०१. इंग्रजकाळापासून मान्यवरांच्या स्वागतासाठी सुरू झालेली गार्ड ऑफ ऑनरची परंपरा मोडीत काढण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.त्यामुळे यापुढे मंत्री, मुख्यमंत्री, वरीष्ठ राज्य अधिकारी यांना गार्ड ऑफ ऑनर दिला जाणार नाही.  इंग्रजांच्या काळात गर्व्हनर, व्हाईसरॉय यांच्यासाठी गार्ड ऑफ ऑनरची परंपरा पाळली जात होती.


०२. आता ती पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री तसेच वरीष्ठ सरकारी अधिकारी यांच्यासाठीही पाळली जात होती. मात्र ही परंपरा म्हणजे वेळ आणि पोलिस संसाधने वाया घालविण्याचा प्रकार असल्याने ती बंद केली गेल्याचे सांगितले जात आहे.

०३. भारतीय रिझर्व्ह बँकेनी २००५ पूर्वीच्या नोटा बदलून घेण्याची तारीख ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत वाढविली आहे. ही मुदत ३० जून, २०१५ पर्यंत होती. २००५ पूर्वी छापण्यात आलेल्या नोटा बँकांमध्ये जाऊन बदलून घेण्यात याव्यात असा आदेश रिझर्व्ह बँकेनी काढला आहे.

०४. महात्मा गांधींचे चित्र असलेल्या नोटा मागील १० वर्षापासून वापरामध्ये आहे. आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे नोटा असणे आवश्यक असल्यामुळे रिझर्व्ह बँकेनी हा निर्णय घेतला आहे.जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची आवश्यक काळजी रिझर्व्ह बँक घेणार असल्याची ग्वाही बँकेनी दिली आहे.

०५. जेष्ठ गायिका आशा भोसले यांना बॉलिवूडमधील आजवरची सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका असल्याचे ब्रिटनमधील इस्टर्न आय न्युजपेपरने घोषित केले आहे.अव्वल क्रमांकावर आशा भोसले यांना स्थान देताना भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांना दुसऱ्या स्थानाचे मानकरी ठरवले आहे. 

०६. गायकाने एकूण गायिलेली गाणी, आंतरराष्ट्रीय प्रभाव, गाण्यातील विविधता, चाहता वर्ग आणि संगीत क्षेत्रातील लोकप्रियता या निकषांचा विचार ही क्रमवारी ठरवताना करण्यात आला होता.आशा भोसले यांनाही या घोषणेमुळे आश्चर्य वाटले असून इस्टर्न आय न्युजपेपरचे त्यांनी आभार मानले आहेत.

०७. लता मंगेशकर यांना दुसरे स्थान मिळाले तर मोहम्मद रफी यांना तिसरे आणि किशोर कुमार यांना चौथे स्थान या क्रमवारीत मिळाले आहे. इतर २० कलाकारांच्या क्रमवारीत स्थान मिळालेले कलाकार आहेत मुकेश (५ वा क्रमांक ) सध्याची बॉलिवूड क्विन श्रेया घोषाल ( ७ वा क्रमांक ) गीता दत्त ( १० वा क्रमांक ) सोनु निगम ( १४ वा क्रमांक ) कुमार सानू ( १७ वा क्रमांक ) आणि कविता कृष्णमुर्ती ( १९ वा क्रमांक ) 


०८. १०० स्मार्ट शहरे विकासातल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर स्मार्ट शहरे योजनेंतर्गत, दोन टप्प्यात होणाऱ्या स्पर्धेच्या माध्यमातून केवळ पात्र शहरेच निवडण्यात येणार आहेत. स्मार्ट शहर योजनेचा आज शुभारंभ करताना योजनेसंदर्भात कार्यान्वयन मार्गदर्शक सूचनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आल्या.

०९. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आपापल्या शहरांच्या दुसऱ्या टप्प्यातल्या स्पर्धेसाठी पात्र ठरू शकतील अशा निकषांवर मूल्यमापन करतील. गुणवत्तेनुसार त्यांची क्रमवारी करतील.राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी नामनिर्देशित केलेली पात्र १०० शहरे आपला स्मार्ट शहर आराखडा तयार करतील. 

१०. या आराखड्याचे स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात काटेकोरपणे मूल्यमापन केले जाईल. त्यानुसार वित्तीय सहाय्यासाठी प्राधान्य दिले जाईल. दुसऱ्या टप्प्यातल्या या पहिल्या फेरीत यावर्षी देण्यात येणाऱ्या वित्तीय सहाय्यासाठी पहिल्या २० गुणवत्ताधारकांची निवड केली जाईल.

११. ऑक्सफर्ड डिक्शनरीने अस्सल भारतीय अरे यार, चुडीदार, भेळपुरी आणि ढाबा हे शब्द इंग्रजी शब्द म्हणून स्वीकारले असून त्याचा समावेश डिक्शनरीत केला आहे. त्यामुळे अरे यार हे केवळ हिंदुस्तानी संबोधन राहिलेले नाही तर ते इंग्रजी संबोधनही झाले आहे.

१२. ऑक्सफर्ड इंग्लीश डिक्शनरीच्या सल्लागार संपादन डॉ, डानिका साल्जर म्हणाल्या की भाषेवर मोठ्या प्रमाणावर केलेल्या संशोधनात हे शब्द इंग्रजी भाषेतही वापरात असल्याचे दिसून आले आहे. या शब्दांचे स्वतःचे असे सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि भाषामहत्त्व आहे.१८४५ पासून हे शब्द इंग्रजीत वापरले जात असल्याचे पुरावे मिळाले आहेत. 

१३. चुडीदार हा शब्द १८८० पासून इंग्रजी भाषेत वापरला जात आहे मात्र डिक्शनरीत सामील होण्यासाठी त्याला १३५ वर्षांची प्रतीक्षा करावी लागली आहे.या शब्दाचा अर्थ दक्षिण आशियात घातला जाणारा व अंगाबरोबर बसणारा व घोट्यापाशी चुन्या असणारा ट्राऊजर असा देण्यात आला आहे.

१४. नरेंद्र मोदी यांनी रविवारी प्रथम आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त १० आणि १०० रूपयांचे विशेष नाणे आणि स्मरणिका मुद्रांक तिकीट प्रसिध्द केले आहे. 

१५. पंतप्रधान मोदी यांनी समग्र आरोग्यासाठी योगनिमित्ताने दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय सम्मेलनाच्या उद्घटनानंतर वित्त मंत्रालयाद्वारे तयार नाण्याचे उद्घाटन केले.यानंतर त्यांनी संचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत कार्यरत टपाल विभागाद्वारे ५ रूपये मूल्याचे स्मारक मुद्रांक प्रसिध्द केले. 

१६. नाण्यांवर आणखी एका आंतरराष्ट्रीय योग दिवासाचे प्रतिक चिन्ह आणि दुसरीकडे त्याचे मूल्य दर्शविले आहे.या निमित्त वित्त राज्य मंत्री जयंत सिंन्हा, आयुष मंत्री श्रीपाद नाईक, योग गुरू बाबा रामदेव आणि १५२ देशांचे राजनैतिकांसोबत मोठ्या संख्येमध्ये प्रतिष्ठीत लोक उपस्थित होती. 

१७. त्रिदल‘ संस्थेने स्थापन केलेल्या पुण्यभूषण फाउंडेशनचा “पुण्यभूषण‘ पुरस्कार ”  यंदा सकाळ चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना  राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

१८. इंग्रजी शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन अलिगड मुस्लिम विद्यापीठाने,  ख्रिश्चयन मिशनऱ्यांच्या धर्तीवर इंग्रजी शाळांच्या स्थापनेचा निर्णय घेतला आहे. मुस्लिम विचारवंत सर सय्यद अहमद खान यांनी १४० वर्षांपूर्वी या विद्यापीठाची स्थापना केली होती. 

१९. सर सय्यद यांनी उत्तर प्रदेशांतील अलीगढ येथे मोहमेडन अँग्लो-ओरिएंटल महाविदयालय स्थापन केले (१८७५). त्यानंतर १९२० मध्ये महाविद्यालयाचेच पुढे अलीगढ मुस्लिम विद्यापीठात रुपांतर झाले.

२०. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर १८७६ मध्ये त्यांनी पवित्र कुराणावर भाष्य लिहिण्यास आरंभ केला. १८७८ मध्ये व्हाइसरॉयच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलवर त्यांची नियुक्ती करण्यात आली. 

२१. १८८३ मध्ये अलीगढ- मध्ये त्यांनी मोहमेडन असोसिएशनची स्थापना केली. त्याचप्रमाणे १८८६ मध्ये त्यांनी मोहमेडन एज्यूकेशनल कॉन्फरन्सची स्थापना केली. मुस्लीम समाजाची सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टी बदलावी, हे या संघटनेचे उद्दिष्ट होते. 

२२. १८८७ मध्ये लॉर्ड डफरिन यांनी त्यांना सिव्हिल सर्व्हिस कमिशनचे स्वीकृत सदस्य केले. १८८९ मध्ये एडिंबरो विदयापीठाने त्यांना एल्एल्.डी. ही सन्माननीय पदवी प्रदान केली. ‘रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन’चे ते सन्माननीय सदस्य होते.

२३. सर सय्यद यांना इतिहास, राजकारण, पुरातत्त्वविदया, पत्रकारी, साहित्य अशा अनेक विषयांमध्ये स्वारस्य होते. बरानीचे तारीख-इ-फिरोझशाही, अबुल फज्लची आइन-ए-अकबरी, जहांगीरचे तुझुक हे ग्रंथ त्यांनी संपादिले. 

२४. बायबल वर त्यांनी भाष्य लिहिले (तबियिन-उल-कलाम ). धर्मांच्या तौलनिक अभ्यासाचा हा पहिला प्रयत्न मानला जातो. १८५७ च्या उठावानंतर त्यांनी लिहिलेले हिस्टरी ऑफ बिजनोर आणि हिस्टरी ऑफ द रिव्होल्ट ऑफ बिजनोर हे ग्रंथही महत्त्वाचे आहेत.

२५. चेन्नई मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील सेवेला तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी २९ जून २०१५  रोजी हिरवा कंदील दाखविला.  चेन्नईकरांसाठी प्रथमच मेट्रो सेवा उपलब्ध झाली असून कोयंबेदू आणि आलंदूर या दोन स्थानकांदरम्यान दहा किलोमीटरच्या अंतरावर ही मेट्रो सेवा सुरू झाली आहे.या मेट्रो मार्गाचे ऑक्टोबर २०१४ मध्ये उद्घाटन होणार होते. त्यानंतर हे उद्घाटन मार्च २०१५ मध्ये लांबणीवर टाकण्यात आले होते.