भारताची ‘चांद्रयान-२’ मोहीम ढकलली पुढ 
भारताची ‘चांद्रयान-२’ मोहीम येत्या ऑक्‍टोबरमध्ये सुरू होणार आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार, ही मोहीम पुढील महिन्यात सुरू होणार होती. मात्र, तज्ज्ञांनी आणखी काही चाचण्या सुचविल्यामुळे ही मोहीम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष के. सिवान यांनी दिली आहे.


या मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागावर बग्गी उतरवण्याचा प्रथमच प्रयत्न केला जाणार आहे.

इस्रो आणि इतर संस्था चंद्रावर मानवी वस्तीच्या शक्‍यतेचा अभ्यास करण्यासाठी काही प्रयोग राबवित आहेत. चंद्रावर मानवी वस्तीच्या उद्दिष्टासाठी विविध पर्यायांचा अभ्यास करण्यात येत आहे.



सांकेतिक भाषेचा ३००० शब्दांचा ‘पहिला’ भारतीय शब्दकोश 
नवी दिल्लीत इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांच्या हस्ते सांकेतिक भाषेसाठीचा ३००० शब्दांचा ‘पहिला’ भारतीय शब्दकोश प्रकाशित करण्यात आला आहे.

हा शब्दकोश मंत्रालयाच्या अखत्यारीत दिव्यांग व्यक्तींचे सशक्तीकरण विभाग (DEPwD) अंतर्गत असलेल्या भारतीय सांकेतिक भाषा संशोधन व प्रशिक्षण केंद्र (Indian Sign Language Research & Training Centre -ISLR&TC) कडून तयार करण्यात आला आहे.


२०११ सालच्या जनगणनेनुसार, भारतात ५०,७१,००७ कर्णबधिर लोक आणि १९,९८,५३५ असे ज्यांना बोलण्यासंबंधी विकार आहेत असे राहतात. भारतीय सांकेतिक भाषा (ISL) शब्दकोश ऐकू न शकणारी व्यक्ती आणि ऐकू शकणारी व्यक्ती यांच्यामध्ये संवाद बनविण्यास मदत करणार. 

शब्दकोशाला चार भागात वर्गीकृत केले गेले आहे. दैनंदिन आयुष्यात वापरले जाणारे शब्द; कायद्यासंबंधी शब्द; आरोग्यासंबंधी शब्द; तांत्रिक शब्द.



सिंगापूर एअरपोर्ट सलग सहाव्यांदा सर्वोत्कृष्ठ 
जगातील सर्वात उंच एअरपोर्ट स्लाइड, २४ तास मोफत सिनेमा, छतावर स्विमिंग पूल आणि सुंदर असे पार्क या सर्व गोष्टींनी सिंगापूरच्या चांगी एअरपोर्टला पुन्हा बेस्ट विमानतळाचा खिताब मिळाला आहे.

बेस्ट एअरपोर्टचा खिताब मिळवण्याची या विमानतळाची ही सलग ६ वी वेळ आहे. तसेच स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्डमध्ये यास एकूण ९ वेळा विजेता घोषित करण्यात आले आहे.

या सर्वेक्षणात जगभरातील ५५० विमानतळांचा समावेश करण्यात आला होता. यात प्रवाशांचा अनुभव, चेकइन, ट्रान्सफर, शॉपिंग, सिक्यॉरिटी आणि इमिग्रेशनसंदर्भात क्रमवारी देण्यात आले आहेत.


२४ मार्चला जगभरात ‘अर्थ अवर’ मोहीम 
२४ मार्च २०१८ रोजी जगभरात ‘अर्थ अवर’ म्हणजेच ‘पृथ्वीचा तास’ पाळला जात आहे.

अर्थ अवर २०१८ च्या निमित्ताने WWF-भारत आपल्या जीवनावर आणि पर्यावरणावर भार टाकणाऱ्या काही सवयी, पद्धती आणि जीवनशैलींवर नियंत्रण ठेवण्यासाठी संघटना, संस्था आणि व्यक्तींना प्रेरणा देण्यासाठी ‘गीव्ह अप टू गीव्ह बॅक’ पुढाकार सुरू करीत आहे.

‘अर्थ अवर’ ही पर्यावरण स्नेही चळवळीला मदत करणारी कृती आहे. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी जगभरात ‘अर्थ अवर’ ही चळवळ सुरु करण्यात आली असून त्या दरम्यान दीवे बंद करण्याचे आवाहन ही मोहिम चालवणारी वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड (WWF) संस्था करीत असते. 

१७८ देश या मोहिमेत सामिल झाले आहेत. ही परंपरा २००७ साली सुरू करण्यात आली.



ऑस्ट्रेलियाने कामासाठी दिला जाणारा व्हिसा कार्यक्रम रद्द केला 
अमेरिकेनंतर आता ऑस्ट्रेलियाने देखील आपला ४५७ व्हिसा कार्यक्रम रद्द केला आहे.

४५७ व्हिसा कार्यक्रमाला १८ मार्चला तात्पुरत्या स्किल्स शॉर्टेज व्हिसा प्रोग्रामाने बदलण्यात आले आहे. आता याजागी दुसरे कडक व्हिसा धोरण आणले जाणार. नव्या नियमामध्ये इंग्रजी भाषेवर चांगली पकड, कमीतकमी दोन वर्षांचा अनुभव, फौजदारी गुन्ह्यांबाबत व्यक्तीची तपासणी अश्या बाबी सादर केल्या जातील.

ऑस्ट्रेलियात वर्तमानात जवळजवळ ९०००० परदेशी नागरिक ४५७ व्हिसा कार्यक्रमाचा वापर करीत आहेत, त्यात भारतीयांची संख्या सुमारे २२% आहे. जुन्या ४५७ व्हिसा कार्यक्रमांतर्गत कंपन्या ऑस्ट्रेलियाच्या कामगारांची कमी पडल्यास परदेशी नागरिकांना चार वर्षांसाठी कामावर ठेवू शकत होती.