कासवांच्या संवर्धनासाठी वनविभागाचा पुढाकार
वनविभागाच्या पुढाकाराने रायगड जिल्ह्य़ातील हरिहरेश्वर आणि दिवेआगर समुद्र किनाऱ्यावर सागरी कासव संवर्धन मोहिम सुरु करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांत दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर दिडशेहून अधिक कासवांची पिल्ले समुद्रात सुखरुप सोडण्यात यश आले आहे.


भारतीय उपखंडात चार ते पाच प्रकारच्या सागरी कासवांचा वावर दिसून येतो. यात प्रामुख्याने ऑलिव्ह रिडले, ग्रीन टर्टल, हॉक्स बिल टर्टल आणि लेदर बॅक टर्टल या चार प्रकारच्या सागरी कासवांच्या प्रजातीचा समावेश आहे. कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले आणि ग्रीन टर्टल या दोन प्रकारच्या सागरी कासवांचे अस्तित्त्व दिसून येते. 



सुपरसॉनिक क्रूझ ब्राह्मोस क्षेपणास्राची यशस्वी चाचणी
भारत व रशियाने संयुक्तरित्या विकसित केलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चंदीपूर येथील प्रक्षेपणस्थळावर शनिवारी घेण्यात आलेली चाचणी यशस्वीरित्या पार पडली. 

सुपरसॉनिक क्रूझ ब्राह्मोस असून, त्याची मारक क्षमता ४५० किलोमीटरपर्यंतचे लक्ष अचूकपणे टिपू शकते. या नव्या ब्राह्मोस क्षेपणास्रामध्ये अचूक लक्ष भेदण्याची क्षमता आहे.


नवीन तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आलेले हे क्षेपणास्र संरक्षण दलातील आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्हीं दलांची शक्ती वाढणार आहे. सर्वात अचूक लक्ष्यभेदी क्षमता असणारे हे जगातील पहिले क्षेपणास्र आहे.

‘डिआरडीओ’चे प्रमुख ख्रिस्तोफर या क्षेपणास्राविषयी म्हणाले की, भारत-रशियाच्या संगनमतानेच ब्राह्मोसची मारक क्षमता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ब्राह्मोसच्या आणखी एका आवृत्तीवर काम सुरु असून, ८०० किमी पल्ल्याचे लक्ष्य गाठणारे क्षेपणास्र लवकरच भारतीय ताफ्यात समाविष्ट होणार आहे. पुढील दोन ते अडीच वर्षात हे क्षेपणास्र चाचणीसाठी तयार असेल.



राज्यसभेत शत्रू मालमत्ता विधेयक मंजूर
येथील संपत्ती सोडून पाकिस्तान व चीनमध्ये गेलेल्या लोकांना त्यावर दावा सांगता येणार नाही, अशी तरतूद असलेले शत्रू संपत्ती विधेयक राज्यसभेत मंजूर झाले. 

शत्रू संपत्ती (सुधारणा ) विधेयक २०१६ हे शत्रू सपंती कायदा १९६८ मध्ये सुधारणा करून तयार केलेले नवे विधेयक असून राज्यसभेत ते आवाजी मतदानाने मंजूर झाले.

शत्रू संपत्तीला वारसा कायदा लागू होणार नाही व त्याचे हस्तांतरण ताबेदाराकडून शत्रूकडे किंवा संबंधितांकडे होणार नाही. शत्रू मालमत्तेची प्रकरणे हाताळण्यास दिवाणी न्यायालये व इतर अधिकाऱ्यांना प्रतिबंध करण्यात आला आहे.

एकदा ही मालमत्ता ताबेदाराने (सरकार) ताब्यात घेतली की मग संबंधित संस्था व व्यक्ती नंतरच्या काळात शत्रू या संज्ञेत राहिली नाही किंवा त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तरी ती मालमत्ता शत्रू मालमत्ता म्हणूनच गणली जाईल व परत केली जाणार नाही. 



सायना व सिंधू यांचा पराभव
ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी.व्ही. सिंधूला ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या तैपेईच्या ताय झू यिंगने सिंधूवर २१-१४, २१-१० असा विजय मिळवला. 

जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या सिंधूने ऑलिम्पिक पदकापर्यंतच्या वाटचालीत यिंगला नमवण्याची किमया केली होती. 

प्रकाश पदुकोण (१९८०) तर पुल्लेला गोपीचंद (२००१) यांच्यानंतर एकाही भारतीय बॅडमिंटनपटूला ऑल इंग्लंड स्पर्धा जिंकता आलेली नाही. 

पी.व्ही. सिंधूपाठोपाठ अनुभवी सायना नेहवाललाही ऑल इंग्लंड बॅडिमटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. दोघींच्या पराभवासह स्पर्धेतले भारताचे आव्हान संपुष्टात आले. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असणाऱ्या कोरियाच्या स्युंग जी ह्युआनने अटीतटीच्या लढतीत सायनावर २२-२०, २२-२० अशी मात करत उपांत्य फेरी गाठली.

सलग आठ र्वष सायनाने ऑल इंग्लंड स्पर्धेची किमान उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. 



अमेरिकेच्या न्याय विभागात भारतीय वंशाची महिला
अमेरिकेच्या न्याय मंत्रालयाच्या नागरी हक्क विभागात भारतीय वंशाच्या अमेरिकन वकील हरमित धिल्लन यांची निवड होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 

अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या तीन नागरिकांवर गेल्या दोन आठवड्यांत वंशद्वेषातून हल्ले झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर धिल्लन यांची निवड महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

हरमित धिल्लन यांचा जन्म चंडिगडचा असून, सध्या त्या कॅलिफोर्नियातील रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या आहेत. ऍटर्नी जनरल जेफ सेसिऑन्स यांनी गेल्या आठवड्यात त्यांची मुलाखत घेतली होती. 

क्‍लिव्हलॅंड येथे जुलै महिन्यात झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या दुसऱ्या परिषदेचे उद्‌घाटन त्यांनी शीख धर्मीयांच्या प्रार्थनेने केली होती. 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जर हरमित धिल्लन यांच्या निवडीला पाठिंबा दिला, तर न्याय विभागात या पदावर असलेल्या भारतीय वंशाच्या विनिता गुप्ता यांच्या जागी त्यांची निवड होईल. गुप्ता यांची निवड माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी केली होती.



नासाला सापडले भारताचे हरवलेले चंद्रयान-१
भारतीय अवकाश संशोधन संस्था ‘इस्त्रो’ने २००८ मध्ये चंद्रावर भारताचे पहिले मानवरहित यान, चंद्रयान -१ पाठवले होते. चंद्राभोवती प्रदक्षिणा घेतल्यानंतर २००९ पासून त्याच्याशी इस्त्रोचा संपर्क तुटला. 

अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र, यामध्ये अपयश आल्यानंतर हे चंद्रयान हरवल्याचे घोषित करण्यात आले पण, आता ते सापडले आहे. संपर्क तुटण्याआधीच भारताच्या चंद्रयानाने चंद्रावर पाणी आहे असे सांगितले होते.

अमेरिकेची स्पेस एजन्सी ‘नासा’ने चंद्रयान -१ सापडल्याचा दावा केला आहे. ते चंद्रयान अजूनही चंद्राला प्रदक्षिणा घालत असल्याचं नासाच्या वैज्ञानिकांनी सांगितले आहे. 

विशेष म्हणजे चंद्रयान पाठवताना ते केवळ २ वर्ष हे या मोहिमेवर राहील अशी योजना आखण्यात आली होती. पण नासाने ते यान अजूनही चंद्राला प्रदक्षिणा घालत असल्याचे सांगितले आहे. 

चंद्राच्या पृष्ठभागापासून २०० किमी दूर अंतरावर हे चंद्रयान एका कक्षेत आहे असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. हे यान शोधण्यासाठी इंटर प्लानेटरी रडारचा वापर करण्यात आला. या रडारचा उपयोग लघुग्रहांचे निरीक्षण करण्यासाठी केला जातो. 

२२ ऑक्टोबर २००८ मध्ये श्री हरीकोटा येथून इस्त्रोने पहिल्या चंद्रयानाचे प्रक्षेपण केले होते. चंद्राच्या कक्षेत ३४०० फेऱ्या मारल्यानंतर ते ९ ऑगस्ट २००९ पासून गायब झाले होते.