टाटा सन्स अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री पायउतार
०१. टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सोमवारी सायरस मिस्त्री यांना हटविण्यात आले. रतन टाटा यांची तात्पुरते अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 



०२. विविध उद्योग क्षेत्रांतील सुमारे १००हून अधिक कंपन्यांच्या टाटा उद्योगसमूहाची धारक कंपनी म्हणून टाटा सन्स काम पाहते. चार महिन्यात टाटा सन्सचा नवा अध्यक्ष निवडण्यात येणार आहे. त्यासाठी एका समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. 


०३. ही समिती नव्या अध्यक्षाचा शोध घेणार आहे. या समितीत रतन टाटा, वेणू श्रीनिवासन, अमित चंद्रा, रोहन सेन आणि लॉर्ड के. भट्टाचार्य यांचा समावेश आहे. ही समिती चार महिन्यात नवा अध्यक्ष निवडतील.

०४. रतन टाटा २८ डिसेंबर २०१२ रोजी टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाले होते. त्यांच्या जागी संचालक मंडळाने सायरस मिस्त्री यांची नियुक्ती केली होती. 

०५. टाटा उद्योगसमूहाची धुरा सांभाळणारे ते सहावे अध्यक्ष तर टाटा आडनाव नसलेले दुसरे अध्यक्ष होते. या पूर्वी १९३२ मध्ये नवरोजी सकलतवाला यांनी टाटा उद्योगसमूहाची धुरा सांभाळली होती. 


०६. टाटा समूहामध्ये सर्वात मोठा (१८.५%) भागीदार असणाऱ्या शापूरजी पालनजी अ‍ॅण्ड कंपनी या कंपनीचे सायरस मिस्त्री टाटा समूहामध्ये २००६ पासून संचालक आहेत. 





आयएनएस विराटला अखेरचा निरोप 
०१. जगातील सर्वात जुनी विमानवाहू नौका असलेली आयएनएस विराट अखेरचा निरोप घेण्यासाठी कोचीहून मुंबईला रवाना झाली आहे. आयएनएस विराटला कोचीमध्ये भावपूर्ण निरोप देण्यात आला. 



०२. आयएनएस विराट ही विमानवाहू नौका पाच दशकांहून अधिक काळ भारतीय नौदलाच्या सेवेत होती. तब्बल ५५ वर्षांच्या सेवेनंतर विराट नौदलाच्या सेवेतून निवृत्त होते आहे. यातील २७ वर्ष आयएनएस विराट ब्रिटिशांच्या रॉयल नेव्हीचा भाग होती. 


०३. आयएनएस विराटला या वर्षाच्या अखेरीस अंतिम निरोप दिला जाण्याची शक्यता आहे. मुंबईतच आयएनएस विराटला शेवटचा निरोप देण्यात येईल.


०४. आयएनएस विराटला अंतिम निरोप देण्यात आल्यानंतर ही विमानवाहू नौका आंध्र प्रदेश सरकारच्या ताब्यात असेल. नौदलातून निवृत्त झालेली विराट आंध्र प्रदेश सरकारकडून विझागमध्ये ठेवली जाणार आहे.





लुईस हॅमिल्टनचे जेतेपदाचे अर्धशतक
०१. सोमवारी हॅमिल्टनने अमेरिकन ग्रा. प्रि. फॉर्म्युला-वन शर्यतीत जेतेपद पटकावून कारकीर्दीतला ५०वा विजय साजरा केला. जेतेपदांचे अर्धशतक पूर्ण करणारा हॅमिल्टन हा अ‍ॅलेन प्रोस्ट (५१) आणि मायकेल शूमाकर (९१) यांच्यानंतरचा तिसरा शर्यतपटू आहे.


०२. या विजयामुळे मर्सिडिज संघाचा हॅमिल्टन विश्वविजेत्या शर्यतपटूंच्या यादीत ३०५ गुणांसह दुसऱ्या, तर संघसहकारी निको रोसबर्ग ३३१ गुणांसह अव्वल स्थानावर आहे.







पाण्याचा ‘टँकर चालक’ झाला ‘मिस्टर एशिया २०१६’
०१. बेंगलुरू येथील २५ वर्षीय के. जी. बालकृष्ण याने अलीकडेच बॉडीबिल्डिंगमधील ‘मिस्टर एशिया २०१६’ किताब जिंकला. या विजयी कामगिरीनंतर बालकृष्ण ‘अर्नोल्ड श्वार्झनेगर ऑफ व्हिइटफिल्ड’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. 



०२. फिलिपाईन येथे पार पडलेल्या पाचव्या ‘फिल-एशिया बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिप’मध्ये बालकृष्णने ‘मिस्टर एशिया २०१६’ किताब आपल्या नावावर केला.


०३. २०१३ मध्ये जर्मनीत भरविण्यात आलेल्या ‘मिस्टर युनिव्हर्स अंडर २४ ज्युनियर’ स्पर्धादेखील त्याने जिंकली होती. तर २०१४ मध्ये ग्रीसमध्ये भरविण्यात आलेल्या ‘मिस्टर युनिव्हर्स अंडर २४ वर्ल्ड चॅम्पियनशिप’मध्ये देखील त्याने विजयी कामगिरी केली होती.







आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत अभिजितची ऐतिहासिक कामगिरी
०१. ग्रँडमास्टर आणि राष्ट्रकुल चॅम्पियन अभिजित गुप्ताने हुगेवीन आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत ऐतिहासिक विजेतेपद पटकावले. 


०२. फिडे ओपन स्पर्धेत सलग दोन विजेतेपद पटकावणारा तो पहिला बुद्धिबळपटू ठरला आहे.

०३. गत चॅम्पियन व अव्वल मानांकित अभिजितने ९ पैकी ७.५ गुणांची कमाई केली आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या ग्रँडमास्टर संदीपन चंदाच्या तुलनेत त्याने आघाडी घेतली होती. 

०४. भारतीय ग्रॅण्डमास्टर एम.आर. ललित बाबूने तिसरे तर ग्रॅण्डमास्टर एम. श्यामसुंदरने चौथे स्थान पटकावले. 





राज्यात पहिले फुलपाखरू गाव म्हणून 
‘पारपोली’ घोषित
०१. आंबोली येथील फुलपाखरू महोत्सवात फुलपाखरांचा गाव म्हणून सावंतवाडी तालुक्यातील पारपोली गावाची निवड करण्यात आली. 


०२. महाराष्ट्रात फुलपाखरांची सर्वात जास्त विविधता पारपोलीत सापडते. पारपोलीत राज्यातील २२० पैकी २०४ प्रकारची फुलपाखरे आढळून आली आहेत.


०३. कोकण ग्रामीण पर्यटनात आंबोली, चौकुळ व गेळेची निवड करण्यात आली आहे. या पर्यटनात गुंतवणूक करणाऱ्या स्थानिकांना बँकेची योजना आणून फक्त दोन टक्के व्याजाने गुंतवणूक करता येणार आहे.






फोनच्या बॅटरीतून विषारी वायूंचे उत्सर्जन
०१. स्मार्टफोन, टॅबलेट तसेच इतर काही ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅटरीमधून त्या अधिक तापल्यास शंभर प्रकारचे घातक वायू बाहेर पडतात, त्यामुळे त्वचा व नाकातील वाहिन्यांवर वाईट परिणाम होतो. 



०२. अमेरिकेतील इन्स्टिटय़ूट ऑफ एनबीसी डिफेन्स व चीनमधील तिंगसुआ विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार रिचार्ज करण्याच्या बॅटरीसाठी वापरला जाणारा चार्जर योग्य नसेल तरी वाईट परिणाम होतात. 


०३. लिथियम आयन बॅटरीज या स्मार्टफोन व इतर उपकरणात वापरल्या जातात. वर्षांला दोन अब्ज उपकरणात या बॅटरीजचा वापर होतो. 


०४. बॅटरी पूर्ण चार्ज केलेली असेल तर त्यातून जास्त विषारी वायू उत्सर्जित होतात. ते वायू कोणते असतात, याचाही उलगडा झाला आहे. कार्बन मोनॉक्साईड वायूही यात बाहेर पडतो व तो अगदी कमी काळात मानवी आरोग्यात धोका पोहोचवतो.