१८५७ चा उठाव – भाग ३

प्रत्यक्ष उठाव(सातारा – रंगो बापुजी गुप्ते)

०१. सातारचे राजे छत्रपती प्रतापसिंह यांचे ब्रिटिशांनी खालसा केलेले राज्य पुन्हा मिळविण्यासाठी त्यांचा वकील रंगो बापूजी तसेच नानासाहेब पेशवे यांची वार्षिक आठ लाखाची बंद केलेली पेन्शन चालू व्हावी यासाठी अजीमुल्लाखान दोघेही इंग्लंडला गेले होते. परंतु ब्रिटिशांनी घेतलेल्या निर्णयांत बदल केला नाही. परिणामत: रंगो बापूजी व अजीमुल्लाखान यांनी ब्रिटिशांच्या विरोधात हालचाली सुरु केल्या.

०२. इंग्रजांच्या विरोधात उठाव करण्याची त्यांनी एक योजना आखली रंगो बापूजी यांनी दक्षिण भारतातील संस्थानांचा तर अजीमुल्लाखान यांनी परकीयांची मदत मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला. सर्वजण इंग्रजांकडून दुखावलेले होते.

०३. या उठावात कमळाचे फुल व चपाती ही क्रांतीची प्रतिके होती. तर दिल्ली, लखनौ, कलकत्ता व सातारा ही क्रांतीची प्रमुख केंद्र होती. संस्थानिक व हिंदी लष्कर यांच्यामध्ये समन्वय साधला गेला. उठावाचे नियोजन करून ३१ मे १८५७ हा उठावाचा दिवस निश्चित करण्यात आला. परंतु काडतुसाच्या बातमीने सैनिकांत खूप असंतोष निर्माण झाला होता.

(बराकपूर – मंगल पांडे)

०१. अशातच बराकपूरच्या छावणीमध्ये एका ब्राम्हण सैनिकास एका अस्पृश्य सैनिकाने पिण्यासाठी पाण्याची मागणी केली. त्यावेळी त्याने उत्तर दिले की, “तुझ्या स्पर्शाने माझा लोटा अपवित्र होईल.” यावर तो अस्पृश्य सैनिक म्हणाला, “महाराज आता तो जातीचा अभिमान गुंडाळून ठेवा.  यापूढे तुम्हाला गाईची नि डुकराची चरबी आपल्या दातानी तोडावी लागणार आहे.”

०२. २९ मार्च १८५७ रोजी बराकपूरच्या छावणीत उठावाची पहिली ठिणगी पडली. इनफिल्ड बंदुका व चरबीयुक्त काडतुसे यामुळे सैनिकात अस्वस्थता होती. लष्कारी कवायतीच्या प्रसंगी मंगल पांडे याने ही नवीन काडतुसे वापरण्यास नकार दिला.

०३. एवढ्यावरच न थांबता काडतूस वापरण्याची सक्ती करण्यासाठी पुढे आलेले ब्रिटिश अधिकारी मेजर हडसन बाॅं, कमांडर जनरल व्हिलर आणि लेफटनंट वाघ यांना गोळया झाडून ठार केले. शेवटी ग्रेनेडिअर शेखपट्टने मंगल पांडेस पकडले. कोर्ट मार्शल होऊन ८ एप्रिल १८५७ रोजी मंगल पांडे यांस बराकपूरच्या छावणीमध्ये फासावर चढविण्यात आले.

०४. मंगल पांडेच्या फाशीची बातमी देशभरातील लष्करी छावण्यात वणव्यासारखी पसरली. काडतूस प्रकरणामुळे हिंदी शिपायांत संतापाची लाट उसळली आणि यातून ३ मे रोजी लखनौ व ५ मे रोजी अयोध्या येथील लष्करी तुकडयांनी काडतूसे वापरण्यास स्पष्ट नकार दिला. ब्रिटिशांनी अशा शिपायांवर कठोर कारवाई केली. अनेकांना सक्त मजुरीची शिक्षा झाली.

(मेरठ) ३ मे १८५७ रोजी लखनौ व ५ मे रोजी अयोध्या येथील शिपायांनी काडतुसे वापरण्यास नकार दिला.
०१. मीरतच्या छावणीमध्ये ९ मे १८५७ रोजी ८५ शिपायांनी काडतुसे वापरण्यास स्पष्ट नकार दिला. लष्करी आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी या सर्व शिपायांना सक्त मजुरीची शिक्षा झाली. त्यांच्या पायात बेडया ठोकण्याचे काम सुरू झाले. त्यामुळे मीरतच्या छावणीतील इतर हिंदी शिपायांना नियोजित वेळेपर्यत वाट पाहणे अवघड वाटू लागले.

०२. त्यांनी १० में १८५७ रोजी सायंकाळी उठावास सुरुवात केली. त्या दिवशी रविवार असल्याने युरोपियन कुटुंबे प्रार्थनेसाठी चर्चकडे निघाली होती. भडकलेल्या शिपायांनी ‘मारो फिरंगी’ को अशी घोषणा दिली. स्त्री पुरुष मुले बाळे सर्वांना कापून टाकण्यात आले.

०३. इंग्रज अधिकाऱ्याना ठार केले. तुरुंग फ़ोंडून भारतीय वैद्यांची मुक्तता केली. मीरत उठाववाल्यांच्या ताब्यात येताच कंपनी सरकारचे राज्य खालसा झाल्याची घोषणा करण्यात आली. हिंदी सैनिकांनी दुसऱ्याच दिवशी ६४ कि.मी. अंतर कापून दिल्ली गाठली. मार्गामध्ये हजारो नागरिक उठाववाल्यांना येऊन मिळाले.

(दिल्ली – बहादूरशाह जफर)

०१. मीरतहून आलेली फौज दिल्लीत प्रवेश करताच येथील इंग्रजांच्या छावणीतील हिंदी शिपाई उठाववाल्यांना येऊन मिळाले. मोगल बादशहाचे साम्राज्य इंग्रजांनी घश्यात घातले होते.

०२. परंतु भारतीयांच्या मनात त्या वैभवशाली मोगल साम्राज्यांच्या आठवणी अजून जाग्या होत्या. त्यामुळे उठाववाल्यांनी उठावाच्या नेतृत्वाची धुरा बादशहाकडे दिली. बादशाह बहादूरशहाला धोका वाटत असतानाही बंडवाल्यापुढे त्यांचा नाईलाज झाला.

०३. ११ में रोजी बंडवाल्यांनी आपल्या दिल्लीतील आगमनाबरोबर दिल्लीतील इंग्रजांच्या कत्तलीस सुरुवात केली. त्यांच्यापुढे ब्रिटिश नामोहरम झाले. उठाववाल्यांनी दारुगोळयाच्या कोठाराकडे धाव घेतली.  त्यापूर्वीच ब्रिटिश शिपायांनी कोठारास आग लावली. प्रचंड स्फोट झाला. त्यात शेकडो लोक मृत्यूमुखी पडले. अवघ्या २४ तासात दिल्ली ताब्यात आली. बादशहा बहादूरशहा यांस भारताचा सम्राट म्हणून घोषित करण्यात आले.

०४. उठावाचे गांभीर्य लक्षात घेऊन गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग याने १ लक्ष २० हजार सैनिक बोलावून घेतले. तसेच भारतातही नव्याने भरती करून ३ लक्ष १० हजार फौज तयार केली. इंग्रजांनी दिल्ली ताब्यात घेण्यासाठी हालचाली सूरू केल्या. इंग्रजांनी जून १८५७ मध्ये ६५ हजारांची फौज दिल्लीभोवती गोळा केली. निष्ठावान शीख पलटणीस दिल्लीवर पाठविण्यात आले. शीख व गुरखा यांच्या नवीन पलटण उभारल्या.

०५. १५ सप्टेंबर १८५७ रोजी बंडवाले व इंग्रज यांच्यामध्ये युध्दास तोंड फुटले बंडवाल्यांनी १० दिवस निकराने झुंज दिली. परंतु ब्रिटिशांच्या पुढे त्यांचा निभाव लागला नाही. थोड्याच दिवसांत लॉरेन्सने दिल्ली पुन्हा सोडवून घेतली. २५ सप्टेंबर १८५७ मध्ये दिल्ली इंग्रजांच्या हाती आली. दिल्ली ताब्यात येताच इंग्रजांनी अमानुषपणे कत्तल सुरु केली.  ब्रिटिशांनी लाल किल्ल्याचा ताबा घेतला. बादशहा बाहदूरशहा यास कैद करुन एका हुजऱ्याच्या कोठीत डांबले.

(कानपूर – नानासाहेब पेशवे व तात्या टोपे)

०१. मीरत व दिल्ली येथील उठावामुळे सर्व लष्करी छावण्यात अस्वस्थता निर्माण झाली. अशा अस्वस्थ कानपूरमधील एका गोऱ्या शिपायाने ५ जून १८५७ रोजी हिंदी शिपायांवर गोळया झाडल्या. यामूळे कानपूरमधील हिंदी शिपायांनी बंड पुकारले. नानासाहेब येथील उठाववाल्यांचे नेते बनले. कानपूरमधील इंग्रजांनी एका खंदक असणाऱ्या इमारतीचा आश्रय घेतला.

०२. नानासाहेबांनी या इमारतीस वेढा दिला. इंग्रजांनी मोठया धैर्याने २१ दिवस उठाववाल्यांचा प्रतिकार केला. शेवठी नानासाहेबांशी करार करून इंग्रजांनी आपली सुटका करुन घेतली.१ जूलै १८५७ रोजी कंपनी राजवट संपुष्टात येऊन नानासाहेब पेशवा बनल्याचे घोषित करण्यात आले. नानासाहेब पेशव्याचे दूत ग्वाल्हेरचे ज्योतिराव घाटगे व निंबाळकर यांनी कोल्हापूरात उठाव केला. मात्र इंग्रजांनी हा उठाव मोडून काढला.

०३. इंग्रजांना कानपूरमधील उठावाची बातमी समजताच कानपुरच्या दिशेने इंग्रज फौज धावू लागली. १२ जुलै १८५७ रोजी युध्द झाले इंग्रजांच्या तोफखान्यापुढे नानाचा निभाव लागला नाही. १७ जुलै रोजी इंग्रजांनी कानपुरवर ताबा मिळविला. अवध संस्थानच्या माध्यामातून पुन्हा कानपुरवर ताबा मिळविण्यात नानासाहेब व तात्या टोपे यशस्वी झाले.

०४. ब्रिटिश अधिकारी जनरल कॅम्पबेलने पुन्हा नानासाहेब व तात्या टोपे यांचा पराभव करुन कानपूर मिळविले. नानासाहेब रोहिलखंडाच्या बाजूस गेला असता इंग्रजांनी त्याचा पाठलाग केला. कँबेल याने रोहिलखंडातील उठाव मोडला. नानासाहेबास पकडण्यासाठी इंग्रजांनी ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले.  यानंतर नानासाहेब नेपाळमध्ये आश्रयासाठी निघून गेले.

०५. सेनापती तात्या टोपे मात्र जवळ जवळ दहा महिने इंग्रजांविरुध लढत होते. पंरतु फितुरीमुळे त्यांचाही घात झाला. २१ जानेवारी १८५९ रोजी रोजी राजपुतान्यात सीकार येथे तात्या टोपे व इंग्रज यांच्यात झालेल्या लढाईत तात्या टोपेचा पराभव झाला. इंग्रजांनी त्यांना पकडले व १८ एप्रिल १८५९ रोजी फासावर लटकविले.

(अवध – बेगम हजरत महल)

०१. लॉर्ड डलहौसीने अवध संस्थान खलसा केले. ३० मे १८५७ रोजी अवध संस्थानात उठावास सुरुवात झाली. अवध संस्थानच्या नवाबाच्या बेगम हजरत महलने बंडवाल्याचे नेतृत्व केले. आपल्या अल्पवयीन मुलास गादीवर बसवून इंग्रज राज्य समाप्त झाल्याचे जाहीर केले.

०२. ब्रिटिश सेनापती हॅव लॅक मोठी फौज घेऊन सप्टेंबर १८५७ मध्ये लखनैास आला. बंडवाल्यांशी लढा देऊन १७ नोव्हेंबर १८५७ रोजी बंडवाल्याचा ब्रिटिश रेसिडेन्सी भेावतीचा वेढा उठविला.

०३. इंग्रजांनी ताकद वाढत असतानाच ब्रिटिश सेनानी जनरल कॅम्बेल २० हजारांची फौज घेऊन लखनौस पोहोचला. शेवटी २२ मार्च १८५७ रोजी ब्रिटिशांनी लखनौ मिळविण्यात यश मिळविले. औट्रम व हॅवलॉक यांनी लखनौ येथील उठाव मोडले. ड्यूरंडने माळव्यातील उठावाचा बंदोबस्त केला.

(बिहार – कुंवरसिंह)

०१. पाटणजवळ दानापूर येथे ब्रिटिशांची फौज होती. येथील ब्रिटिश अधिकाऱ्याने आपल्या छावणीतील हिंदी शिपायांत उठावाची लागण होऊ नये म्हणून शिपायांना निशस्त्र करण्याचा निर्णय घेतला. हिंदी सैनिक शस्त्रे खाली ठेवण्यास आणि गोऱ्यांची फौज तेथे येण्यास एकच गाठ पडली. आपणास नि:शस्त्र करुन लॉईड आपली कत्तल करणार अशी भीती हिंदी शिपायांना वाटल्याने त्यांनी हाती शस्त्रें घेतले व गोऱ्या फौजेवर गोळीबार सुरु केला.

०२. लॉइड हतबल झाला. त्यांचा जमीनदार राणा कुंवरसिंह ब्रिटिशांच्या विरोधात बंड करुन उठला. इंग्रजांकडून झालेल्या अन्यायाची संधीच उठावाच्या रुपाने राणा कुंवरसिंहाला चालून आली. उठाववाल्यांनाही कुंवरसिंहाच्या रुपाने नेता मिळाला. ब्रिटिशांशी लढता लढता १८५७ मध्ये कुंवरसिंह मरण पावला.

(झाशी – राणी लक्ष्मीबाई)

०१. डलहौसीने झाशीचे राज्य खालसा केले. राणीच्या दत्तक पुत्राच्या मुंजीसाठी तिच्याच खजिन्यातील १ लाख रुपयांची मागणी राणीने इंग्रजाकडे केली. इंग्रजांनी यासाठी जामीन मागितला यामुळे राणी अपमानित झाली व तिने हाती शस्त्र घेतले. ६ जून १८५७ रोजी झाशी येथील हिंदी शिपायांनी बंड पुकारून इंग्रज अधिकाऱ्याची कत्तल केली.

०२. यापाठी मागे राणीचा हात आहे. असे वाटून इंग्रजांनी राणीच्या विरोधात हालचाली सुरु केल्या.राणीनेही आपली लष्करी सिध्दता केली. इंग्रजांनी झाशीच्या किल्ल्यास वेढा दिला. राणी मोठया निर्धाराने किल्ला लढवू लागली. राणीच्या मदतीस तात्या टोपे धावून आले. पण त्यांना पराभवास सामोरे जोवे लागले.

०३. ब्रिटिश सेनापती सर हयूरोज याने किल्ल्याच्या तटबंदीस खिंडार पाडले. इंग्रजांनी किल्ल्यात प्रवेश करताच भयंकर कतल सुरु केली. मोठया युक्तीने आपल्या मुलाला पाठीशी बांधून घोडयावर स्वार होऊन राणी किल्ल्याबाहेर पडली. काल्पीच्या दिशेने राणीची दौड सुरु झाली. १०० मैलाचे अंतर राणीने वाऱ्याच्या वेगाने पार केले.

०४. लक्ष्मीबाई काल्पीला येताच नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, बांद्याचा नवाब एकत्र आले. ब्रिटिश सेनापती सर हयू रोजने काल्पीवर आक्रमण केले. बंडवाले आणि इंग्रज यांच्यात दोन लढाया झाल्या पण त्यात बंडवाल्यांचा पराभव झाला. राणी आणि तात्या टोपे यांनी ग्वाल्हेरकडे कूच केले. राणी व तात्या टोपे ग्वाल्हेरला येताच तेथील सैनिकात उत्साह संचारला व त्यांनी बंडाचे निशान उभारले.

०५. यावेळी ग्वाल्हेरचा राजा जयाजीराव मात्र आगऱ्यास पळून गेला. ग्वाल्हेरचा किल्ला जून १८५८ मध्ये बंडवाल्यांच्या ताब्यात आला. ग्वाल्हेरच्या बंडाची बातमी समजाताच सर ह्यु रोज काल्पीहून ग्वाल्हेरला आला. त्यांनी बंडवाल्यांवर आक्रमण केले. यावेळी राणी उठावाचे स्वत: नेतृत्व करत होती. सर ह्यूरोज व जनरल स्मिथ यांच्या भेदक माऱ्यापुढे उठाववाल्यांचा निभाव लागेनासा झाला राणीला शत्रूने वेढा दिला.

०६. राणीने मोठया चपळतेने घोडा उडवून वेढयाचा छेद केला. ब्रिटिश फौज पाठीवर होतीच अशा आणीबाणीच्या प्रसंगी एका ओढयाजवळ राणीचा घोडा अडला. पाठलाग करणाऱ्या इंग्रज सैनिकांनी राणीच्या डोक्यावर छातीवर जबर वार केले. १७ जून १८५८ रोजी राणीचा मृत्यू झाला व उठावाच्या एका तेजस्वी पर्वाचा अंत झाला.

०७. नानासाहेब व हजरत बेगम हे नेपाळात निघून गेले असावेत. बहादुरशाहास इंग्रजांनी कैद करून रंगूनला पाठविले. या उठावात शिंदे, निजाम, भोपाळच्या बेगमा, नेपाळचा राणा जंग बहादूर यांनी इंग्रजांना मदत केली. पंजाबमधील शीख, काश्मीरचा राजा व कित्येक जमीनदार इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले.

(इतर उठाव)

०१. १३ मे फिरोजपुर, २० मे अलीगड, ३० मे लखनौ व मथुरा, ४ जून वाराणसी व कानपूर, ६ जून अलाहाबाद-झाशी याशिवाय बरेली, अंबाला, बुंदेलखंड इत्यादी ठिकाणी हिंदी शिपायांचा उठाव झाला. जून १८५७ च्या मध्यापर्यंत बहुतेक सर्व उत्तर भारतात उठावाची कारवाई झाली.

०२. दक्षिण भारतात सातारा, कोल्हापूर येथे ३१ जुलै १८५७ रोजी शिपायांनी सशस्त्र उठाव केला. मौलवी अहमदुल्ला याने फैझाबाद येथे तर जनरल बरकतखान याने बरेली येथे उठाव केला.

०३. मात्र पंजाबमध्ये शीख व हैद्राबादमध्ये सालारजंग यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव न करता त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य केले.

०४. डिसेंबर १८५७ पर्यंत इंग्रजांनी बहुतेक सर्व उठाव मोडून काढले. उठावावर नियंत्रण मिळविल्यानंतर मोठ्या प्रमाणात हिंदी शिपायांची कत्तल केली. जेवढे इंग्रज या उठावात हिंदी शिपायांनी मारले असतील त्याच्या दुप्पट हिंदी लोकांना ठार मारून इंग्रजांनी सूड उगविला.

१८५७ चा उठाव भाग-१ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

१८५७ चा उठाव भाग-२ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

१८५७ चा उठाव भाग-४ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

१८५७ चा उठाव भाग-५ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.