्ही कृत्रिम पाय असूनही ८८४८ मीटर उंच एव्हरेस्ट शिखर सर करणारा जगातला पहिला व्यक्ती बनला आहे. त्यांना आपल्या पाचव्या प्रयत्नात हे यश मिळाले.

४३ वर्षापूर्वी एव्हरेस्टवर चढाई करताना एका अपघातात दोन्ही पायाचे पंजे गमावल्यानंतर आणि त्यानंतर कर्करोगामुळे दोन्ही पाय गमावल्यानंतर ६९ वर्षीय या चीनी पर्वतारोहीने कृत्रिम पाय बसवून घेतले.