विनायक दामोदर सावरकर

जन्म: २८ मे १८८३ (भगूर, नाशिक, महाराष्ट्र)
मृत्यू: २६ फेब्रुवारी१९६६ (दादर,मुंबई,महाराष्ट्र)
वडील: दामोदर सावरकर
आई: राधा सावरकर
पत्नी: यमुनाबाई विनायक सावरकर

वैयक्तिक जीवन व शिक्षण

०१. सावरकर हे एक हिंदुत्ववादी, मराठी भाषेतील कवी व लेखक होते. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदुसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते. त्यांना स्वातंत्र्यवीर अशी प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिली.
०२. वि.दा. सावरकरांना बाबाराव हे मोठे आणि नारायणराव हे धाकटे भाऊ होते. सावरकर ९ वर्षाचे असताना १८९२ साली त्यांची आई वारली. थोरल्या बंधूंच्या पत्नी येसूवहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला. सावरकरांचे वडील १८९९ च्या प्लेगला बळी पडले.
०३. सावरकरांचे प्राथमिक शिक्षण भगुर तर माध्यमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात.
०४. मार्च १९०१ मध्ये विनायकराव यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले. त्याचवर्षी ते मैट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. लग्नानंतर २४ जानेवारी १९०२ रोजी त्यांनीफर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. २१ डिसेंबर १९०५ रोजी त्यांनी मुंबई विद्यापीठाची बी.ए. ची पदवी मिळविली. श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी ठेवलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर जुलै १९०६ मध्ये लंडनला गेले. ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सुचना स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती. मुंबईच्या विल्सन लॉ कॉलेजातून त्यांनी एलएलबी केली.
०५. माध्यमिक शिक्षण घेत असतानाच त्यांनी चाफेकरांकडून प्रेरणा घेतली. परांजप्यांच्या ‘काळ’ या वृत्तपत्राने त्यांना राष्ट्रभक्तीची स्फूर्ती दिली. टिळकांची बुद्धी, फडके-चाफेकरांची कृत्ये व ‘काळ’ची स्फूर्ती असा संगम त्यांच्या आयुष्यात झाला.
०६. सरकारी कामावर नियंत्रण ठेवता यावे, गुप्त माहिती काढावी, हेरगिरी करावी यासाठी सावरकरांनी संघटनेचे सभासद सरकारी नोकरीत ठेवले. टिळक व सावरकरांचे संबंध घनिष्ठ होते ही गोष्ट गोपाल कृष्ण गोखले यांनी मोर्ले यांस सांगितली.

७ जानेवारी १९२५ रोजी कन्या “प्रभात” हिचा जन्म झाला. १७ मार्च १९२७ रोजी पुत्र “विश्वास” याचा जन्म.

एप्रिल १९१९ मध्ये बाबारावांच्या पत्नी सौ.येसुवहिनींचे निधन झाले. १६ मार्च १९४५ रोजी वडील बंधु श्री.गणेशपंत(तथा बाबाराव) यांचे निधन, सांगली. १९ ऑक्टोबर १९४९ रोजी धाकटे बंधु डॉ. नारायणराव यांचे निधन.

स्वातंत्र्य चळवळ

०१. राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरानी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने १९०६ साली स्थापन केली. १९०० साली स्थापन केलेली मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे १९०४ साली अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले. इटालियन क्रांतिकारक आणि विचारवंत जोसेफ मॅझिनी ह्याच्या यंग इटली ह्या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते.
०२. सावरकरांच्या क्रांतीविचारांचा प्रभाव महाराष्ट्राबाहेरही थोर क्रांतिकारक गदर पार्टीचे लाला हरदयाल, मादाम कामा, चक्रवर्ती राजागोपालाचारी, बाळासाहेब खेर, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्यापर्यंत पोहोचला होता. सावरकरांनी पुण्यामध्ये १९०५ साली दसऱ्याच्या दिवशी फर्ग्युसन कॉलेजच्या जवळ परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली विदेशी कापडाची पहिली होळी केली. सावरकरांनी ‘राष्ट्रवाद’ या संकल्पनेला वेगळा अर्थ दिला. ‘राष्ट्रहित हाच नीती – अनीती चा निकष मानून राष्ट्राला जीवनाचे केंद्रस्थानच दिले.
०३. १९०७ साली लंडनमधील इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी इटलीचा महान देशभक्त कवी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विषद केले होते. बाबाराव सावरकरांनी हे चरित्र छापले. २ मे १९०८ रोजी लंडनमध्ये प्रथम शिवजयंत्युत्सव साजरा केला. २४ ऑक्टोबर १९०९ रोजी बैरीस्टर गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लंडनमध्ये दसऱ्याचा उत्सव साजरा केला गेला.
०४. लंडनमध्ये ‘इंडिया हाउस’ मध्ये अभिनव भारताचे क्रांतिपर्व सुरू झाले. मदनलाल धिंग्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य. मदनलालने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध करून फाशी स्वीकारली. त्यास १७ ऑगस्ट १९०९ रोजी फाशी दिली गेली. स्वतंत्र आंदोलनातील मदनलाल धिंग्रा हा परकीय भूमीवरील पहिला हुतात्मा ठरला. मे १९०९ मध्ये ते बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण झाले पण पदवी स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला.
०५. धिंग्राला अटक झाल्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडमध्ये जैकसन हॉल मध्ये धिंग्राच्या निषेधाची सभा राजनिष्ठानी भरविली. तेव्हा सावरकरांनी धिंग्रावरील आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाहीत तोपर्यंत त्यास समजून घेऊन निषेध करू नये असे सांगितले. त्या सभेत बॅरिस्टर पाथरने सावरकरांवर हल्ला केला पण एम.पी.टी. आचार्यांनी पाथरवर पिस्तुल रोखली.
०६.जून १९०९ मध्ये त्यांचे वडील बंधु श्री.बाबाराव यांना जन्मठेप-काळेपाणी-शिक्षा ठोठावण्यात आली. त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. ते तंत्रज्ञान व २२ ब्राऊनिंग पिस्तुले त्यांनी चतुर्भुज अमीन याच्या हस्ते भारतात पाठवली. त्यापैकीच एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कान्हेरे या १६ वर्षाच्या युवकाने केला.
०७. कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते, तसेच तो बाबाराव सावरकर (स्वातंत्र्यवीरांचे बंधू) यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता, म्हणूनच क्रांतिकारकांनी जॅक्सनला यमसदनास पाठवले. या प्रकरणात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या अभिनव भारताच्या ३ सदस्यांना फाशी झाली.
०८. हवापालटासाठी जानेवारी १९१० मध्ये  सावरकर फ्रान्सला गेले. मायदेशी भारतात परतण्यासाठी १३ मार्च १९१० रोजी ते इंग्लंडला आले. नाशिकच्या प्रकरणात वापरलेली पिस्तुले सावरकरांनी धाडली होती. याचा सुगावा ब्रिटिशांना लागला होता. त्यामुळे इंग्लंडमध्ये पोहोचताच ब्रिटिशानी सावरकरांना तात्काळ अटक केली. त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला.
०९. खटला भारतात चालविण्यासाठी समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना १ जुलै १९१० रोजी सावरकरांनी फ्रांन्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीच्या पोर्टहोलमधून उडी मारली. त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला. पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही, आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना परत अटक करून भारतात आणले.
१०. २२ जुलै १९१० रोजी त्यांना मुंबईत आणले गेले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. २४ डिसेंबर १९१० रोजी त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. परंतु पुन्हा ३१ जानेवारी २०११ रोजी सरकारविरुद्ध युद्धास प्रोत्साहन दिले म्हणून त्यांना दोन जन्मठेपांची काळ्या पाण्याची शिक्षा (सुमारे ५० वर्षे अंदमानच्या तुरुंगात) ठोठावण्यात आली.
११. ४ जुलै १९११ पासून अंदमानच्या कारावासास प्रारंभ झाला.  अंदमानच्या काळकोठडी बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली.अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांना भारताचे बदलते राजकारण दिसत होते. हिंदू संघटन करणे आवश्यक आहे हे सावरकरांनी ओळखले.

१२. नोव्हेंबर १९२० मध्ये धाकटे बंधु डॉ. नारायणरावांनी अंदमान कारागृहात जाऊन सावरकरांची भेट घेतली. २ मे १९२१ रोजी बाबाराव आणि तात्याराव दोघांची अंदमानातून भारतात पाठवणी. १९२१ साली अलिपूर(बंगाल) आणि १९२२ साली  रत्नागिरी येथील बंदिवासात ठेवण्यात आले.

१३. विठ्ठलभाई पटेल, रंगस्वामी अय्यंगार यांसारख्या नेत्यांनी सावरकरांच्या सुटकेसाठी प्रयत्न चालविला. खुद्द सावरकरांनी ब्रिटीशांकडे माफीचा अर्ज सादर केला. त्यानंतर तत्कालीन भारताचे व्हाईसरॉय व गवर्नर यांनी काहीं अटींवर ४ जानेवारी १९२४ रोजी सावरकरांची तुरुंगातून मुक्तता केली.

५ फेब्रुवारी १९४८ रोजी गांधी-वधानंतर सुरक्षा-निर्बंधान्वये सावरकरांना अटक झाली. १० फेब्रुवारी १९४९ गांधी-वध अभियोगातून निष्कलंक सुटका झाली. ४ एप्रिल १९५० रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अलींची दिल्लीला घेतली भेट म्हणून अटक आणि बेळगाव कारागृह-वास झाला.

सामाजिक जीवन

०१. हिंदू समाजाच्या अध:पतनाला जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य जबाबदार आहे, हे सावरकरांनी लक्षात घेऊन त्या विरोधात काम केले. स्वकीयांतील जातीयतेवरपण निर्भीड टीका केली.
०२. हिंदू धर्मात असलेली अस्पृश्यता त्यांना कधीच मान्य नव्हती. त्यांनी रत्नागिरीमधील वास्तव्यामध्ये जवळपास ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी हिंदू भगिनींचे हळदी कुंकू, सह भोजने, मिश्र भोजने भजन-कीर्तन आयोजित केले. त्यांनंतर सर्वांसाठी ‘पतित पावन मंदिर’ सुरू केले व सर्वांसाठी सामाईक भोजनालयही सुरू केले. ‘पतित पावन’ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सावरकरांनी डॉ. आंबेडकरांना बोलविले होते.
०३. जातीव्यवस्थेतून  समाजव्यवहारात काही बंधने निर्माण झाली आहेत. सावरकर त्यांना सप्तशृंखला असे म्हणतात. वेदबंदी, व्यवसाय बंदी, स्पर्श बंदी, सिंधू बंदी, शुद्धी बंदी, भोजन बंदी, विवाह बंदी या सात शृंखला आहेत. समाजाने वेद वाङ्मय झुगारून द्यावे असे त्यांनी हिंदू समाजाला आवाहन केले.
०४. १९२४ ते १९२६ या काळात शुद्धीबंदी मोडून त्यांनी पूर्वी धर्मांतर केलेल्या अनेक मुस्लिमांना हिंदू धर्मात प्रवेश दिला. विवाहबंदीच्या कल्पनेला त्यांचा सक्त विरोध होता. याबाबत सावरकरांनी अत्यंत सावध भूमिका घेतली होती. ‘उभयपक्षी योग्य ती दक्षता घेऊन आंतरजातीय विवाह व्हावेत असे सावरकरांचे मत होते.
०५. सावरकरांनी आपल्या हिंदुत्वनिष्ठ राजकारणात राष्ट्र आणि राज्य या दोन वेगळ्या संकल्पना मानल्या होत्या. त्यांच्या हिंदू राष्ट्र या संकल्पनेत हिंदुशिवाय अन्य धर्मियांना स्थान देता येत नव्हते. परंतु राज्य या संकल्पनेत अहिंदूंना समान न्याय देण्याची त्यांची तयारी होती. ‘राजकारणाचे हिंदूकरण व हिंदूंचे लष्करीकरण’ ही सावरकरांची घोषणा होती. साहित्यिकांना ‘लेखण्या मोडा, बंदुका घ्या’ असा सल्ला त्यांनी दिला. १० जानेवारी १९२६ रोजी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ ‘श्रद्धानंद’ साप्ताहिक मुंबईत सुरू केले.

१ मार्च १९२७ रोजी रत्नागिरीत गांधीजी व सावरकर यांच्यात भेट आणि चर्चा झाली. २२ सप्टेंबर १९३१ नेपाळचे राजपुत्र हेमसमशेर जंगबहादुर राणा यांनी भेट दिली. २२  जून१९४१ रोजी सुभाषचंद्र बोस अवचित सावरकर-सदनात येऊन भेटले.

०६. सावरकरांनी अतिशय स्पष्ट शब्दात जातिव्यवस्थेवर हल्ला केला. अनुवंशात जातीचे मूळ आहे. त्या मुळावरच सावरकरांनी हल्ला चढवत अनुवंश हा आचरटपणा आहे, जर ब्राह्मणाच्या घरी ‘ढ’ जन्मला तर त्याला ‘ढ’च म्हटले पाहिजे आणि जर शूद्रांत ‘ज्ञ’ निघाला तर त्याला ‘ज्ञ’च म्हटले पाहिजे, मग त्याचा बाप, आजा अथवा पणजा ‘ढ’ असो की ‘ज्ञ’ असो.

हिंदू महासभेचे कार्य

०१. अंदमान येथून सुटका झाल्यानंतर रत्नागिरीत सावरकर १९२४ ते १९३७ पर्यंत सुमारे १३ वर्षे स्थानबद्धतेत होते. १९३७ साली भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्या प्रांतात कॉंग्रेस सत्तेवर आली. कुपर मंत्रीमंडळातील अर्थमंत्री जमनादास मेहता यांच्या प्रयत्नाने स्थानबद्धतेतून सावरकरांची १० मे १९३७ रोजी बिनशर्त मुक्तता झाली. त्यानंतर त्यांनी क्रांतीकारकांशी संबंध ठेवला नाही. १९२३ साली मुंबईचे राज्यपाल लाईड जार्ज यांची सावरकरांच्या मुक्ततेविषयी चर्च खाली.
०२. १९३७ पासून सुमारे सात वर्षे, सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषविले. झंझावाती दौरे, मोठ्यामोठ्या सभा, हिंदूंची सैन्यभरती, रॉयल क्लब्सची स्थापना अशा अनेक मार्गांनी त्यांनी हिंदू महासभेचे कार्य केले. त्यांनी आधुनिक विचारधारेप्रमाणे बुद्धिवाद व विज्ञाननिष्ठा यांची कास धरून हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी लढा दिला.

साहित्य

०१. १८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. ‘अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर’ हा तो ग्रंथ होय. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. १८५७ चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथाद्वारे, १८५७ च्या युद्धाचा पहिले स्वातंत्र्यसमर असा उल्लेख करून तो लढा त्यांनी पहिल्यांदा भारतीय स्वातंत्र्यलढ्यास जोडला.
०२. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला होता. म्हणून हा मराठी ग्रंथ महाराष्ट्रात कोणी छापत नसल्यामुळे त्याचे इंग्रजीत भाषांतर केले, तेही लंडनमध्ये कोणी छापत नाही म्हणून ते हॉलंड येथे छापले. या ग्रंथाचे प्रकाशन बॅरिस्टर राणा यांच्या अध्यक्षतेखाली १८५७ च्या उठावाच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त १० मे १९०७ रोजी ‘इंडिया हाउस’च्या सभागृहात भरगच्च उपस्थितीत समारंभपूर्वक झाले.
०३. ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून ठेवले होते. ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रसिद्ध झाले. त्याचदरम्यान त्यांनी लिहिलेल्या शिखांच्या इतिहासाच्या तीन हस्तलिखित प्रती प्रकाशनाविना राहिल्या.
०४. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या भाषाशैलीत प्रतिबिंबित झाले आहे. सावरकरांचे पहिले काव्य म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका. सावरकरांनी त्यांच्या कविता महाविद्यालयात, लंडनच्या वास्तव्यात, अंदमानच्या काळकोठडीत आणि रत्‍नागिरीत रचल्या. तत्कालीन लोकप्रिय असलेल्या ‘केसरी’ व ‘काळ’ या वृत्तपत्रांतून त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत.
०५. सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगात असताना काही उर्दू गझला लिहिल्या होत्या. त्या जुलै २०१३ मध्ये सापडल्या. नंतर त्या गझला अमिताभ बच्चन यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाल्या.
०६. सावरकरांनी विचारप्रवर्तनाबरोबरच भाषाशुद्धीचे प्रत्यक्ष कार्य केले. अर्थसंकल्प (बजेट), उपस्थित (प्रेजेंट), क्रमांक (नंबर), क्रीडांगण (ग्राउंड), गणसंख्या (कोरम), गतिमान, चित्रपट (सिनेमा), झरणी (फाऊन्टनपेन), टपाल (पोस्ट), तारण (मॉटर्गेज), त्वर्य/त्वरित (अर्जंट), दिग्दर्शक (डायरेक्टर), दिनांक (तारीख), दूरदर्शन (टेलिव्हिजन), दूरध्वनी (टेलिफोन), ध्वनिक्षेपक (लाऊड स्पीकर), नगरपालिका (म्युनिसिपालिटी), नभोवाणी (रेडिओ), निर्बंध (कायदा), नेतृत्व (लीडरशिप), नेपथ्य, परीक्षक (एक्झॅमिनर), पर्यवेक्षक (सुपरवायझर), प्रतिवृत्त (रिपोर्ट), प्राचार्य (प्रिन्सिपॉल), प्राध्यापक (प्रोफेसर), बोलपट (टॉकी), मध्यांतर (इन्टर्व्हल), महापालिका (म्युुनिसिपल कॉर्पोरेशन), महापौर (मेयर), मुख्याध्यापक (हेड मास्टर), मूल्य (किंमत), विधिमंडळ (लेजिस्लेटिव्ह असेम्ब्ली), विशेषांक (खास अंक), विश्वस्त (ट्रस्टी), वेतन (पगार), वेशभूषा (कॉश्च्यूूम), शस्त्रसंधी (सीझ फायर), शिरगणती (खानेसुमारी), शुल्क (फी), संचलन (परेड), सार्वमत (प्लेबिसाइट), सेवानिवृत्त (रिटायर), स्तंभ, (कॉलम), हुतात्मा (शहीद)असे शतावधी समर्पक शब्द सावरकरांनी सुचविलेले आहेत.
०७. वि.दा. सावरकर हे मुंबई येथे १५ एप्रिल १९३८ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.वीर सावरकरांनी १०,००० पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर १५०० हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. १९४३ साली ते अखिल  महाराष्ट्र नाट्य-संमेलन अध्यक्ष होते .
०८. भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने, हिंदु पदपादशाही, सावरकरांच्या गोष्टी भाग – १, सावरकरांच्या गोष्टी भाग – २, काळेपाणी, मोपल्यांचे बंड अर्थात्‌ मला काय त्याचे ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
०९. माझी जन्मठेप, शत्रूच्या शिबिरात, अथांग (आत्मचरित्र पूर्वपीठिका), हिंदुत्व, हिंदुराष्ट्र दर्शन, हिंदुत्वाचे पंचप्राण ही आत्मचरित्रपर ग्रंथ.
१०. मॅझिनीच्या आत्मचरित्राची प्रस्तावना – अनुवादित, गांधी गोंधळ, लंडनची बातमीपत्रे, गरमागरम चिवडा, तेजस्वी तारे, जात्युच्छेदक निबंध, विज्ञाननिष्ठ निबंध, स्फुट लेख, सावरकरांची राजकीय भाषणे, सावरकरांची सामाजिक भाषणे हे त्यांचे लेखसंग्रह आहेत.
११. संगीत उ:शाप, संगीत संन्यस्त खड्‌ग, संगीत उत्तरक्रिया, बोधिसत्व- (अपूर्ण) ही नाटके.
१२. महाकाव्ये, कमला, गोमांतक, जयोस्तुते, सागरा प्राण तळमळला, विरहोच्छ्वास, सप्तर्षी, सावरकरांच्या कविता हे त्यांनी लिहिलेले कविता संग्रह आहेत.