युरोपीय अवकाश संस्थेच्या मार्स लँडरचा स्फोट?
०१. युरोपीय अवकाश संस्थेच्या मार्स लँडरचा मंगळावरील भूमीवर उतरण्यापूर्वीच स्फोट झाला असावा, असा अंदाज नासाच्या दुसऱ्या एका यानाने घेतलेल्या छायाचित्रावरून व्यक्त करण्यात आला आहे.


०२. युरोपीय अवकाश संस्थेचे एक्सोमार्स शिपारेली यान १९ ऑक्टोबरला मंगळाच्या वातावरणात शिरले व त्याचे तेथील अवतरण सहा मिनिटांत होणे अपेक्षित होते पण ते तेथे उतरण्यापूर्वीच त्याचा पृथ्वीवरील केंद्रांशी संपर्क तुटला.



वडोदऱ्यात हरित विमानतळ व रेल्वे विद्यापीठ
०१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी वडोदरा येथे नव्या एकात्मिक विमानतळ टर्मिनलचे उद्घाटन केले. कोचीनंतर आता हे देशातील दुसरे हरित विमानतळ आहे.

०२. विकासासाठी संपर्कता नितांत गरजेची आहे असे सांगून मोदी यांनी, वडोदरामध्ये पहिले रेल्वे विद्यापीठ स्थापन करण्याचा महत्त्वाचा निर्णय या दृष्टिकोनातून घेतल्याचे सांगितले.



भारतीय सैन्याने सरावात पटकावले सुवर्ण पदक
०१. जगातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या कॅब्रियन पट्रोल सरावात भारतीय सैन्याचे छाप पाडली आहे. भारतीय सैन्याच्या गोरखा रायफल्सच्या जवानांनी या सराव शिबीरात सुवर्ण पदक पटकावले आहेत. वेल्समध्ये पार पडलेल्या या सराव शिबीरात विविध देशांमधील सैन्याचे पथक सामील झाले होते. 

०२. कॅब्रियन पट्रोल सराव मोहीम वेल्समधील कॅब्रियन डोंगररागात पार पडते. मोहीमेमध्ये जवानांना ५५ किलोमीटरचे अंतर पार करावे लागते. ४८ तासांमध्ये त्यांनी हे अंतर पूर्ण करणे गरजेचे असते. यामध्ये जवानांना आव्हानांचा सामना करावा लागतो. 

०३. विशेष म्हणजे संपूर्ण स्पर्धेदरम्यान त्यांना सोबत दिलेले सामान आणि किट बाळगावे लागते. यातील काही सामान हरवल्यास संघाचे गूण वजा होत जातात. 

०४. या सराव मोहीमेत जवानांची गुणवत्ता ही गुणांच्या आधारे ठरत नाही. तर टक्केवारीमध्ये मोहीमेतील सुवर्ण पदक विजेता ठरवला जातो. सुवर्ण पदक विजेत्या संघाला ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गूण, रौप्य पदक पटकावणाऱ्या  संघाला ६४ ते ७५ टक्के आणि कांस्य पदकासाठी ५५ ते ६४ टक्के मिळवणे गरजेचे असते



मंगळावरील हायड्रोजन नष्ट होण्याचा वेग अधिक
०१. अमेरिकेतील नासा या अवकाश संशोधन संस्थेने मंगळाच्या वातावरणाचा ‘मावेन’ यानाच्या मदतीने अभ्यास केला असून, त्यात पाणी व हायड्रोजन तेथील वातावरणातून हळूहळू नष्ट होण्याऐवजी कमी-अधिक वेगाने नष्ट होत असल्याचे म्हटले आहे. 

०२. हायड्रोजन ज्या वेगाने नष्ट होतो त्यावर मंगळावरील पाणी नष्ट होण्याचा वेग अवलंबून असतो. मंगळ पृथ्वीजवळ असतो तेव्हा पाणी मोठय़ा प्रमाणावर नष्ट होते.



गुरूभोवती फिरणाऱ्या अंतराळयानात दोष
०१. गुरूभोवती फेऱ्या मारणाऱ्या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेच्या (नासा) एका अंतराळयानात आणखी एक दोष उद्भवला आहे. ‘जुनो’ अंतराळयानाने हा दोष टिपल्यानंतर ते ‘सेफ मोड’मध्ये गेले. 

०२. जुनोने त्याचा संगणक पुन्हा सुरू (रि-बूट) केला असून आता तो पृथ्वीशी संवाद साधू शकतो.मात्र अभियंत्यांनी नेमका दोष शोधून काढेपर्यंत त्याच्या हालचाली मर्यादित राहणार आहेत. 



अतिक्रमणे रोखण्यासाठी आता उपग्रहांची मदत!
०१. शासकीय जमिनींवरील अतिक्रमणांचा शोध घेऊन शासनाच्या प्रचलित धोरणानुसार ती हटवण्याच्या दृष्टीने गेल्या वर्षी महाराजस्व अभियानाअंतर्गत प्रयत्न करण्यात आले खरे, पण त्यातूनही अतिक्रमणे पूर्णपणे हुडकून न काढता आल्याने आता यासाठी उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरवण्यात आले आहे.

०२. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये राज्यातील ग्रामीण भागातील जमिनींची पुनर्मोजणी व नकाशांचे डिजिटायझेशन करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला होता. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात अमरावती, नागपूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि रायगड या सहा जिल्ह्यांमध्ये जमिनीच्या पुनर्मोजणीचे काम सुरूही करण्यात आले होते. 

०३. आता राज्यातील ग्रामीण भागातील शेतजमिनीची पुनर्मोजणी ही सॅटेलाईट इमेजरी, तसेच इटीएस, डीजीपीएस या हायब्रीड तंत्रज्ञानाचा वापर करून मूळ अभिलेखांच्या आधारे करण्याचे नियोजित आहे. 

०४. पुनर्मोजणीअंती तयार होणाऱ्या नकाशांच्या आधारे जीआरएस प्रणाली विकसित करून राज्यातील विविध शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी अशा प्रणालीचा वापर करता येईल. 



आंबोलीत राज्यस्तरीय फुलपाखरू महोत्सव
०१. आंबोलीत २१, २२, २३ ऑक्टोबर रोजी फुलपाखरू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी राधानगरी येथे बायसन नेचर क्लब या राज्यस्तरीय फुलपाखरू महोत्सवाचे आयोजन केले होते. 

०२. आंबोलीत निसर्ग संवर्धनाचे काम करणाऱ्या मलबार नेचर कॉन्झर्वेशन क्लब आणि वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव या ३ दिवसांत आयोजित करण्यात आला आहे.

०३. जैव विविधतेच्या दृष्टीने संपन्न असलेल्या आंबोलीत आतापर्यंत २०४ हून अधिक प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद केली आहे. ही संख्या आज महाराष्ट्रात सर्वात अधिक आहे व त्यात अनेक दुर्मीळ प्रजातींचा समावेश आहे. 

०४. (ब्ल्यू नवाब) (डार्क वाँनडरर), (मलबार रेवन), (मेडम ब्राऊन), (पेल ग्रीन औलेट), (सिल्वरस्ट्रिक आकेशिया ब्ल्यू), यासारख्या फुलपाखरांच्या यात समावेश आहे. राज्य फुलपाखरू (ब्ल्यू मॉरमॉन) व सर्वात मोठे फुलपाखरू (सदर्न बर्डविंग) आंबोलीत मोठय़ा संख्येने आढळतात. फुलपाखरांबरोबर (एँटलस मॉथ), (मून मॉथ) सारख्या पतंगाच्या अनेक जाती इथे आढळतात. 




भारताने तिसऱ्यांदा जिंकला कबड्डी विश्वचषक
०१. भारताने इराणवर ३८-२९ असा शानदार विजय मिळवला आहे. भारताने सलग तिसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे.पहिल्या सत्रात भारत १८-१३ ने पिछाडीवर होता. मात्र दुसऱ्या सत्रात भारताने सर्वच आघाड्यांवर दमदार कामगिरी केली.
०२. चढाईपटूंच्या यशस्वी चढाया आणि त्याला बचावपटूंची लाभलेली सर्वांगसुंदर साथ यामुळे भारताने ३०-२४ अशी आघाडी घेतली. त्यानंतर भारताने ही आघाडी टिकवली. अखेर भारताने ३८-२९ असा विजय मिळवला.

०३. याआधी भारताने २००४ आणि २००७ मध्ये कबड्डी विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताने अंतिम फेरीत इराणचाच पराभव केला होता. आता तिसऱ्या विश्वचषकातही इराणला पाणी पाजत संघाने कबड्डीमध्ये इतिहास रचला आहे.



सुनील गावस्कर यांना ‘जीवनगौरव’

०१. मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेतर्फे ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेतर्फे २०१३ मध्ये पहिल्यांदा जीवनगौरव पुरस्कार बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांना प्रदान करण्यात आला.

०२. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा १०,००० धावांची वेस ओलांडण्याचा मान गावस्कर यांच्या नावावर आहे. १९८५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या विजेत्या संघाचे गावस्कर कर्णधार होते.

०३. गावस्कर यांनी १२५ कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व करताना १०,१२२ धावा केल्या. कारकीर्दीत त्यांच्या नावावर ३४ शतके आहेत. एकदिवसीय प्रकारात त्यांनी १०८ सामन्यांत ३००० हून अधिक धावा केल्या. 

०४. निवृत्ती स्वीकारल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) तांत्रिक समितीचे अध्यक्ष होते. 

०५. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट सुधारणा समितीचे ते अध्यक्ष होते. भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही भूमिका सांभाळली. २०१४ मध्ये इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेदरम्यान बीसीसीआयचे प्रमुखपद सांभाळले होते.