नारिंगी पारपत्राचा निर्णय रद्द 
‘इमिग्रेशन चेक रिक्वायर्ड’ (ईसीआर) या वर्गवारीकरिता नारिंगी रंगाचे पारपत्र (पासपोर्ट) जारी करण्याच्या निर्णयाला झालेला विरोध लक्षात घेऊन केंद्र सरकारने हा निर्णय रद्द केल्याचे जाहीर केले.


तसेच पारपत्राच्या अखेरीस असणारे धारकाचा पत्ता लिहिलेले पानही पूर्ववत छापण्यात येणार असल्याचे सांगितले. 
ईसीआर वर्गवारीतील पारपत्र धारकांना नारिंगी रंगाचे पारपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

ईसीआर वर्गवारी म्हणजे भारतातील १९८३ च्या इमिग्रेशन कायद्यानुसार ईसीआर वर्गवारीतील पारपत्र धारकांना ठरावीक १८ देशांत प्रवास करायचा असल्यास परदेशस्थ भारतीय व्यवहार मंत्रालयाच्या (मिनिस्ट्री ऑफ ओव्हरसीज इंडियन अफेअर्स) प्रोटेक्टर ऑफ इमिग्रंट्स कार्यालयाकडून परदेश प्रवासासाठी खास परवानगी घ्यावी लागते. 

या यादीत संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, कतार, ओमान , कुवेत, बहरीन, मलेशिया, लिबिया, जॉर्डन, येमेन, सुदान, अफगाणिस्तान, इंडोनेशिया, सीरिया, लेबनॉन, थायलंड आणि इराक या १८ देशांचा समावेश आहे.



श्रीमंत देशांमध्ये भारत सहाव्या स्थानावर
जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या क्रमवारीत भारताने सहावा क्रमांक पटकावला आहे. भारतातील एकूण संपत्तीचे मूल्य ८२३० अब्ज डॉलर इतके आहे.

न्यू वर्ल्ड वेल्थ या संस्थेने तयार केलेल्या अहवालानूसार अमेरिका हा जगातील सर्वात श्रीमंत देश आहे. 

२०१७ साली अमेरिकेची एकूणसंपत्ती ६४५८४ अब्ज डॉलर इतकी होती.

दुसरा क्रमांकावर असलेल्या चीनची एकूण संपत्ती २४८०३ अब्ज डॉलर, तिसरा क्रमांक पटकाविलेल्या जपानची एकूण संपत्ती १९५२२ अब्ज डॉलर, चौथ्या क्रमांकावरील ब्रिटनची संपत्ती ९९१९ अब्ज डॉलर, पाचव्या क्रमांकावरील जर्मनीची संपत्ती ९६६० अब्ज डॉलर आहे.

भारत सहाव्या क्रमांकावर असून, त्यांनंतर फ्रान्स (७), कॅनडा (८), ऑस्ट्रेलिया (९) व इटली (१०) क्रमांक आहे.



जेएनयूमध्ये ४६ वर्षांनंतर होणार दुसरा दीक्षांत समारंभ 
सर्व विद्यापीठांमध्ये साधारणपणे दरवर्षी दीक्षांत समारंभाचे आयोजन केले जाते. पण भारतातील प्रतिष्ठित दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) मागील ४६ वर्षांत असे झालेले नाही. पण यंदापासून ही प्रथा पुन्हा सुरू केली जाणार आहे.

जेएनयूमध्ये ४६ वर्षांनंतर दुसऱ्या दीक्षांत समारंभाचे आयोजन केले जात आहे. 

यापूर्वी विद्यापीठात पहिला आणि शेवटचा दीक्षांत समारंभ हा वर्ष १९७२ मध्ये झाला होता. 


पोस्टमनच्या नवीन पोशाखाचे अनावरण
पोस्टमन (पुरुष व महिला दोन्ही) आणि मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) यांच्यासाठी असलेल्या पोशाखाची पुनर्रचना करण्यात आली आहे. 

नवा पोशाख राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान (NIFT, दिल्ली) यांच्या सल्लामसलतीने तयार करण्यात आला. नव्या पोशाखासाठी त्यांना दरवर्षी ५००० रुपये भत्ता देण्याचा निर्णय घेतला गेला आहे आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयांतर्गत खादी आणि ग्रामोद्योग आयोग (KVIC) देशभरात पोशाख पुरविणार. 

देशात ९००००पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) कार्यरत आहेत. 

टपाल विभाग (DoP) हे ‘भारतीय टपाल’ म्हणून भारत सरकारद्वारे संचालित एक टपाल प्रणाली आहे. टपाल विभाग भारत सरकारच्या संचार मंत्रालयाचा भाग आहे. देशात १५५०१५ टपाल कार्यालयांचे जाळे आहे आणि हे जगातील सर्वात मोठ्या प्रमाणावर विस्तारलेले टपाल जाळे आहे.

याची स्थापना १ एप्रिल १८५४ रोजी ब्रिटिश राजवटीत झाली. १८७० साली याचे पहिले अधीक्षक नियुक्त करण्यात आले आणि अलाहाबादमध्ये येथे नियुक्ती झाली. १८७६ साली ब्रिटीश भारत हे जनरल पोस्टल युनियनचे प्रथम गैर-स्थापित सदस्य झाले. आशियातील पहिले चिपकवले जाणारे टपाल तिकीट जुलै १८५२ मध्ये भारताच्या सिंधे जिल्ह्यात बार्टले फ्रेरे (भागाचे मुख्य आयुक्त) यांनी प्रस्तुत केले.



‘VINBAX’ – भारत आणि व्हिएतनाम यांचा पहिला लष्करी सराव सुरू
भारत आणि व्हिएतनाम यांच्या लष्करांनी २९ जानेवारी २०१८ रोजी मध्यप्रदेशच्या जबलपुरमध्ये ‘VINBAX’ नामक एक संयुक्त लष्करी सराव सुरू केला आहे.

सहा दिवस चालणारा हा युद्धाभ्यास भारत आणि व्हिएतनाम यांचा प्रथमच सराव आहे.


व्हिएतनाम हा दक्षिण-पूर्व आशियातला एक देश आहे. याला दक्षिण चीन समुद्र लाभलेला आहे. या देशाचे राजधानी शहर हनोई हे आहे आणि व्हिएतनामी दोंग हे चलन आहे.



सोची मध्ये प्रथम सिरिया शांती परिषद संपन्न
रशियाच्या सोची शहरात २९-३० जानेवारी २०१८ रोजी प्रथम सिरिया शांती परिषद आयोजित करण्यात आली.

रशियाद्वारा प्रायोजित ‘कॉंग्रेस ऑफ द सिरियन नॅशनल डायलॉग’ नामक राजकीय बैठकीमध्ये सिरियाच्या भवितव्याचा वेध घेतला गेला. बैठकीत रशिया आणि सिरिया देशांनी वाटाघाटी सुरू केली. 

सिरियामध्ये मार्च २०११ पासून गृहयुद्ध सुरू आहे, ज्यात आतापर्यंत सुमारे ५००००० लोकांचा बळी गेला आहे.