०१. आम आदमी पार्टीचे आमदार व माजी कायदा मंत्री जितेंद्रसिंह तोमर यांच्या बोगस डीग्रीचे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी करोल बागचे आमदार विशेष रवी या एका आप आमदाराच्या डीग्रीचा घोळ समोर आला आहे. 


०२. आमदार विशेष रवी यांच्या प्रतिज्ञापत्रात शैक्षणिक पात्रतेसंबंधीचे दोन वेगवेगळे उल्लेख आढळले आहेत. रवी यांनी निवडणुकीवेळी २०१३ साली दाखल दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात बीकॉमचा उल्लेख केला असून २०१५ साली त्यांनी बीए (IGNOU) असा उल्लेख केला आहे.


०३. पुरुषांच्या तुलनेत सर्वात कमी महिलांची संख्या असणारे राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरियानातील जींद जिल्ह्यामध्ये बीबीपूर गावाने ‘मुलगी वाचवा सेल्फी काढा’ या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या गावचे सरपंच सुनील जगलान आहेत. हरियाणामध्ये स्त्री आणि पुरूषांच्या संख्येमध्ये मोठा फरक अढळून येतो. २०१४मध्ये दर हजार पुरुषांमागे फक्त ८७१ स्त्रीया आहेत. मात्र २०१३च्या ८६८ तुलनेत ही आकडेवारी समाधानकारक आहे.


०४. ऑपरेशन म्यानमार/ऑपरेशन ऑलआउट/ ऑपरेशन फत्ते- या कारवाईमध्ये ‘एनएससीएन’ (के) आणि ‘केवायकेएल’ या दोन दहशतवादी संघटनांना विशेष लक्ष्य करण्यात आले होते. कारवाईत सहभागी झालेल्या कमांडोंचा कोड ‘पिनपॉइंट हेल्पे-डी’ असा होता. 


०५. लष्कराच्या एम १७ हेलिकॉप्टरमधूनही गोळीबार करण्यात आला. म्यानमारमध्ये घुसून करण्यात आलेले भारतीय लष्कराचे हे पहिलेच सर्जिकल ऑपरेशन मानले जात आहे. यापूर्वी १९९५ मध्ये ‘गोल्डन बर्ड’ या नावाने भारतीय लष्कर आणि म्यानमारने ‘सर्च अँड हंट’ ऑपरेशन राबविले होते. 


०६. यापूर्वी २००३ मध्ये भारतीय सैन्याने भूतानच्या सीमेत घुसून उल्फा अतिरेक्यांविरोधात कारवाई केली होती. लष्कर आणि हवाई दलाकडून परदेशी भूमीवर पहिल्यांदाच संयुक्त मोहीम राबविण्यात आली. या कारवाईसाठी लष्कराच्या गुप्तचर संस्थेबरोबरच ‘रॉ’ आणि अन्य संस्थांकडूनही माहिती गोळा करण्यात आली होती. लष्कराकडून प्रथमच ‘शोधा आणि उद्ध्वस्त करा’ असे धोरण अवलंबण्यात आले होते.


०७. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा शरद पवार

यांची निवड करण्यात आली. १९९९ मध्ये पक्षस्थापनेपासून शरद पवार

हेच पक्षाचे अध्यक्ष आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस टी. पी. पितांबर मास्टर यांनी पवार यांच्या नावाची घोषणा केली. पक्षाच्या सहाव्या राष्ट्रीय अधिवेशनात ही निवड करण्यात आली. 


०८. आघाडीची सोशल नेटवर्किंग साइट ‘ट्विटर‘चे मुख्य कार्यकारी अधिकारी डिक कोस्टोलो ०१ जुलै २०१५ रोजी आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. सीईओ पदाचा राजीनामा दिल्यानंतरदेखील कोस्टोलो संचालक मंडळाचे सदस्य म्हणून काम पाहत राहणार आहेत. कंपनीला नवीन सीईओ मिळेपर्यंत जॅक डोरसी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतील.


०९. राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने १० हजार महिलांना महिलांना फ्लिट टॅक्सी चालविण्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असून या प्रशिक्षणाबाबत महिला व बालविकास विभागचा आय केअर लर्निंग कंपनीशी करार झाला आहे. 



१०. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या उद्देशाने महिला व बालविकास विभागाने महिलांना तीन महिन्यांचे फ्लिट ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम ठरविला आहे. आय केअर लर्निंग कंपनीकडून महिलांना मोफत ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण दिले जाईल. 


११. महिलांना वाहन चालविण्याबरोबरच स्वसंरक्षण, संवाद कौशल्य, संबंधित शहरांची रचना, रस्ते व नकाशे आदींची माहिती प्रशिक्षणात दिली जाणार आहे. राज्याच्या प्रत्येक तालुक्यात महिलांना हे प्रशिक्षण दिले जाईल. 


१२. फ्लिट टॅक्सीच्या ड्रायव्हिंगच्या प्रशिक्षणानंतर राज्यातील प्रमुख फ्लिट टॅक्सी ऑपरेटर कंपन्यासोबत करार करुन प्रशिक्षीत महिलांना रोजगार देण्यात येणार आहे. राज्यातील बचत गटाच्या आणि इतर महिलांचा कौशल्य विकास करण्यासाठी महिला व बालविकास विभागाने पुढाकार घेतला आहे.


१३. तैवानमधील कोणती फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी महाराष्ट्रात प्रकल्प सुरू करुन अॅपल कंपनीच्या आयफोनची निर्मिती करण्याचा विचार करत आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यास भारतात आयफोन स्वस्तात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 



१४. ‘मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन’ या आवडत्या आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ९० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, प्रकल्पाला अर्थसहाय्याची तयारी दर्शविणाऱ्या जपानच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेने (जायका) त्याचा मसुदा केंद्र सरकारला सादर केला आहे. मुंबई-अहमदाबाददरम्यान ताशी साडेतीनशे किंवा त्याहून जास्त वेगाने ५२८ किमी अंतर ही बुलेट ट्रेन कापणार आहे.


१५. रिक्षा-टॅक्सींच्या भाडे सुसूत्रीकरणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या हकीम समितीचा अहवाल फेटाळण्यात आला असून सुधारीत शिफारशी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या समितीत वित्तीय बाबींशी संबंधीत प्रतिनिधी तसेच परिवहन क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती म्हणून सेवा निवृत्त परिवहन आयुक्त हे या समितीचे सदस्य असतील.



१६. हकीम समितीने दरवर्षी १ मे रोजी भाडेवाढ करण्याची शिफारस केली होती. हकीम समितीच्या भाडेवाढीच्या सूत्रामध्ये इंधनाची दरवाढ, रिक्षा किंवा टॅक्सीची किंमत, महागाई, सुटय़ा भागांची किंमत आदी गोष्टींचा विचार केला जात होता. या गोष्टींची किंमत अधिक ठरल्यास त्या तुलनेमध्ये भाडेवाढ दिली जात होती. 


१७. हकीम समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार मागील तीन वर्षामध्ये रिक्षा आणि टॅक्सी यांचे निश्चित करण्यात आलेले भाडेदर याबाबत विचारात घेवून हकीम समितीच्या अहवालातील शिफारशींवर पुर्नविचार करून बदललेल्या परिस्थितीनुसार सरकारला सुधारीत शिफारशी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. 


१८. ‘इन्कम टॅक्स रिटर्न्स’चा तपशील हा माहितीच्या अधिकारात सर्वसामान्य व्यक्तीलाही मिळायला हवा, अशी याचिका मुंबई हायकोर्टात आरटीआय कार्यकर्ते शैलेश गांधी  मांडली होती.  माजी मुख्यमंत्री अजित पवारांच्या ‘आयटी रिटर्न्स’ची मागणी गांधी यांनी केली होती. ही याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे.


१९. हायकोर्टाने ही याचिका मान्य केली असती तर सर्वच लोकप्रतिनिधींच्या मिळकतीची माहिती ही माहितीच्या अधिकाराच्या कक्षेत येण्याचा मार्ग मोकळा झाला असता. 


२०. मात्र, राज्यघटनेतील तरतुदीप्रमाणे व्यक्तिगत जीवनाचे खासगीपण जपणे हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. सुप्रीम कोर्टाचेही याविषयी निवाडे आहेत. त्यामुळे माहिती अधिकार कायद्यातील कलम ८ (१) (जे)मध्ये असलेल्या अटीची पूर्तता होत नसेल तर माहिती देण्यास नकार देण्याचा माहिती अधिकाऱ्यांना अधिकार आहे. 



२१. व्यापक जनहित असल्याचे पटण्याजोगे कारण याचिकादारांनी निर्विवादपणे मांडलेले नसल्याने प्रथम अपिलिय अधिकारी आणि मुख्य माहिती आयुक्तांनी अर्ज फेटाळण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. त्यामुळे यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असे न्या. आर. एम. सावंत यांनी नमूद केले. 


२२. क्वाकारेली सायमंड (QS) तर्फे दरवर्षी आशियातील सर्वोत्तम विद्यापीठांची यादी जाहीर करण्यात येते. त्यानुसार शैक्षणिक वर्षे २०१४-१५ मध्ये आशिया खंडातील विद्यापीठांमध्ये मुंबई विद्यापीठाने यंदा १२५व्या स्थानावर झेप घेतली आहे. गेल्या वर्षी मुंबई विद्यापीठ १३१व्या स्थानावर होते. 


२३. ‘ट्रिपअॅडव्हायजर’ या पर्यटनाच्या क्षेत्रातील आघाडीच्या वेबसाइटच्या ‘२०१५ ट्रॅव्हलर्स चॉइस पुरस्कारां’मध्ये जगभरातील पर्यटकांच्या पसंतीच्या स्थळांमध्ये कंबोडियामधील अंगकोर वाट या मंदिराने अव्वल स्थान पटकावले आहे. 


२४. कंबोडियातील अंगकोर वाट हे तब्बल ४०० चौ. किमी भागात पसरलेले महत्त्वपूर्ण पुरातत्त्व स्थळ युनेस्कोच्या जागतिक वारशाच्या यादीत समाविष्ट आहे. नवव्या ते पंधराव्या शतकात इथे राज्य करणाऱ्या खमेर राज्यकर्त्यांची ही राजधानी. कंबोडियाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या देशाच्या राष्ट्रध्वजावरही या मंदिराला स्थान मिळाले आहे.


२५. ट्रिपअॅडव्हायजर’च्या ‘२०१५ ट्रॅव्हलर्स चॉइस पुरस्कारां’मध्ये पेरूमधील माचू पिचू या पुरातन शहराने दुसरा, तर भारतातील प्रेमाचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या ताजमहालाने तिसरा क्रमांक पटकावला. आघाडीच्या पाच पर्यटन स्थळांमध्ये अबूधाबीतील शेख झायेद मशीद आणि बार्सिलोना-स्पेनमधील बॅसिलिका ऑफ सागराडा फॅमिलिया यांचा समावेश आहे.