आऊटसोर्सिंग सेवा क्षेत्रात आरक्षण
बिहारमध्ये आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या विविध सेवा क्षेत्रांमध्ये आरक्षण ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बिहार राज्य सरकारने घेतला आहे.





महिलांसाठी गोवा सर्वाधिक सुरक्षित राज्य
महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गोवा हे देशातील सर्वात सुरक्षित राज्य आहे. तर गोव्याखालोखाल केरळ, मिझोरम, सिक्कीम, मणीपूर या राज्यांचा क्रमांक लागतो. महाराष्ट्र या यादीत नवव्या स्थानावर आहे. ‘प्लान इंडिया’द्वारे तयार करण्यात आलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. 

महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बिहार सर्वाधिक असुरक्षित आहे. बिहारसोबतच झारखंड, उत्तरप्रदेश आणि दिल्लीदेखील महिलांसाठी असुरक्षित असल्याचे आकडेवारी सांगते. 

प्लान इंडियाकडून तयार करण्यात आलेला अहवाल महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालात महिला सुरक्षेसह शिक्षण, आरोग्य, गरिबी हे मुद्दे विचारात घेण्यात आले आहे.



देशभरात राष्ट्रीय एकता दिवस साजरा 
दरवर्षी ३१ ऑक्टोबरला देशभरात ‘राष्ट्रीय एकता दिवस’ साजरा केला जातो. 

सरदार वल्लभभाई झवेरभाई पटेल (‘लोहपुरुष’) यांच्या १३९ व्या जयंती निमित्त ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी देशात पहिल्यांदा राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला होता. 



राष्ट्रकुल स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुजा घाटकरला सुवर्णपदक
भारतीय नेमबाजपटूंनी ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या राष्ट्रकुल नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी आपले वर्चस्व कायम राखले आहे. 

10 मी. एअर पिस्तुल प्रकारात भारताच्या शाहजार रिझवी, ओंकार सिंह आणि जितू राय यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकाची कमाई केली. 

महिलांच्या 10 मी. एअर रायफल प्रकारात पुण्याच्या पुजा घाटकरने सुवर्णपदकाची कमाई केली. तर भारताच्याच अंजुम मुदगलने रौप्यपदक मिळवले. सिंगापूरच्या मार्टीना वेलेसुने कांस्यपदक मिळवले.

तसेच या स्पर्धेचा दुसरा दिवस भारतासाठी अतिशय चांगला ठरला. भारतीय नेमबाजपटूंनी दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदकासह 5 पदकांची कमाई केली. 

याआधी भारताच्या हिना सिद्धूने 10 मी. एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. हिनाव्यतिरीक्त भारताच्या दिपक कुमारने 10 मी एअर रायफल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली.


उद्योगस्नेही देशांत भारताची झेप
‘इज ऑफ डुईंग बिझनेस २०१७’ या उद्योगानुकूल वातावरणनिर्मितीमध्ये जागतिक बॅंकेने भारताच्या मानांकनात मोठी सुधारणा केली आहे. यामुळे भारताचे मानांकन १३० वरून १०० झाले आहे. मात्र जागतिक बॅंकेने यंदा यात ‘जीएसटी’चा विचार केला नाही.२०१४ मध्ये भारताचे स्थान १४२वे, तर गेल्या वर्षी १३०वे होते.

अल्पमतातील गुंतवणूकदारांना संरक्षण देणे यात भारताचे चौथे मानांकन मिळाले आहे. उद्योगांना सुलभतेने पतपुरवठा मिळणे यातील भारताचे मानांकन ४४ वरून २९ झाले आहे. उद्योगांना सहजपणे विजेची जोडणी मिळणे या निकषांमध्येही मानांकन २९ वर पोचले आहे.

करवसुलीच्या क्षेत्रातील ऑनलाइन सुधारणांमुळे भारताचे मानांकन १७२ वरून ५३ झाले आहे. 

‘इन्सॉल्व्हन्सी आणि बॅन्करप्सी कोड’मुळे दिवाळखोरीच्या अडचणींवर मात करण्यात आलेल्या यशामुळे या निकषात भारताचे मानांकन १३६ वरून १०३ झाले आहे.



इस्राइलमध्ये ‘ब्लू फ्लॅग-१७’ सरावामध्ये भारतीय वायुसेना भाग घेणार
२ ते १६ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत इस्राइलमधील उवाडा हवाई दल तळावर ‘ब्लू फ्लॅग-१७’ सराव आयोजित केला जात आहे.

भारतीय वायुसेनेचे (IAF) ४५ सदस्यांची तुकडी सरावामध्ये भाग घेणार आहे. यामध्ये IAF चे गरुड कमांडो आणि C-130J विमान सामील करण्यात आले आहे. यावेळी प्रथमच एखाद्या बहुपक्षीय सरावादरम्यान भारतीय वायुसेना इस्रायली हवाई दलासोबत एकत्र येणार आहे.

‘ब्लू फ्लॅग’ सराव हा इजरायली वायुसेनेद्वारे आयोजित केला जाणारा एक सर्वात मोठा बहूराष्ट्रीय हवाई सराव आहे. यावर्षी यात अमेरिका, इटली, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस आणि पोलंड यांच्यासह सुमारे ३५ देश सहभागी होणार आहेत.

‘ब्लू फ्लॅग’ सराव हा सहभागी राष्ट्रांमध्ये लष्करी सहकार्य बळकट करण्याच्या हेतूने आयोजित करण्यात येत असलेला द्विवार्षिक बहुपक्षीय उपक्रम आहे. 

सरावादरम्यान राष्ट्रांमध्ये ज्ञान, लढाईचा अनुभव आणि सुधारणा याबाबत माहितीचे आदानप्रदान केले जाणार आहे.
नोव्हेंबर २०१३ मध्ये प्रथम ‘ब्लू फ्लॅग’ सराव आयोजित केला गेला होता.



३१ ऑक्टोबरला जगभरात जागतिक शहर दिवस साजरा
दरवर्षी ३१ ऑक्टोबरला जगभरात जागतिक शहर दिवस (World Cities Day) साजरा केला जातो. यावर्षी ‘इनोव्हेटीव गवर्नेंस, ओपन सिटीज’ या संकल्पनेखाली हा दिवस साजरा केला गेला.

या दिवशी शहरीकरणाबाबतीत असलेल्या संधी, आव्हानांना संबोधित करण्यासाठी जागतिक शहरीकरणासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाचा स्वारस्य वाढविण्याच्या उद्देशाने जागृती निर्माण केली जाते.


या पार्श्वभूमीवर जागतिक शहरी आव्हाने पेलण्यासाठी UN-अधिवास (UN-Habitat) कडून २०१४ साली ‘अर्बन ऑक्टोबर’ हा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता.