‘समग्र शिक्षा’: मनुष्यबळ विकास मंत्रालयाची योजना 
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून २४ मे २०१८ रोजी नवी दिल्लीत ‘समग्र शिक्षा’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. याचे उद्घाटन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.


प्रथमच अशी ‘समग्र शिक्षा’ ही बालवाडीपासून ते उच्‍च माध्‍यमिक पातळीपर्यंत राज्यांना मदत करणारी शालेय शिक्षणासाठीची एक एकात्मिक योजना आहे. 

शालेय शिक्षण व्यवस्थेत बदल करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेत बालवाडी, प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक पातळींचा विचार केला जाणार आहे.

शिक्षक आणि तंत्रज्ञान यांना एकात्मिक करून सर्व पातळीवर गुणवत्तेत सुधारणा करणे यावर योजना केंद्रीत आहे. योजनेसाठी २०१८-१९ मध्ये ३४००० कोटी रुपये आणि २०१९-२० मध्ये ४१००० कोटी रुपये एवढ्या रकमेची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. 

हा निधी शाळांमध्ये वाचनालय, क्रिडा साधने आणि अन्य बाबींवर खर्च केला जाईल



उत्तराखंडच्या टिहरीमध्ये ९ व्या राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचा शुभारंभ 
उत्तराखंडचे टिहरी सरोवर या ठिकाणी २५ मे २०१८ रोजी ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ अंतर्गत ९ व्या राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला आहे. संस्कृती मंत्रालयाने तीन दिवस चालणार्‍या या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

या दरम्यान उत्तराखंड पर्यटन यांच्यातर्फे दरवर्षी आयोजित केले जाणारे ‘टिहरी सरोवर महोत्सव’ याला राष्ट्रीय संस्कृती महोत्सवात समाविष्ट केले जाईल. 

भारत सरकारचे संस्‍कृती मंत्रालय २०१५ सालापासून राष्‍ट्रीय संस्‍कृती महोत्‍सवाचे आयोजन करीत आहे. भारतीय संस्कृतीच्या समृद्ध विविधतेचे आणि विशेषपणाचे प्रदर्शन या महोत्सवात घडविण्यात येते.



INSV तारीणीच्या पथकाचा नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मान 
भारत सरकारकडून INSV तारीणीच्या पथकामधील सहाही सदस्यांना ‘नारी शक्ती पुरस्कार-२०१७’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.
हा पुरस्कार महिला व बाल विकास मंत्री मनेका संजय गांधी यांच्या हस्ते नवी दिल्लीत एका कार्यक्रमात देण्यात आला. 

महिला कर्मचार्‍यांकडून संचालित INSV तारीणीने अलीकडेच पृथ्वीला प्रदक्षिणा घालत इतिहास रचला आहे. २५४ दिवसाच्या प्रवासात या पथकाने १९९ दिवसात २१६०० सागरी मैलाचा प्रवास पूर्ण केला.

या पथकात सर्व महिला सदस्य आहेत. यामध्ये लेफ्ट. कमांडर वर्तिका जोशी, लेफ्ट. कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्ट. कमांडर स्वाती पतारपल्ली, लेफ्ट. ऐश्वर्या बोडापत्ती, लेफ्ट. एस. विजयादेवी, लेफ्ट. पायल गुप्ता यांचा समावेश आहे.


कार्ल मार्क्सच्या हस्तलिखीतांचा लिलाव 
जगात सर्वात जास्त ज्यांचे साहित्य वाचले गेले आणि जाते असे जागतिक विचारवंत म्हणजे कार्ल मार्क्स. यांच्या’दास कॅपीटल’ या जगप्रसिद्ध ग्रंथाच्या हस्तलिखीतांचा तब्बल ५.२३ लाख डॉलरना (३.३४ दशलक्ष युआन) लिलाव करण्यात आला.

कार्ल मार्क्स यांची २०० वी जयंती निमित्ताने हा लिलाव करण्यात आला. १८५० ते १८५३ या तीन वर्षाच्या काळात मार्क्स यांनी १२५० पानी हस्तलिखीते लिहीली होती. त्यांनतर त्याचे ‘दास कॅपीटल’ ग्रंथामध्ये रुपांतर करण्यात आले.

चिन मधील ‘फेंग लुन’ या उद्योगपतीने ही हस्तलिखीते लिलावासाठी उपलब्ध करून दिली. या ग्रंथाचे एकूण तीन खंड आहेत. त्यातील पहिला खंड १८६७ मध्ये कार्ल मार्क्स यांच्या हयातील प्रसिद्ध झाला.


१८८३ मध्ये मार्क्स यांचा मृत्यू झाल्याने पुढील दोन खंड त्यांचा मित्र ‘फ्रेडरिक एंगेल्स’ आणि इतर सहकाऱ्यांनी मिळून प्रकाशीत केले. त्यातला दुसरा खंड १८८५ आणि तिसरा १८९४ मध्ये प्रकाशीत करण्यात आले. 

१९ व्या शतकात या ग्रंथांमधील तत्त्वज्ञानाच्या आधारावर जगभरातील अनेक देशांमध्ये साम्यवादी राजवटींचा उदय झाला होता.



१२ जूनला होणारी अमेरिका-उत्तर कोरिया शिखर परिषद रद्द 
१२ जून २०१८ रोजी सिंगापूरमध्ये नियोजित अमेरिका-उत्तर कोरिया शिखर परिषद रद्द करण्यात आली आहे. 

अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोन उन यांच्यातली नियोजित बैठक अमेरिकाकडून नाकारण्यात आली आहे. कोरियाच्या राष्ट्राध्यक्ष्यांनी अलीकडेच केलेल्या धमकीवजा वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर ही शांती बैठक नाकारण्यात आली आहे.



‘सूर्य किरण-१३’: भारत-नेपाळ यांचा संयुक्त युद्ध सराव 
उत्तराखंड राज्याच्या पिथौरागड शहरात ३० मे ते १२ जून २०१८ या कालावधीत भारत आणि नेपाळ यांचा ‘सूर्य किरण-१३’ हा संयुक्‍त युद्ध सराव आयोजित केला जाणार आहे.

दोन्ही देशांच्या लष्करांमधून जवळजवळ ३०० सैनिक भाग घेणार आहेत. या दरम्यान ते आपापसात आपल्या अनुभवांची देवाणघेवाण करतील.

सूर्य किरण हा भारत आणि नेपाळ या दोन देशांचा एक संयुक्त युद्ध सराव आहे. हा वर्षातून दोनदा आयोजित केला जातो, जो देशांमध्ये आळीपाळीने केला जातो