भारतातील फ्रेंच सत्ता

भारतातील फ्रेंच सत्तेचा कालखंड १६६४ ते १९५४ आहे. भारतात व्यापाराच्या निमित्ताने डच , पोर्तुगीज , ब्रिटिश इ . यूरोपीय लोकांनी सोळाव्या शतकापासून प्रवेश करण्यास सुरुवात केली .

व्यापारा बरोबरच भारतात सत्तासंपादन करण्याचीही स्पर्धा या यूरोपीयांत सुरू झाली.

* पहिला कालखंड (१६६४ ते १७४२)

०१. भारताशी व्यापार करावयाच्या स्पर्धेत उतरलेल्या प्रमुख यूरोपीय सत्तांपैकी फ्रेंच शेवटचे होते.

चौदाव्या शतकात जॉर्देनस, फ्रायर ओडोरिक यांसारख्या धर्मोपदेशकांनी व सतराव्या शतकात फ्रान्स्वा बर्निअर व थेवेनॉट यांसारख्या प्रवाशांनी फ्रान्समध्ये भारताविषयी बरीच उत्सुकता निर्माण केली होती.

०२. भारतात येऊन गेलेल्या या प्रवाशांनी व धर्मोपदेशकांनी, विशेषतः सुरतला आलेल्या काप्युशँ मिशनऱ्यांनी पूर्वेकडे व्यापार करू इच्छिणाऱ्यांचे काम सुलभ केले.
०३. फ्रान्सचा राजा चौथा हेनरीच्या उत्तेजनाने पूर्वेकडे, विशेषतः भारताशी व्यापार करणाऱ्या कंपन्या स्थापन झाल्या (१६०१, १६०४ व १६४२ इ.) परंतु चौदाव्या लूई चा अर्थमंत्री झां बातीस्त कॉलबेअर याच्या पुढाकाराने १६६४ साली स्थापन झालेल्या ‘काँपान्यी देस इंडिज’च्या स्थापनेपासून फ्रेंचांचा भारताशी पद्धतशीर व्यापार सुरू झाला. 
०४. बॅबॅर व लाबुलॉय ला गूझ या फ्रान्सच्या राजदूतांनी औरंगजेबाकडून १६६६ मध्ये सुरतेला वखार घालण्याची परवानगी मिळविली. दोन वर्षांनी वखार सुरू झाली.
-शिवाजींनी १६६८ मध्ये राजापूरला वखार घालायची परवानगी दिली. त्यानंतर १६६९ मध्ये मछलीपट्टनम्‌लाही फ्रेंच वखार सुरू झाली.
०५. नौदलाचे सामर्थ्य एतद्देशीयांना दाखवून व्यापार वाढवावा, अशा उद्देशाने द लाहेच्या नेतृत्वाखाली १६७१ साली एक नाविक दल भारतात आले.
त्याच्या जोरावर फ्रेंचांनी सँ थॉम ही मद्रासजवळील (मैलापूर) व्यापारपेठ गोवळकोंड्याकडून जिंकून घेतली. पण ती त्यांना फार काळ ताब्यात ठेवता आली नाही.
०६. तेव्हा फ्रेंच अधिकारी फ्रान्स्वा मारतँ याने दूरदर्शीपणे पाँडीचेरी ठाणे मिळवले (१६७३- ७४). त्याच्या कर्तृत्वाने शहर वाढले आणि काही वर्षांनी सुरत मागे पडून पाँडिचेरी हीच फ्रेंचांची भारतातील राजधानी झाली.
-याखेरीज बंगालमध्ये चंद्रनगर, पाटणा, कासीमबझार, डाक्का, जगदिया व ओरीसातील बालेश्वर (बलसोर) येथेही फ्रेंचांनी वखारी घातल्या.
०७. सुरु वातीच्या काळात डच व इंग्रजांच्या कारवाया आणि भारतीय राजेरजवाड्यांच्या लढाया यांमुळे फ्रेंच वसाहतींना बराच उपद्रव झाला.
-तरीही फ्रान्स्वा काराँ (१६६८-१६७३), फ्रान्स्वा बाराँ व मारतँ या कर्तबगार अधिकाऱ्यांनी फ्रेंचांचे व्यापारी व राजकीय महत्त्वही वाढीला लावले.
०८. मारतँने मराठ्यांकडून पाँडिचेरीच्या तटबंदीची व करवसुलीची राजपत्रे मिळवली. लहान प्रमाणावर फौजाही ठेवायला सुरुवात केली.
-तरीही प्रथमतः व्यापाराचे संरक्षण व त्यापासून होणारे आर्थिक लाभ फ्रेंच धोरणाचे प्रमुख सूत्र होते.
०९. १६८३ साली कॉलबेअरच्या मृत्यूनंतर, अंतर्गत व्यापाराला संरक्षण म्हणून भारतीय कापडाच्या आयातीला फ्रान्समध्ये घातलेली बंदी आणि जबरदस्त सरकारी नियंत्रण यांमुळे हा व्यापार कंपनीला फारसा फलदायी झाला नाही.
१०. झां लॉने कंपनीच्या अर्थरचनेची १७१९ मध्ये पुनर्घटना केली, तरीही काही वर्षातच कंपनीचे दिवाळे वाजण्याची वेळ आली. त्यामुळे १७२३ मध्ये फ्रेंच सरकारने ;काँपान्यी देस’ या नावाखाली तिची पुनर्रचना केली.
११. त्यात सरकारी नियंत्रणे आणखी कडक झाली. कंपनीच्या संचालकांना अधिकार उरले नाहीत. तथापि १७२५-४० या काळात कंपनीने बराच फायदा मिळविला.
लबार किनाऱ्यावर माहे (१७२१) व मद्रास किनाऱ्यावर यानम (१७२३ ) येथे वसाहती प्रस्थापित झाल्या. 
१२. बन्वा द्यूमा पाँडिचेरीचा गव्हर्नर झाला. त्याच्या कारकीर्दीत (१७३५ – ४२) फ्रेंच सत्तेची भरभराट झाली. त्याने पाँडीचेरीला नाणी पाडण्याचा मिळविलेला परवाना फ्रेंच व्यापाराला किफायतशीर ठरला.
१३. अर्काटचा नवाब दोस्त अलीच्या मृत्यूनंतर माजलेल्या वारसांच्या भांडणात त्याने दोस्त अलीचे कुटुंब, सफदर अली, चंदासाहेब या सर्वांना पाँडिचेरीत आश्रय दिला आणि १७३९ साली चंदासाहेबांच्या मदतीने तंजावर राज्यातील कारिकलचा प्रदेश मिळविला.
पाँडिचेरीवर चालून आलेल्या रघुजी भोसल्याला वश करून घेतले . याबाबत रघुजीने केलेला पराक्रम फ्रेंचांनी दिलेल्या उंची दारूने निष्फळ ठरविला, अशा अर्थाचे उद्‌गार पुढे छत्रपती शाहूने काढले.

* दुसरा कालखंड (१७४२ – ६३)

०१. भारतीय फ्रेंच वसाहतीचा गव्हर्नर जनरल म्हणून १७४२ मध्ये जोझेफ फ्रान्सीस डूप्ले आला. त्याने फ्रेंच धोरणाला नवी दिशा दिली. भारतात यूरोपीय वसाहतवाद आणण्याचे श्रेय त्याचे.
त्यासाठी बन्वा द्यूमाच्या मनसबदारीचा डूप्लेने गाजावाजा केला आणि कर्नाटकच्या गादीसाठी चाललेल्या कलहात प्रामुख्याने भाग घेऊन फ्रेंचांचे महत्त्व वाढवायला सुरु वात केली.
०२.यानंतर पुढील काळात इंग्रज व फ्रेंच यांच्यात युद्ध झाले. शेवटी फ्रेंचांचा पराभव झाला व इंग्रजांचे भारतावर वर्चस्व प्रस्थापित झाले. 

* तिसरा कालखंड (१७६३ – ८५)

०१. पॅरिसच्या तहाने (१७६३) युद्ध संपले आणि फ्रेंचांना त्यांच्या वसाहती परत मिळाल्या. तरी पुढे फ्रेंच भारतीय सत्तेला जी उतरती कळा लागली ती अखेरपर्यंत. बंगाल इंग्रजांच्या पूर्ण कब्जात गेला.
इतरत्रही इंग्रजांचे वर्चस्व वाढले. हैदराबादच्या सलाबत जंगने इंग्रजांशी सलोखा केला होता.
०२. पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर मराठेही पुन्हा सावरले गेले होते. या वेगवेगळ्या सत्तांशी संधान साधून इंग्रजांना पायबंद घालायचा असे प्रयत्न अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात फ्रेंचांनी चालू ठेवले.
-त्यांच्या कारस्थानापासून इंग्रजांनीही सावधगिरी बाळगली.
०३. फ्रेंच कंपनीचे मात्र दिवस भरले होते. १७६९ मध्ये फ्रेंच सरकारने कंपनी बरखास्त करून सर्व फ्रेंच भारतीय वसाहती आपल्या प्रत्यक्ष अंमलाखाली घेतल्या.
पण पंधराव्या लूईने त्यांच्या पुनरूज्जीवनाकडे लक्ष दिले नाही . त्यामुळे पाँडिचेरीचे गव्हर्नर लॉ द लॉरिस्ताँ (१७६५ – ७६) आणि बेलकाँब ( १७७७ – ७८) यांच्या इंग्रजांना शह देण्याच्या योजना कागदावरच राहिल्या.
०४. चंद्रनगरचा गव्हर्नर झां बातीस्त शव्हाल्ये (१७६५ – ७६) याने मोगल बादशाह शाह आलमच्या साह्याने सिंध प्रांतात फ्रेंच बस्तान बसवायचा घाट घतला. त्याचीही तीच गत झाली.
०५. १७७६ साली अमेरिकन स्वातंत्र्यानिमित्त इंग्लंड-फ्रान्स युद्ध सुरू झाले. तेव्हा मात्र फ्रेंच सरकारने युद्धातील डावपेच म्हणून मराठ्यांशी मैत्री करण्यासाठी सँल्यूबँ आणि नंतर माँतिन्यी यांना पुण्याला पाठविले .
द स्युफ्राँ या पराक्रमी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली हिंदी महासागरात नाविक दल आणले . त्याने पाच लढायांत इंग्रज आरमाराला नामोहरम केले .
बुसीला सर्वाधिकार देऊन सैन्य पाठवायचे ठरले. पण त्याला इतका उशीर झाला की, तोपर्यंत १८८३ साली इंग्लंडने फ्रान्सशी तह केला होता.
०६. इंग्रजांविरुद्ध लढाईत गुंतलेल्या हैदर-टिपूला किंवा मराठ्यांना फ्रेंचांचा उपयोग झाला नाही. इंग्रजांनी जिंकलेल्या फ्रेंच भारतीय वसाहती तहाने पुन्हा एकदा फ्रेंचांना परत मिळाल्या.
यानंतर मात्र फ्रेंच सत्तेच्या पुनरुज्जीवनाची आशा संपली. १७८५ मध्ये बुसीही मरण पावला. फ्रेंच सत्तेच्या उत्कर्षात आणि इतिहासात डूप्लेच्या खालोखाल बुसीच्या मुत्सेद्देगिरीला व शौर्याला महत्त्व आहे.

* चौथा कालखंड (१७८५ – १८०२)

०१. या काळात मराठे व विशेषतः टिपू यांच्याशी संबंध वाढविण्याचे प्रयत्न फ्रेंचांनी केले. परंतु फ्रेंच सरकार ने मुख्य लक्ष व्यापाराकडे दिले.
-बंगालातील इंग्रजांशी याबाबत नेहमी कटकटी होत. त्या दूर करण्यासाठी १७८७ मध्ये इंग्लंडशी करारनामा केला.
०२. शार्ल कालॉन या कंट्रोलर-जनरलच्या पुढाकाराने एक नवी कंपनी १७८५ मध्ये स्थापन झाली. तिने चार वर्षांत चांगली प्रगतीही केली.
-पण १७८९ मध्ये फ्रेंच राज्यक्रांती झाल्याने सगळी परिस्थितीच पालटली. क्रांतीचे पडसाद फ्रेंच भारतीय वसाहतींतही उठले. त्यांत एतद्देशीयांचा काही संबंध नव्हता.
०३. फ्रेंच राज्यक्रांतीतूनच यूरोपात १७९३ मध्ये युद्ध उद्‌भवले. तेव्हा इग्रंजानी पुनश्च भारतीय फ्रेंच वसाहती ताब्यात घेतल्या.
या युद्धात ऑइल ऑफ फ्रान्स (मॉरिशस) आणि बूँ र्बा (रेयून्याँ) या हिंदी महासागरातील बेटांच्या तळावरून फ्रेंचांनी बरीच चाचेगिरी केली आणि इंग्रज व्यापाराला चांगलेच अडथळे आणले.
यांखेरीज म्हैसूरशी असलेली फ्रेंचांची मैत्री ही सुद्धा इंग्रजांना डोकेदुखी झालीच.

* अखेरचा कालखंड (१८०२ – १९५४)

०१. भारतावर फ्रेंच अंमल बसविण्याचा अखेरचा प्रयत्न नेपोलियनने केला. १८०२ मध्ये आमेन्यच्या तहान्वये फ्रेंच भारतीय वसाहती फ्रान्सला परत मिळायचे ठरले.
-त्या ताब्यात घेण्यासाठी शार्ल मात्य इझिदॉर दकाँच्या नेतृत्वाखाली नेपोलियनने सैन्य व जहाजे पाठविली. त्याचा हेतू भारतीय सत्तांशी गुप्त संधान साधण्याचा होता.
०२. पण युरोपात पुन्हा युद्धाचा रंग दिसू लागल्याने इग्रंजांनी पाँडिचेरीला खडा पहारा ठेवला. दकाँ ला रातोरात मॉरिशसला परतावे लागले. तेथूनच त्याने ब्रिटिश आरमाराला सतावण्याचे अयशस्वी प्रयत्न केले.
०३. १८०७-०८ मध्ये नेपोलियनने पुनश्च भारतावर मोहीम करण्याच्या योजना आखल्या. त्याला शह म्हणून इंग्रजांनी लाहोर, काबूल, तेहरान येथे वकिलाती पाठविल्या. खुद्द नेपोलियन यूरोपात युद्धात गुंतून राहिल्याने तो संकल्प तसाच राहिला.
०४. अखेर १८१० मध्ये इंग्रजांनी मॉरिशस व रेयून्याँ हे फ्रेंच तळही ताब्यात घेतले. १८१५ मध्ये तह झाला. त्यानुसार १८१६-१७ मध्ये पाँडिचेरी, चंद्रनगर, माहे, कारिकल व यानम वसाहती फ्रान्सला परत मिळाल्या.
अशा प्रकारे फ्रेंचांनी भारत स्वतंत्र होईपर्यत इंग्रजांचे भारतातील स्वामित्व मान्य केले.
०५. १९५४ मध्ये या वसाहती फ्रान्सने भारताच्या ताब्यात दिल्या. १९५६ मध्ये त्यांच्या विलीनीकरणाबाबत भारत-फ्रान्स तह झाला. तो १९६२ मध्ये पक्का झाला व भारतातील फ्रेंच सत्ता संपुष्टात आली.

* फ्रेंच-म्हैसूर संबंध

०१. हैदरच्या काळापासूनच फ्रेंचांचे म्हैसूरशी स्नेहसंबंध प्रस्थापित झाले होते. हैदरने प्रथम ह्यूज्यॅल व नंतर ऱ्युसॅल यांची फ्रेंच घोडदळाची छोटी पथके बाळगली होती.
१७८० मध्ये इंग्रजांशी युद्ध सुरू झाल्याबरोबर त्याने मॉरिशसचा गव्हर्नर सुयाककडून मदत मागविली.
त्याने पाठविलेला दॉर्व्ह हा अधिकारी तसाच परतला, तेव्हा द्युशमे याला पाठविले. द्युशमेने हैदरशी औपचारिक तहाचा आग्रह धरला. हैदर त्याला कबूल नसल्याने दोघांनाही परस्पर साह्य झाले नाही.
०२. द स्युफ्राँच्या नाविक शौर्याबद्दल मात्र हैदरला कौतुक वाटले आणि त्याने पकडलेले इंग्रज युद्धकैदी द स्युफ्राँच्या हवाली केले. हैदरच्या मृत्यूनंतर १७८२ साली टिपू गादीवर आला.
त्याने १७८४ साली इंग्रजांशी मंगलोरचा तह केला. त्या वाटाघाटीत बुसीला भाग घेऊ दिला नाही.
०३. पण १७८६ नंतर मात्र त्याने फ्रेंच मैत्रीवर विशेष जोर दिला. फ्रान्सच्या सोळाव्या लूईला पत्रे, नजराणे पाठविले. १७८७-८८ मध्ये फ्रान्सला वकीलही पाठवले आणि फ्रेंचांनीही राजनैतिक संबंध वाढविले.
पण तटस्थतेच्या धोरणामुळे टिपूचे इंग्रज-निजाम-मराठे यांच्या संयुक्त सत्तांशी १७९० मध्ये युद्ध सुरू झाले. त्यात फ्रेंचांनी कोणासच मदत केली नाही. साहजिकच १७९३ मधील इंग्रज – फ्रेंच युद्धात टिपूही स्वस्थच राहीला.
०४. क्रांतीनंतर फ्रान्सच्या बदललेल्या परिस्थितीची टिपूला काहीच कल्पना नव्हती. १७९७ मध्ये रिपो या फ्रेंच धाडशी चाच्याच्या सल्याने पुन्हा एकवार वकीलात पाठविली, ती निष्फळ ठरली.
१७९९ साली श्रीरंगपटणच्या लढाईत टिपू मारला गेला. या मैत्रीचा फ्रेंचांना प्रत्यक्षात उपयोग झाला नाहीच, उलट मराठे व निजाम यांच्या मनात फ्रेंचां विषयी अविश्वास निर्माण करण्यास ती कारणीभूत ठरली.

* फ्रेंच साहसी अधिकारी

०१. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात बळावत चाललेल्या इंग्रजी सत्तेला आणखी एक भय होते, ते निरनिराळ्या भारतीय संस्थानिकांच्या पदरी नशीब काढायला आलेल्या फ्रेंच सैनिकी अधिकाऱ्यांच्या कारवायांचे.

०२. १७६३ च्या तहानुसार फ्रेंचांना आपले सैन्य एकदम कमी करावे लागले. नोकरीतून निघालेले अनेक अधिकारी भारतीय राजेरजवाड्यांकडे आपल्या जवळच्या कवायती पलटणी आणि तोफखाना घेऊन नोकरीला राहिले.
०३. रनेमादॅक याने शुजाउद्दौला, गाझीउद्दीन व जाट यांच्याकडे नोकऱ्या केल्या. नंतर शव्हाल्ये शाह आलमकडे आला आणि सिंधमध्ये बस्तान बसवायच्या योजनेत सामिल झाला.
-पण ती योजनाच बारगळली. काँत द मोदाव्ह यानेही प्रथम शाह आलमकडे नोकरी धरली. नंतर तो निजामाचा भाऊ सलाबत जंगच्या पदरी राहिला.
०४. शुजाउद्दौलाकडे १२ वर्षे असलेल्या ज्याँती या अधिकाऱ्याचे अयोध्येत चांगले वजन होते. फ्रान्सला परतल्यावर त्याची प्रशंसा झाली.
-त्याने भारतावर पुस्तके लिहिली आणि जुनी हस्तलिखिते जमविली. फ्रान्समधील भारतविषयक अभ्यासाचा तो प्रारंभक होय. या काळात फ्रेंच साहसी लोकांचे पेवच फुटले होते.
०५. निजामाकडे प्रथम ओमाँ, द लाली आणि नंतर फ्रान्स्वा द रेमाँ हे अधिकारी नोकरीस होते. रेमाँने चौदा हजार सैन्य तयार केले होते.
-एतद्देशीयांचे त्याच्यावर प्रेम होते. १७९८ साली त्याच्या मृत्यू नंतर त्याची जागा पेरॉनने घेतली. पण इंग्रजांच्या दडपणाने निजामाकडल्या फ्रेंच फौजा बरखास्त झाल्या आणि हैदराबादेतील फ्रेंच वर्चस्व संपले.
०६. काँत द बुआन्य मुळचा साव्हुआचा. इंग्रजांच्या शिफारशीने महादजी शिंदेकडे आला आणि त्याने तीस हजार सैन्य तयार केले. १७९६ मध्ये तो यूरोपला परतला.
-त्याची जागा दौलतराव शिंद्याकडे पेरॉनने घेतली. १८०३ मध्ये युद्धावाचूनच तो इंग्रजांना शरण गेला.
०७. तुकोजी होळकरकडला द्युद्रनेक आणि टिपूकडचा द लाली व नंतर द व्हिजी हे फ्रेंचच. यांपैकी बऱ्याच जणांना सैन्याच्या तैनातीसाठी मुलूख तोडून मिळाले होते.
-स्वतंत्र संस्थानिकांच्या थाटात ते राहत व त्या त्या दरबारी त्यांचे चांगले वजनही असे. पण ते मुख्यतः पोटार्थी असल्याने त्यांची कारस्थाने फ्रेंच सत्तेच्या पुनरूज्जीवनाला उपयोगी पडली नाहीत.
-उलट एतद्देशीयांना फ्रेंच साह्याची भरमसाठ आश्वासने देऊन अप्रत्यक्षरीत्या त्यांनी इंग्रजानांच मदत केली .

* फ्रेंच – मराठे संबंध

०१. १७ व्या शतकात या दोन्ही सत्तांची वाढ , १७६२-६३ मध्ये पराजय व एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातिला ऱ्हास यांत साम्य आढळते.
-युद्धसाहित्य पुरवायला अनुकूल असलेल्या फ्रेंचांना शिवाजी महाराजांनी सुरतेला लुटले नाही. पाँडिचेरी जिंकली, पण फ्रेंचांना व्यापाराचे फर्मान दिले.
-पाँडिचेरीच्या मराठी कारभाऱ्यांनी फ्रेंचांना पैशासाठी बराच त्रास दिला. पण त्या बदल्यात मारतँने पाँडिचेरीच्या तटबंदीचे व करवसुलीचे अधिकार मिळविले.
०२. पुढे १६९३ साली राजाराम महाराजांनी पाँडिचेरी डचांना विकली. ती फ्रान्स-हॉलंड तह झाल्यावरच फ्रेंचांना परत मिळाली.
-ड्यूमाच्या धैर्याने स्तिमित झालेल्या रघुजी भोसल्याने बंगालवरच्या स्वाऱ्यांत चंद्रनगरला धक्का लावला नाही. तथापि फ्रेंच व्यापाराचे नुकसान व्हायचे ते झालेच.
०३. चंदासाहेबाला सोडवून घेण्यासाठी सुरुवातीला डूप्लेने मराठ्यांशी मैत्रीचे धोरण ठेवले. पण हैदराबादला वर्चस्व स्थापण्याच्या प्रयत्नात बुसी – सलाबतजंग यांचे नानासाहेब पेशव्यांशी युद्ध जुंपले.
-अखेर १७५२ साली मालकीचा तह झाला. त्यात नानासाहेबाला मुलूख मिळाला. सावनूरच्या मोहिमेत बुसीची मदत मिळाली. कर्नाटकातील इंग्रज – फ्रेंच युद्धपासून मात्र तो अलिप्त राहिला.
०४. १७६३ नंतरच्या शव्हाल्ये, लॉ द लॉरिसताँ, बेलकाँब वगैरेंच्या योजनांत मराठ्यांच्या मैत्रीवर भर होता. अखेर १७७७ मध्ये सँल्यूबँ व १७८१ नंतर माँतिन्यी या फ्रेंच राजदूतांनी इंग्रजांविरुद्ध परस्पर साह्याच्या वाटाघाटी केल्या.
-पण त्यांना पॅरिसहून उत्तर न आल्याने नाना फडणीसाने माँतिन्यीचे नकळत १७८२ साली सालबाईचा तह पक्का केला.
०५. मराठ्यांचा फ्रेंच मदतीवरील विश्वास उडाला. भरीला फ्रेंच टिपूची मैत्री, माँतिन्यी व नंतर ज्याक कॉसिन्यी यांनी मराठे – टिपू सलोख्याचे अयशस्वी प्रयत्न केले. १७८८ मध्ये माँतिन्यी परतल्यावर फ्रेंच – मराठे संबंध संपले.
०६. वेलस्लीने वसईच्या तहात दुसऱ्या बाजीरावला फ्रेंचांशी संबंध ठेवायला मनाई करून त्यावर शिक्कामोर्तब केले. इंग्रजांच्या वर्चस्वाला शह देण्यात दोन्हीही सत्ता परस्परांचा नीट उपयोग करून घेण्यास असमर्थ ठरल्या .