सुधा करमरकर यांचे निधन 
मराठी रंगभूमीवर ‘लिटल थिएटर’ ची रुजवात करणा-या ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्य निर्मात्या सुधा करमरकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. 



बालनाट्य चळवळीच्या प्रणेत्या म्हणून सुधातार्इंचे रंगभूमीवरील योगदान न विसरता येण्याजोगे आहे. त्यांच्या निधनामुळे बालनाट्य चळवळ पोरकी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

‘लिटल थिएटर’च्या माध्यमातून ‘अलिबाबा आणि चाळीस चोर’, ‘अल्लाउद्दिन आणि जादूचा दिवा’, ‘कळलाव्या कांद्याची कहाणी’, ‘चिनी बदाम’, ‘गणपती बाप्पा मोरया’ ही सुधातार्इंनी सादर केलेली बालनाट्ये लोकप्रिय ठरली होती. 

व्यावसायिक रंगभूमीवरही त्यांनी भूमिका साकारल्या. ‘पुत्रकामेष्टी’, ‘बेईमान’, ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकांतील त्यांच्या भूमिका रसिकांच्या पसंतीस उतरल्या होत्या.



देश सोडून जाणाऱ्या अतिश्रीमंतांच्या संख्येत वाढ
देश सोडून जाणाऱ्या अतिश्रीमंतांच्या संख्येत वाढ झाली आहे. चीन पाठोपाठ आता भारतातून मोठ्या प्रमाणावर अतिश्रीमंत परदेशांत स्थायिक होत असल्याची बाब ‘न्यू वर्ल्ड वेल्थ’ च्या अहवालातून समोर आली आहे. 

‘न्यू वर्ल्ड वेल्थ’ च्या सर्वेक्षणानुसार २०१७ या वर्षांत ७००० अतिश्रींमत व्यक्ती भारत सोडून परदेशात स्थायिक झाले. हे प्रमाण गेल्यावर्षींच्या तुलनेत वाढलं असून ही देशासाठी ही अत्यंत चिंतेची बाब ठरू शकते असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

भारत सोडून गेलेले हे अतिश्रीमंत अमेरिका, ग्रेट ब्रिटन, सौदी अरेबिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांसारख्या देशांत स्थलांतर करत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. 

तसेच चीनमधून सर्वाधिक श्रीमंत २०१७ मध्ये परदेशात स्थलांतरित झाले. ही संख्या सर्वाधिक म्हणजे १०००० होती. चिनी अतिश्रीमंतांनी स्थलांतरासाठी अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांना पसंती दिली. 

‘बिझनेस स्टँडर्ड’ च्या माहितीनुसार भारतात सध्याच्या घडीला ३३ लाख ४०० अतिश्रीमंत व्यक्ती आहेत तर २० हजार ७३० हून अधिक लोकांची संपत्ती ही अब्जावधींच्या घरात आहे.

भारतातून २०१६ मध्ये सहा हजार अतिश्रीमंत व्यक्ती परदेशात स्थायिक झाले, ही संख्या २०१५ मध्ये ४००० होती. भारतातून जरी अतिश्रीमंत व्यक्ती स्थायिक होत असले तरी देशासाठी ही चिंतेची बाब नसल्याचं अहवालातून स्पष्ट करण्यात आलं आहे.


उत्तम कामगिरी करणाऱ्या ३० तरुणांची यादी फोर्ब्ज इंडियाने जाहीर केली
विविध क्षेत्रांत उत्तम कामगिरी करणाऱ्या ३० वर्षांपेक्षा लहान ३० तरुणांची यादी फोर्ब्ज इंडियाने जाहीर केली आहे. 

यादीत सर्वाधिक म्हणजे ४ तरुण क्रीडा क्षेत्राशी संबंधित तर तीन नावे मनोरंजन क्षेत्रातील आहेत. यादीत अभिनेत्री भूमी पेडणेकर, अभिनेता विकी कौशल, क्रिकेटर जसप्रीत बुमराह, महिला क्रिकेटर हरमनप्रीत कौर आणि शूटर हिना सिद्धू यांची नावे समाविष्ट आहेत.

फोर्ब्जकडून २०११ पासून ३० वर्षांखालील तरुणांची यादी जाहीर केली जाते. २०१४ पासून फोर्ब्ज इंडियाची यादी घोषित करण्यात येते.

यादीत ३० पैकी १२ स्थानांवर एकापेक्षा अधिक लोकांची नावे आहेत. यात बुमराह, हरमनप्रीत, हिना सिद्धू आणि सवित पुनिया हे चौघे खेळाशी संबंधित आहेत. तिघे जण मनोरंजन क्षेत्रात आहेत. यात विकी कौशल, भूमी आणि मिथिला पालकर. गायक झुबिनचे नावही आहे. 

९ स्थानांवर १० महिलांची नावे आहेत. तर तंत्रज्ञान, सोशल मीडिया-कम्युनिकेशन, उद्योग जगत, हेल्थ केअर, फूड-हॉस्पिटॅलिटी, फायनान्स, फॅशन, ई-कॉमर्स व डिझायनिंग क्षेत्रातील प्रत्येकी २ आहेत.



पी. व्ही. सिंधू ‘इंडिया ओपन’ स्पर्धेची उपविजेती
‘इंडिया ओपन’ या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरी गटात अंतिम सामन्यात पी. व्ही. सिंधूचा अमेरिकेच्या बिवेन झँग कडून पराभव झाला आणि सिंधू स्पर्धेची उपविजेती ठरली आहे.

पुरुष एकेरी गट – चीनचा शी युकी (तायवानच्या चौ तीएन चेन चा पराभव)

मिश्र दुहेरी गट – मॅथियस ख्रिस्तियनसेन व ख्रिस्टिना पेडरसन (डेन्मार्कची जोडी)

महिला दुहेरी गट – ग्रेसिया पोली आणि अप्रियानी राहायु (इंडोनेशियाची जोडी)

इंडिया ओपन ही २००८ सालापासून भारतात आयोजित केली जाणारी बॅडमिंटन स्पर्धा आहे. वर्ष २०११ मध्ये याला BWF सुपरसिरिज स्पर्धेत रूपांतरित केले गेले. तेव्हापासून नवी दिल्लीत सिरीफोर्ट क्रीडा संकुल येथे ही स्पर्धा खेळली जाते.



मालदीवमध्ये १५ दिवसांची आणीबाणी घोषित
मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी देशात १५ दिवसांची आणीबाणी घोषित केली असल्याचे त्यांच्या सहकारी मंत्री अझिमा शुकूर यांनी सरकारी दूरचित्रवाहिनीवर जाहीर केले. यामुळे या देशातील राजकीय संकट आणखी गडद झाले आहे.

या निर्णयामुळे सुरक्षा दलांना संशयितांना अटक करण्याचे आणि स्थानबद्ध ठेवण्याचे अमर्याद अधिकार मिळाले आहेत. 

सर्वोच्च न्यायालय आणि सरकार यांच्यातील तणावाचे संबंध पराकोटीला पोहचले असताना ही घडामोड घडली आहे. जगभरातून दबाव वाढत असतानाही राजकीय कैद्यांची सुटका करण्याच्या न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास अध्यक्षांनी नकार दिला आहे.



शास्त्रज्ञांनी औषधीद्वारे सेवनासाठी QR कोड मुद्रित करण्याचा मार्ग विकसित केला
डेन्मार्कमधील कोपनहेगन विद्यापीठ आणि फिनलंडमधील अबो अकादेमी विद्यापीठातील संशोधकांच्या चमूने औषध निर्मितीसाठी एक नवीन पद्धत विकसित केली आहे. शास्त्रज्ञांनी औषधीचा वापर करून सेवन केल्या जाऊ शकणारे QR कोड मुद्रित करण्याचा एक मार्ग विकसित केला आहे.

या नव्या पद्धतीत, त्यांनी एक पांढरा खाद्य पदार्थ तयार केला, ज्यावर त्यांनी QR कोड मुद्रित केले ज्यात वैद्यकीय औषधांचा समावेश आहे. हा QR कोड म्हणजे एक द्वि-आयामी बारकोड आहे ज्यामध्ये यंत्राद्वारे वाचच येण्याजोगी माहिती समाविष्ट असते.

नव्या पद्धतीची मदत रोगीला मिळणार्‍या वैद्यकीय उपचाराप्रमाणे जुळवून घेण्यास होणार. शिवाय QR कोडच्या आकारामुळे ‘गोळी’ मध्येच त्यासंबंधी माहिती संग्रहित करण्यास मदत होते. फक्त एक द्रुत स्कॅन करून, त्या औषधी उत्पादनाबद्दल सर्व माहिती मिळवू शकता येणार ज्यामुळे चुकीची औषधे आणि बनावट औषधांच्या प्रकरणांची संख्या कमी होऊ शकते.