‘टाइम’च्या प्रभावशाली छायाचित्रांमध्ये महात्मा गांधी यांचा चरखा
०१. अमेरिकेतील ‘टाइम’ मासिकाने १०० सर्वात प्रभावशाली छायाचित्रांच्या संकलनात चरख्यासह महात्मा गांधी यांचे १९४६ मधील एका छायाचित्राचा समावेश केला आहे. महात्मा गांधी यांचे हे कृष्णधवल छायाचित्र प्रसिद्ध छायाचित्रकार मार्गारेट बोर्केव्हाइट यांनी काढले होते.


०२. ‘टाइम’च्या संकलनात सन १८२० पासून २०१५ पर्यंत घेण्यात आलेली सर्वात प्रसिद्ध आणि इतिहास घडवणाऱ्या छायाचित्रांचा समावेश करण्यात आला आहे. ‘टाइम’ने त्यात आता चरख्यासमवेत महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील एका छायाचित्राचा समावेश केला आहे. 

०३. हे छायाचित्र भारतीय नेत्यांवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका लेखासाठी घेण्यात आले होते. मात्र, ते प्रकाशित होण्याच्या दोन वर्षे आधी आणि महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर हे छायाचित्र श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रकाशित करण्यात आले होते. अल्पावधीतच हे छायाचित्र जगभरात प्रसिद्ध झाले होते.

०४. टाइमच्या संकलनात १८२० ते २०१५ या कालावधीत घेण्यात आलेल्या सर्वाधिक प्रसिद्ध आणि इतिहास घडवणाऱ्या छायाचित्रांचा समावेश करण्यात आलेला आहे, असे ‘टाइम’कडून सांगण्यात आले.



ओबीसी वर्गात १५ नवीन जातींचा समावेश
०१. केंद्र सरकारने बुधवारी अन्य मागासवर्गीय (ओबीसी) वर्गात १५ नवीन जातींचा समावेश केला आहे. महाराष्ट्र, आसाम, बिहार, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, जम्मू- काश्मीर, उत्तारखंड या राज्यांमधील जातींचा यात समावेश आहे. याशिवाय या वर्गात आधीपासून समावेश असलेल्या १३ जातींमध्ये बदल करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.

०२. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने महाराष्ट्र, आसाम, बिहार, हिमाचल प्रदेशसह अन्य चार राज्यांमध्ये जातीविषयक २८ बदल करण्याची शिफारस केली होती. यात १५ नवीन जातींचा समावेश होता. याशिवाय ९ पोटजातींचा समावेश करणे आणि ४ जातींमध्ये सुधारणा करावी अशी शिफारसही आयोगाने केली होती. 

०३. बुधवारी पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत शिफारशींना मंजुरी दिली आहे

०४. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशींच्या आधारे २५ राज्य आणि सहा केंद्रशासीत प्रदेशांमधील ओबीसी वर्गाच्या केंद्रीय यादीत आता एकूण २,४७९ जातींचा समावेश झाला आहे.



इस्रो एकाच रॉकेटमधून ८३ उपग्रहांचे प्रक्षेपण करणार
०१. भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) जानेवारीत ८३ उपग्रह अवकाशात सोडणार आहे. यामध्ये तब्बल ८१ उपग्रह परदेशी असणार आहेत, तर दोने उपग्रह भारताचे असणार आहेत. 

०२. एकाच रॉकेटच्या मदतीने तब्बल ८३ उपग्रहांचे प्रक्षेपण करुन जागतिक विक्रम करण्याची संधी भारताला असणार आहे. अशी माहिती एँट्रिक्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राकेश सासीभूषण यांनी दिली आहे. एँट्रिक्स कॉर्पोरेशनकडे इस्रोच्या व्यावसायिक विभागाची जबाबदारी आहे.

०३. ८३ उपग्रह सोडण्यासाठी इस्रोकडून पीएसएलव्ही-एक्सएल रॉकेटचा वापर केला जाणार आहे. १६०० वजनांचे उपग्रह घेऊन पीएसएलव्ही-एक्सएल रॉकेट अवकाशात उड्डाण करेल.

०४. दरम्यान इस्रोने जानेवारीतील मोहिमेसाठी क्रायोजेनिक इंजिनाची चाचणी सुरू केली आहे. क्रायोजेनिक इंजिनांमध्ये वजनदार उपग्रह वाहून नेण्याची क्षमता असते.



मॅग्नस कार्लसनची जेतेपदाची हॅट्ट्रिक
०१. नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने बुद्धिबळ विश्वातील आपले वर्चस्व अबाधित राखताना विश्व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी घातली. रशियाचा आव्हानवीर सर्जी कर्जाकिनविरुद्धच्या विजय मिळवला. कार्लसनने टायब्रेकरमध्ये आपला करिश्मा दाखवला. 

०२. सहा तासांच्या या टायब्रेकर फेरीत चार डावांमध्ये प्रत्येक खेळाडूला २५ मिनिटांत आपला खेळ पूर्ण करायचा होता. ब्लिट्झ प्रकारात हातखंडा असलेला आणि २०१० पासून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला कार्लसनच जेतेपदाचा दावेदार होता.

०३. २६ वर्षीय कार्लसनने यंदाच्या वर्षी अनेक ब्लिट्झ स्पर्धामध्ये सहभाग घेतला आणि अमेरिकेच्या ग्रॅण्डमास्टर हिकारू नाकामुराला नमवण्याचा पराक्रमही केला होता. 

०४. कार्लसनने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघातर्फे आयोजित या स्पर्धेत २०१३ आणि २०१४ साली भारताच्या विश्वनाथन आनंदला नमवून जेतेपद पटकावले होते.



राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत मुरली कार्तिकेयन पुन्हा विजेता
०१. तामिळनाडूचा सतरा वर्षीय खेळाडू मुरली कार्तिकेयन याने वरिष्ठ गटाच्या ५४ व्या राष्ट्रीय प्रीमिअर बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकाविले.या स्पर्धेतील विजेतेपदासाठी मुरली व त्याचा सहकारी अरविंद चिदंबरम यांच्यातच चुरस होती. 


०२. चिदम्बरम याला मात्र शेवटच्या फेरीत ग्रँडमास्टर आर.आर.लक्ष्मण याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

०३. माजी विजेता बी.अधिबन व नाशिकचा ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांचे प्रत्येकी नऊ गुण झाले. मात्र प्रगत गुणांच्या आधारे त्यांना अनुक्रमे तिसरे व चौथे स्थान मिळाले.

०४. लक्ष्मण याने आठ गुणांसह पाचवा क्रमांक मिळविला. पुण्याचा ग्रँडमास्टर अभिजित कुंटे, तसेच तेजस बाक्रे व रवितेजा यांचे प्रत्येकी साडेसात गुण झाले. प्रगत गुणांच्या आधारे त्यांना अनुक्रमे सहा ते आठ क्रमांक मिळाले. 

०५. शेवटच्या फेरीत बाक्रे याने ग्रँडमास्टर श्रीराम झा याला हरविले. नितीन याला नववे स्थान मिळाले तर पुण्याचा आंतरराष्ट्रीय मास्टर खेळाडू अभिषेक केळकर याने दहावा क्रमांक मिळवित कौतुकास्पद कामगिरी केली. अभिषेक याची ही पहिलीच राष्ट्रीय प्रीमिअर स्पर्धा आहे.



ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुलभा ब्रह्मे यांचे निधन
०१. ‘लोकायत’च्या संस्थापक, अर्थतज्ज्ञ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुलभा ब्रह्मे यांचे गुरुवारी पुण्यात निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक माधव गाडगीळ यांच्या त्या बहिण होत.


०२. लोकायतच्या माध्यमातून त्यांनी लोककेंद्री विज्ञान आणि समाज-अर्थशास्त्र यातील विविध पैलूंवर मराठीतून प्रबोधनात्मक लेखन केले होते. विज्ञान, समाज-अर्थशास्त्रावरील प्रबोधनात्मक लेखन त्यांनी केले आहे. 

०३. प्लॅनिंग फॉर द मिलियन्स, प्रोड्युसर्स को-ऑपरेटिव्ह्ज एक्सपिरियन्स अॅण्ड लेसन्स फ्रॉम इंडिया, वुमेन वर्कर्स इन इंडियाः स्टडिज इन एम्प्लॉयमेंट अॅण्ड स्टेटस, ड्रॉट्स इन महाराष्ट्रा, १९७२ : द केस ऑफ इरिगेशन प्लॅनिंग आदी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.


०४. देशविघातक जागतिकीकरण, एन्रॉन, जैतापूर अणुवीजप्रकल्पाच्या विरोधी लोकचळवळीत त्यांचा सहभाग होता. डॉ. सुलभा ब्रह्मे यांनी अर्थशास्त्रात पीएच्.डी केली आहे. गोखले अर्थशास्त्र संस्थेत संशोधक पदावर त्यांनी काम केले.



गुरूसारखा उष्ण बाह्यग्रह सापडला
०१. गुरूसारखा उष्ण दाट आवरण असलेला बाह्यग्रह शोधण्यात आला असून तो पृथ्वीपासून १८०० प्रकाशवर्षे दूर आहे. सूर्यासारख्या सहा अब्ज वर्षे जुन्या ताऱ्याभोवती हा ग्रह फिरत असून अधिक्रमणामुळे तो सापडला आहे. 

०२. ग्रहाचे नाव एपिक २२०५०४३३८ बी असे असून तो नासाच्या केप्लर के २ मोहिमेत प्रथम शोधला गेला.

०३. धातूंनी परिपूर्ण असलेल्या गुरूसारख्या ग्रहाचा शोध फोटोमेट्री तंत्राने लावण्यात आला आहे. एपिक २२०५०४३३८ बी हा वायूरूप व महाकाय ग्रह आहे त्याची गुणवैशिष्टय़े ही गुरूसारखीच आहेत 

०४. या संशोधनानुसार एपिक २२०५०४३३८ बी हा ग्रह गुरूपेक्षा १० टक्क्य़ांनी लहान आहे, तर त्याचे वस्तुमान गुरूपेक्षा ३० टक्के अधिक आहे. तो ताऱ्याभोवती ५.८ दिवसात प्रदक्षिणा पूर्ण करतो. त्याची घनता २.२ प्रतिघनसेंटिमीटर आहे व त्याचे समतोल तापमान ८८६ अंश सेल्सियस असून तो गुरूसारखा तप्त असून वस्तुमान मात्र थोडे कमी आहे.



विक्स अॅक्शन ५०० सह ३४४ औषधांवरील बंदी उठवली
०१. सर्दी, डोकेदुखी दूर होण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या विक्स अॅक्शन ५०० आणि कोरेक्स कफ सिरफ, डीकोल्डसह ३४४ औषधांवर सरकारने घातलेली बंदी दिल्ली उच्च न्यायालयाने उठवली आहे. 

०२. न्यायालयाने फायजर, ग्लेनमार्क, प्रॉक्टर अँड गॅम्बलर, सिप्ला आणि काही स्वंयसेवी संस्थांच्या याचिकांवर हा निकाल दिला. केंद्र सरकारने या ३४४ औषधांवर बंदी घालताना नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. 

०३. केंद्र सरकारने १० मार्च रोजी विक्स अॅक्शन ५००, डी कोल्ड आणि कोरेक्स कफ सिरफसह सुमारे ३४४ औषधांवर बंदी घातली होती.  फिक्स्ड डोस कॉम्बिनेशनचा रोगप्रतिकारक शक्तीवर विपरीत परिणाम होत असल्याचे सरकारने म्हटले होते. 

०४. आरोग्य विभागाकडून कोणतीही परवानगी न घेता दोन किंवा अधिक औषधे एकत्र केल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला होता. या औषधांमुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे सरकारने म्हटले होते. 

०५. बंदी घालण्यात आलेले बहुतांश औषधे अशी होती की, जी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय लोकांना औषध दुकानातून घेता येत होती. त्याचबरोबर या औषधांच्या बेसुमार जाहिरातीमुळे नागरिकांमध्ये ती लोकप्रिय झाली होती.



‘ल्युटेन्स दिल्ली’तील १०० कोटींचा भूखंड महाराष्ट्राच्या ताब्यात
०१. राजधानी दिल्लीच्या केंद्रस्थानी असलेल्या ‘ल्युटेन्स दिल्ली’त अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या तब्बल दहा हजार चौरस फुटांचा मौल्यवान भूखंड अखेर महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात आला आहे. मात्र, त्यासाठी तब्बल ३८ वर्षांची न्यायालयीन लढाई राज्य सरकारला खेळावी लागली.

०२. देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनी (व्हीव्हीआयपी) गजबजलेल्या ‘ल्युटेन्स दिल्ली’तील फरिदकोट गल्लीत सुमारे नऊ हजार ९०० चौरस फुटांचा हा भूखंड आहे. ‘कुमकुम कोठी’ या नावाने तो ओळखला जातो. 

०३. सध्या त्याचा ताबा डॉ. शेखर शहा यांच्याकडे असून त्यावर त्यांनी बांधलेला बंगला व नोकरांसाठीच्या खोल्या आहेत. सुमारे ५० वर्षांपासून ताब्यात असलेल्या या मालमत्तेचा ताबा शहा यांना तातडीने सोडण्याचा आदेश पतियाळा हाऊस न्यायालयाने गुरुवारी दिला.

०४. न्यायालयाच्या या निकालाला आव्हान मिळण्याची शक्यता गृहीत धरून राज्य सरकार दिल्ली उच्च न्यायालयामध्ये ‘कॅव्हेट’ दाखल करणार आहे.

०५. या भूखंडाच्या वादाचे मूळ भाषिक आधारावर झालेल्या राज्यांच्या फेररचनेमध्ये आहे. १९६० मधील बॉम्बे फेररचना कायद्यानुसार, तत्कालीन बॉम्बे स्टेटकडे या भूखंडाची मालकी होती. 

०६. पुढे बॉम्बे स्टेटचे विभाजन होऊन महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांची निर्मिती झाली. त्या वेळेच्या करारानुसार, हा भूखंड महाराष्ट्राच्या वाटय़ाला आला. पण भूखंडाचा कब्जा मात्र शहा कुटुंबाकडेच होता.