जलस्त्रोतांविषयी अद्ययावत माहितीसाठी राष्ट्रीय जल माहिती केंद्राची स्थापना
नवी दिल्लीत जलस्रोत, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालयाच्या अंतर्गत ‘राष्ट्रीय जल माहिती केंद्र’ची स्थापना करण्यात आली आहे.


देशभरातल्या जलस्रोतांची आकडेवारी आणि माहिती एकाच ठिकाणी संकलित करून जल व्यवस्थापन आणि शाश्वत विकास याबाबत आवश्यक ती माहिती पुरविण्यासाठी ‘एकल खिडकी’ म्हणून हे केंद्र कार्य करणार.



मनिला येथे SAARC वित्तमंत्र्यांची 12वी अनौपचारिक बैठक संपन्न 
मनिला (फिलीपिन्स) येथे आशियाई विकास बँकेच्या (ADB) 51व्या वार्षिक बैठकीदरम्यान SAARC वित्तमंत्र्यांची 12वी अनौपचारिक बैठक पार पडली.

बैठकीत SAARC सदस्य देशांच्या वित्तमंत्र्यांनी/प्रतिनिधींनी भाग घेतला होता आणि नेपाळचे वित्तमंत्री यूबा राज खातिवाडा यांनी अध्यक्ष पद भूषवले होते.

दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकारी संघ (SAARC) ही एक प्रादेशिक आंतरशासकीय संघटना आहे आणि दक्षिण आशियातल्या देशांची भौगोलिक संघटना आहे, ज्याची अफगाणिस्तान, बांग्लादेश, भूटान, भारत, नेपाळ, मालदीव, पाकिस्तान आणि श्रीलंका हे सदस्य राज्ये असून याची 8 डिसेंबर 1985 रोजी ढाकामध्ये स्थापना करण्यात आली. याचे काठमांडू (नेपाळ) येथे मुख्यालय आहे.


‘स्वयम’ या कार्यक्रमांतर्गत महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवला जाणार 
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उच्चशिक्षण क्षेत्रातील प्राध्यापकांसाठीच्या ऑनलाइन रिफ्रेशर अभ्यासक्रमांसाठी देशभरातून निवडलेल्या 75 विद्यापीठे व उच्चशिक्षण संस्थांमध्ये (एनआरसी) महाराष्ट्र व गोव्यातून सर्वाधिक तब्बल दहा संस्थांचा समावेश आहे. 

‘स्वयम’ या कार्यक्रमांतर्गत हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला जाणार आहे.
निवड झालेल्या संस्थांमध्ये मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि गोवा विद्यापीठांचा समावेश आहे.

यानुसार हवामान बदल, नेतृत्व-प्रशासन, अर्थशास्त्र, विज्ञान-तंत्रज्ञान, सागरी विज्ञान, आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या अनेक क्षेत्रांत देशाला भविष्यातील दिशा दाखविण्याची जबाबदारी या उच्च शिक्षणसंस्था पार पाडणार आहेत.


या वर्षअखेरपर्यंत या संस्थांनी उच्चशिक्षण क्षेत्रातील जागतिक संस्थांचा अभ्यास करून गुणात्मक व व्यावहारिक बदलांबाबत केंद्राकडे आराखडा सादर करायचा आहे. त्याचा अभ्यास केल्यानंतर तो देशभरात लागू करण्याबद्दल अंतिम निर्णय घेण्यात येईल.

देशातील उच्चशिक्षण संस्थांमध्ये किमान सुमारे दीड कोटी प्राध्यापक कार्यरत आहेत. यातील निवड झालेली 75 विद्यापीठे व आयआयटी, आयआयएम यांसारख्या शिक्षण संस्थांना एकेक विषय वाटून देण्यात आले आहेत



महिला विशेष लोकलची 26 वर्षे पूर्ण 
पश्चिम रेल्वेवर महिला प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या महिला विशेष लोकलला 26 वर्षे पूर्ण झाली. महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र लोकल ही संकल्पना पश्चिम रेल्वेने 6 मे 1992 रोजी सत्यात उतरवली होती. 

चर्चगेट ते बोरीवली स्थानकांदरम्यान ही लोकल सुरू करण्यात आली होती.
चर्चगेट ते बोरीवली स्थानकांदरम्यानच्या या महिला विशेषला महिला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभला. शिवाय महिला प्रवाशांना हक्काची लोकल मिळाल्यामुळे महिला प्रवाशांनी समाधान व्यक्त केले होते. 

प्रवाशांनी महिला विशेष लोकल विरारपर्यंत चालविण्याची मागणी केली.
अखेर प्रवाशांच्या आग्रहास्तव 1993 मध्ये चर्चगेट-विरार स्थानकांदरम्यान महिला लोकलचा विस्तार करण्यात आला. सद्य:स्थितीत अप आणि डाऊन मार्गांवर बोरीवली-चर्चगेटसह विरार-चर्चगेट, भार्इंदर-चर्चगेट आणि वसई रोड-चर्चगेट या स्थानकांदरम्यान एकूण 8 महिला विशेष लोकल फेऱ्या खास महिलांसाठी सुरू आहेत.