देशभरात महाराष्ट्रातील सर्वाधिक शहरे प्रदूषित
देशातील सर्वाधिक प्रदूषित ९४ शहरांमध्ये महाराष्ट्रातील १७ शहरांचा समावेश असून या १७ शहरांमध्ये मुंबई, नवी मुंबई, बदलापूर, उल्हासनगर आणि पुण्याचा समावेश आहे.


२०११ ते २०१५ दरम्यानच्या कालावधीमध्ये केलेले सर्वेक्षण आणि चाचण्यांमधून राज्यातील १७ शहरांमधील हवेमध्ये पार्टिक्युलेट मॅटर (पीएम १०) या प्रदूषित घटकाचे प्रमाण निश्चित पातळीपेक्षा किती तरी अधिक असल्याचे आढळून आले आहे. 

याशिवाय पुणे, बदलापूर आणि उल्हासनगर या शहरांमध्ये पीएम १० बरोबरच नायट्रोजन डायऑक्साइड (एनओ२) याही प्रदूषक घटकाची पातळी प्रमाणापेक्षा अधिक आहे. केंद्रीय प्रदूषण नियत्रंण मंडळाने हे सर्वेक्षण केले आहे. 

केंद्राने निश्चित केलेल्या मानकानुसार, ‘पार्टिक्युलेट मॅटर १०’चे वार्षिक सरासरी प्रमाण ६० आणि नायट्रोजन डॉयऑक्साइडचे वार्षिक सरासरी प्रमाण ४०पेक्षा अधिक असल्यास त्या शहरांना प्रदूषित शहरे म्हटले जाते.

महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेशातील पंधरा, पंजाबमधील आठ, निसर्गसुंदर हिमाचल प्रदेशामधील सात शहरांचा समावेश आहे



नागालँडच्या मुख्यमंत्रिपदी शुरहोझेलाई लिझित्सू
नागालँडच्या मुख्यमंत्रिपदासाठी सहमतीचे उमेदवार म्हणून नागालँड पीपल्स फ्रन्टचे (एनपीएफ) अध्यक्ष शुरहोझेलाई लिझित्सूयांची निवड करण्यात आली. ते टी.आर. झेलियांग यांची जागा घेतील.



डेमोक्रॅटिक अलायन्स ऑफ नागालॅण्डच्या (डीएएन) बैठकीत नवे मुख्यमंत्री म्हणून लिझित्सू यांची निवड करण्यात आली. या बैठकीला ५९ आमदार उपस्थित होते. लिझित्सू डीएएनचेही अध्यक्ष आहेत. 
झेलियांग यांनी अलीकडेच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. 

नगरपालिका निवडणुकांत ३३ टक्के जागा महिलांसाठी राखीव असतील, अशी घोषणा राज्य सरकारने केल्यानंतर नागालँडमध्ये निदर्शनांना तोंड फुटले होते. विविध संघटना नगरपालिका निवडणुका रद्द करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. परिणामी झेलियांग यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले.



चंद्रशेखरन टाटा उद्योग समूहाचे नवे चेअरमन
टाटा उद्योग समूहाचे नवे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी २१ फेब्रुवारी रोजी कार्यभार स्वीकारला.

५३ वर्षीय चंद्रशेखरन यांनी ७९ वर्षीय रतन टाटा यांची जागा घेतली आहे. गेल्या वर्षी २४ ऑक्टोबर रोजी तत्कालिन चेअरमन सायरस मिस्त्री यांना पदावरून हाकलण्यात आले होते. रतन टाटा यांनी चेअरमनपदाचा हंगामी कार्यभार स्वीकारला होता.

टाटा समूहाचे मुख्यालय असलेल्या ‘बॉम्बे हाऊस’च्या बाहेर पत्रकारांशी बोलताना चंद्रशेखरन म्हणाले की, आम्ही सर्व जण मिळून व्यवसायाच्या सर्व क्षेत्रात चांगली कामगिरी करण्यास काम करू. आम्ही कोणाचेही अनुकरण करणार नाही. आम्ही नेतृत्व करू. 

मीठापासून सॉफ्टवेअरपर्यंत विविध व्यवसायात असलेला टाटा उद्योग समूह १०३ अब्ज डॉलरचा आहे.



आशियाई हॉकी महासंघाच्या उपाध्यक्षपदी सरकार यांची निवड
भारताच्या अभिजित सरकार यांची आशियाई हॉकी महासंघाने (एएचएफ) उपाध्यक्षपदी निवड केली. 

तसेच त्याप्रमाणे, एएचएफने आर्थिक आणि टीव्ही समितीच्या प्रमुखपदीही सरकार यांची नेमणूक केली आहे. २००४ सालापासून सरकार सहारा परिवाराशी जोडले गेले आहेत.

७ फेब्रुवारी झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीतील निर्णयाच्या आधारे सरकार यांची निवड झाली आहे. 

गेल्या काही काळापासून सरकार भारतीय हॉकीच्या प्रगतीमध्ये जोडले गेले आहेत. त्यांच्या नेतृत्वामध्ये सहारा इंडियाने हॉकी इंडिया लीगमध्ये उत्तर प्रदेश विजार्ड संघाला खरेदी केले होते.



भारतासाठी ‘आधार’शी संलग्न स्काईप लाईट सेवा लाँच
मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी भारतीयांसाठी दोन महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. भारतासाठी आधारशी संलग्न स्काईप लाईट या सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. 

याशिवाय प्रोजेक्ट संगम हा उपक्रमही सुरु करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कुशल कारागीरांना रोजगार मिळवून दिला जाईल असे नाडेला यांनी म्हटले आहे.

बुधवारी नाडेला यांनी भारतातासाठी मायक्रोसॉफ्टतर्फे नवीन घोषणा केल्या. भारतातील कंपन्यांसाठी क्लाऊड कॉम्प्यूटींग सुविधेची माहिती त्यांनी दिली. याशिवाय भारतासाठी स्काईप लाईट ही सुविधा सुरु करण्यात येणार असून ही सुविधा आधारशी संलग्न असेल अशी माहिती त्यांनी दिली. 

प्रॉजेक्ट संगम हा उपक्रमही त्यांनी सुरु केल्याचे सांगितले. भारताच्या आर्थिक व्यवस्थेमध्येही डिजिटल क्रांती होत असून स्टेट बँक ऑफ इंडियानेही आता क्लाऊडची मदत घेतली आहे. बँकेचे ३६५ कार्यालय क्लाऊड सुविधेशी जोडल्याचे त्यांनी सांगितले. आंध्रप्रदेशने नागरी सुविधेसाठी मायक्रोसॉफ्टच्या क्लाऊडचा आधार घेतल्याचे त्यांनी सांगितले. 

नाडेला यांनी ९९डॉट्स या उपक्रमाचीही माहिती दिली. या उपक्रमामुळे डॉक्टरांना क्षयरोग झालेल्या रुग्णांशी संवाद साधणे सोपे झाल्याचे ते म्हणालेत.



चार देशांतील १४ लाख मुले तीव्र कुपोषणग्रस्त
नायजेरिया, सोमालिया, दक्षिण सुदान आणि येमेन या देशांतील १४ लाख मुले तीव्र कुपोषणग्रस्त असून त्यातील अनेक मुलांचा या वर्षी मृत्यू होण्याची शक्यता युनिसेफने वर्तविली आहे.  युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन फंड (युनिसेफ) ने एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे हा इशारा दिला आहे. 

येमेनमध्ये मागील दोन वर्षांपासून युद्धपरिस्थिती आहे. त्यामुळे येथील चार लाख ६२ हजार मुले कुपोषित आहेत. तर ईशान्य नायजेरियातील साडेचार लाख मुले कुपोषित असल्याची माहिती युनिसेफने दिली आहे. येथील कुपोषणाबाबत संबंधित यंत्रणेला ताकीद देण्यात आली आहे. 


नायजेरियातील काही दुर्गम भाग मागील वर्षांपासून कुपोषणाने प्रभावित आहे. या भागात मदत करणाऱ्या संस्थांना पोहोचणे अशक्य असल्यामुळे येथील समस्येत भर पडल्याचेही युनिसेफने स्पष्ट केले.

सोमालियातील दुष्काळामुळे येथील एक लाख ८५ हजार मुले कुपोषणाने ग्रस्त आहेत. ही परिस्थिती आणखी भीषण झाली असून कुपोषित मुलांची संख्या आगामी काही महिन्यांत दोन लाख ७० हजारांपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याचे युनिसेफने सांगितले. 

दक्षिण सुदानमध्ये दोन लाख ७० हजार मुलांची उपासमार होत आहे. युनिसेफचे अध्यक्ष अँथनी लेक यांनी याबाबत चिंता व्यक्त केली असून तातडीने उपाययोजना केल्यास असंख्य जणांचे प्राण वाचविणे शक्य असल्याचे ते म्हणाले. 

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा कौन्सिलचे राजदूत पुढील महिन्यात उत्तर नायजेरिया, कॅमेरून, चाद आणि निजर या भागात प्रवास करणार आहेत. बोको हराम या दहशतवादी संघटनेशी सुरू असलेल्या वादामुळे या भागात कुपोषणाची समस्या तीव्र होत असून या मुद्दय़ाकडे जागतिक समुदायाचे लक्ष वेधून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.



पृथ्वीच्या आकाराचे सात ग्रह आढळले
सूर्यमालेबाहेर पृथ्वीच्या आकाराचे एक, दोन नव्हे, तर तब्बल सात ग्रहांचा समूह असण्याचा दावा अमेरिकेतील खगोलशास्त्रज्ञांनी पत्रकार परिषदेत केला. विशेष म्हणजे या ग्रहांवर पाणी आणि त्यामुळे जीवसृष्टी असण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. 

सौरमालेबाहेर अशा पद्धतीने एकाचवेळी इतक्या ग्रहांचा समूह असण्याचा दावा पहिल्यांदाच करण्यात आला आहे. 

सौरमालेपासून या नव्या ग्रहांच्या समूहाचे अंतर ४० प्रकाशवर्षे दूर असून, या ग्रहांची रचनाही पृथ्वीसारखीच असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या आधी अशा पद्धतीने सौरमालेबाहेर पृथ्वी आणि भोवतीच्या ग्रहांसारखीच रचना असलेला ग्रहांचा समूह आढळून आला नव्हता.

या सात ग्रहांपैकी तीन ग्रहांवर पाण्याची स्रोत आढळून आले आहेत. या सहाही ग्रहांवरील तापमान अत्यंत थंड किंवा अत्यंत उष्ण नाही. त्यामुळे तिथे पाण्याचे अस्तित्व असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. 

सात पैकी पाच ग्रहांचा आकार अगदी पृथ्वी इतकाच आहे. तर उर्वरित दोन ग्रह पृथ्वीपेक्षा आकाराने लहान आहेत. आपल्या सौरमालेबाहेरही पृथ्वीसारखे ग्रह असू शकतात, या दाव्याला या नव्या शोधामुळे बळ मिळाले आहे. 

आपल्या सौरमालेतील मंगळ आणि शुक्र हे दोन्ही ग्रह पृथ्वीच्या आकाराचे आहेत. बुध हा आकाराने पृथ्वीपेक्षा लहान आहे. तर उर्वरित चार ग्रह आकाराने पृथ्वीहून मोठे आहेत. 



भारत जगातील सर्वाधिक शस्त्र आयात करणारा देश
मागील पाच वर्षांमध्ये जगभरात शस्त्र व्यापारात मोठी वाढ झाली असून, प्रमुख शस्त्र आयातदारांच्या यादीत भारत प्रथम क्रमांकावर आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

२०१२ ते २०१६ या कालावधीत झालेल्या शस्त्र आयातीमध्ये एकट्या भारताचा वाटा १३ टक्के होता. भारतानंतर सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, चीन आणि अल्जेरिया या देशांचा क्रमांक लागतो. 
२००७ ते २०११ या काळातही या यादीत भारतच प्रथम क्रमांकावर होता. त्या वेळी एकूण शस्त्र आयातीमध्ये भारताचा वाटा ९.७ टक्के होता.

बहुतेक आखाती देश येमेन, सीरिया आणि इराकमधील संघर्षामध्ये गुंतले असल्याने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र आयात केली जाते. गेल्या पाच वर्षांमध्ये सौदी अरेबियाच्या शस्त्र आयातीमध्ये तब्बल २१२ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. एकूण आयातीमध्ये त्यांचा वाटा ८.२ टक्के आहे.

चीन आणि पाकिस्तान या अण्वस्त्रधारी देशांबरोबर तणावाचे संबंध असल्याने भारतानेही आपली लष्करी ताकद वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराचे आधुनिकीकरण करण्यासाठी २५० अब्ज डॉलर खर्च करण्याचा निश्‍चय केला असून, यामध्ये लढाऊ विमानांपासून पाणबुड्यांपर्यंत सगळीकडे सुधारणा केली जाणार आहे. 

यामुळे भारताची अमेरिका, रशिया आणि इस्राईलकडून आयात वाढली आहे. चीनला मात्र स्थानिक पातळीवर शस्त्रनिर्मिती करण्यात बऱ्यापैकी यश येत असल्याचे अहवालात म्हटले आहे



नासाकडून ‘स्पेस-एक्स’च्या फाल्कन-९ रॉकेटचे प्रक्षेपण
सुमारे ५० वर्षांपूर्वी चांद्रमोहिमेवर जाणाऱ्या अंतराळवीरांनी जिथून उड्डाण केले त्या ‘नासा’च्या लाँच पॅडवरून स्पेस-एक्सच्या फाल्कन-९ रॉकेटचे १९ फेब्रुवारी रोजी प्रक्षेपण करण्यात आले. अवकाश स्थानकाला पुरवठा करण्यासाठी हे रॉकेट सोडण्यात आले आहे. 

चांद्रयानाचे प्रक्षेपण करण्यासाठी येथील लाँचपॅड वापरले जाते. प्रदीर्घ काळापासून ते वापरले गेले नव्हते. अंतराळातील ये-जा करण्याची मोहीम (शटल प्रोग्रॅम) सहा वर्षांपूर्वी संपल्यानंतर नासाचे अत्यंत महत्त्वाचे आणि ऐतिहासिक असे लाँच काँप्लेक्स ३९ए प्रथमच उड्डाणासाठी वापरण्यात आले. 

अमेरिकेतील अवकाशसंबंधी निर्मिती आणि वाहतूक करणारी अवकाश संशोधन तंत्रज्ञान महामंडळ तथा स्पेस-एक्स ही संस्था आहे.
मागील वर्षी उन्हाळ्यात एका रॉकेटचा स्फोट झाल्यानंतर स्पेस-एक्सच्या वतीने प्रथमच फ्लोरिडातून रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले.