भारतनेटच्या दुस-या टप्प्यासाठी महाराष्ट्राला निधी मंजूर
केंद्र सरकारच्या ‘भारतनेट’ या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी महाराष्ट्राला 2,179 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात राज्यातील 148 तालुके इंटरनेटने जोडण्यात येणार आहेत.


केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान तसेच दूरसंचार मंत्रालयातर्फे दिल्लीतील विज्ञान भवनात ‘भारतनेट’ च्या दुसऱ्या टप्प्यातील ब्रॉडबँड नेटवर्कच्या विस्ताराविषयी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 

केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद , केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिषद पार पडली. या परिषदेत राज्याचे माहिती-तंत्रज्ञान राज्यमंत्री रविंद्र चव्हाण उपस्थित होते.

तसेच भारतनेटच्या पहिल्या टप्प्यात देशातील एक लाखापेक्षा अधिक ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात एकूण 7451 गावामध्ये ब्रॉडबँड नेटवर्क सेवा पोहोचवण्यात आली. 

राज्यातील पहिल्या डिजिटल जिल्ह्याचा मान नागपूर जिल्ह्याला मिळाल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. नागपूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती पूर्णत: ब्रॉडबॅंडशी जोडण्यात आल्या आहेत.



नवी दिल्लीत 37 वा ‘भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा’ आयोजित
14 नोव्हेंबर 2017 रोजी नवी दिल्लीत राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते 37 वा ‘भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा (IITF)’ चे उद्घाटन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 27 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.

वाणिज्य मंत्रालयांतर्गत भारत व्यापार जाहिरात संघटना (ITPO) या संस्थेकडून 1980 सालापासून या मेळाव्याचे आयोजन केले जात आहे.


व्हिएतनाम हा या मेळाव्याचा भागीदार देश आहे आणि किरगिझस्तान हा लक्ष केंद्रित देश आहे. 

जगातल्या विविध देशांमधून 225 हून अधिक कंपन्यांनी तसेच देशातल्या राज्यांमधील स्थानिक उद्योगांनी या मेळाव्यात सहभाग घेतला आहे.



जनधन खाती उघडण्यात उत्तरप्रदेश सर्वात पुढे आहे
2014 साली सुरू करण्यात आलेल्या ‘प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY)’ अंतर्गत आतापर्यंत बँकेत उघडण्यात आलेल्या खात्यांच्या संख्येत, सर्वाधिक खाती उत्तरप्रदेशात उघडण्यात आली आहे. 

देशात उघडलेल्या एकूण पाच कोटीहून अधिक नवीन PMJDY खात्यांच्या संख्येच्या एक पंचमांश वाटा केवळ उत्तरप्रदेशचा आहे.PMJDY खात्यांमध्ये जमा करण्यात आलेल्या एकूण ठेवींचा सहावा भाग तर एकट्या उत्तरप्रदेशाचा आहे. 

त्यानंतर यामध्ये पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. या दोन्ही राज्यांमध्ये एकत्रितपणे 3400 कोटीहून अधिक रुपयांच्या ठेवी जमा झाल्या.


बिहार, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगाल यांनी एका वर्षात एकत्रितपणे आणखी 2.2 कोटी नवीन खाती उघडलीत. तर आसाम, गुजरात, झारखंड आणि कर्नाटक मध्ये एका वर्षात 1 कोटीहून अधिक नवीन खाती उघडलीत. 

26 ऑगस्ट 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY)’ ची घोषणा केली होती. 



कृष्णा अभयारण्यात पहिल्यांदाच प्राण्यांची शिरगणती 
आंध्रप्रदेशातील कृष्णा अभयारण्यमध्ये पहिल्यांदाच प्राण्यांची शिरगणती (गणना) केली जाणार आहे. हा जगातील सर्वात दुर्मिळ पर्यावरण असलेल्या प्रदेशांपैकी एक आहे.

194.8 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेले हे क्षेत्र 1998 साली वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आणि तेव्हापासून तेथील प्राण्यांची गणनाच झालेली नाही. हे अभयारण्य कृष्णा आणि गुंटूर जिल्ह्यात पसरलेले आहे तसेच बंगालचा उपसागर आणि कृष्णा नदीच्या मधात वसलेले आहे.

हे क्षेत्र फिशिंग मांजरीसाठी प्रसिद्ध आहे. 2014-16 साली आयोजित करण्यात आलेल्या प्रायोगिक प्रकल्पात 15 फिशिंग कॅट ची नोंद झाली होती. 


16 ते 20 नोव्हेंबर – बाल अधिकार सप्ताह (हौसला 2017)
महिला व बाल विकास मंत्रालय 16 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2017 या काळात बाल अधिकार सप्ताह – हौसला 2017 – पाळणार आहे.
देशात 14 नोव्हेंबरला ‘बाल दिवस’ साजरा केला जातो आणि दरवर्षी आंतरराष्ट्रीय बाल अधिकार दिवस 20 नोव्हेंबरला साजरा केला जातो. 

या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय बालगृह संस्थांमध्ये राहणार्‍या मुलांसाठी आंतर बाल निगा संस्था (CCI) महोत्सवाचे आयोजन करीत आहे.

‘हौसला 2017’ महोत्सवात देशातल्या विविध बालगृहांच्या मुलांच्या प्रतिभा पाहायला मिळणार. शिवाय मुलांकडून विविध कार्यक्रमे, जसे की बाल संसद, चित्रकला स्पर्धा, अॅथलेटिक मीट, फुटबॉल, बुद्धिबळ स्पर्धा आणि भाषण लेखन, यांमध्ये भाग घेतला जाणार आहे.



12 नोव्हेंबर – सार्वजनिक प्रसारण सेवा दिवस
12 नोव्हेंबर 2017 रोजी आकाशवाणी/प्रसारभारती कडून ‘सार्वजनिक प्रसारण सेवा दिवस’ साजरा केला गेला. प्रसारभारतीचा हा 20 वा वर्धापन दिवस आहे. 

देशाच्या स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधी यांनी आकाशवाणी केंद्राला 12 नोव्हेंबर 1947 रोजी पहिल्यांदा भेट दिली होती. त्यामुळे त्या दिवसापासून 12 नोव्हेंबर हा ‘सार्वजनिक प्रसारण सेवा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

या दिवसाचे औचित्य साधून आकाशवाणीकडून (ऑल इंडिया रेडिओ) वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तसेच या दिवशी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या पुरस्कारांची घोषणा कली जाते, ते म्हणजे – सर्वात्तम सार्वजनिक प्रसारण सेवा करणारे आकाशवाणी केंद्र आणि गांधीवादी विचारांचा प्रचार करणारे आकाशवाणी केंद्र. 

12 नोव्हेंबर 2012 रोजी केंद्र सरकराने यासंबंधित औपचारिक घोषणा केली आणि भारतातील सार्वजनिक प्रसारण सेवा दिवस म्हणून हा दिवस साजरा करण्याचे ठरवले.

आकाशवाणी लवकरच ‘अॅमेझॉन इको डॉट’ वर त्यांची सेवा उपलब्ध करणार आहे. तसेच आकाशवाणी ‘व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क’ पुरवण्यासाठी काम करीत आहे, जे देशभरातील कोणत्याही भागाला विनाव्यत्यय प्रसारण सेवा प्रदान करेल.



सेबॅस्टियन वेट्टेल याने ब्राझिलियन ग्रँड प्रिक्स शर्यत जिंकली
फेरारी संघाचा चालक सेबॅस्टियन वेट्टेल याने 2017 ब्राझिलियन ग्रँड प्रिक्स शर्यत जिंकली.शर्यतीच्या दुसर्‍या स्थानी मर्सिडीज संघाचा वाल्टेरी बोट्टास तर फेरारी संघाचा किमी राईकोनेन ने तिसर्‍या स्थानी शर्यत पूर्ण केली.

ब्राझिलियन ग्रँड प्रिक्स ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी सध्या ब्राझीलच्या साओ पाउलोमध्ये आयोजित केली जाते. ही स्पर्धा 1972 साली पहिल्यांदा आयोजित केली गेली होती.



पंकज अडवाणीने IBSF जागतिक बिलियर्ड्स स्पर्धा जिंकली
कतारची राजधानी दोहामध्ये आयोजित 2017 IBSF जागतिक बिलियर्ड्स विजेतेपद स्पर्धा भारताच्या पंकज अडवाणीने जिंकली.स्पर्धेत पंकज अडवाणीने इंग्लंडच्या माईक रसेल याचा पराभव करत आपल्या कारकीर्दीतील 17 वा विश्व किताब जिंकला.

IBSF जागतिक बिलियर्ड्स विजेतेपद स्पर्धा 1973 सालापासून इंटरनॅशनल बिलियर्ड्स अँड स्नूकर फेडरेशन (IBSF) कडून आयोजित केली जात आहे. 

1971 साली स्थापित IBSF जगभरातील गैर-व्यावसायिक स्नूकर आणि इंग्लीश बिलियर्ड्स स्पर्धांचे संचालन करते. याचे संयुक्त अरब अमीरातच्या दुबईमध्ये मुख्यालय आहे.