ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक गोविंद तळवलकर यांचे निधन
ज्येष्ठ पत्रकार, लेखक, साक्षेपी संपादक गोविंद तळवलकर यांचे बुधवारी अमेरिकेतील ह्युस्टन येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. महाराष्ट्रासोबत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा सखोल अभ्यास असणारे व्यक्तिमत्व म्हणून ते सर्वांना परिचित होते. 


त्यांनी ‘नवभारत’मधून पत्रकारिता क्षेत्रातील कारकीर्दीची सुरूवात केली. त्यानंतर तब्बल १२ वर्षे ते लोकसत्तामध्ये उपसंपादक होते. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र टाइम्सचे संपादक म्हणून तब्बल २८ वर्षे काम केले.  

गोविंद तळवलकर यांच्यावर लोकमान्य टिळक आणि एम.एन. रॉय यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांची एकूण २५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल तळवलकर यांना महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा लोकमान्य टिळक पुरस्कार, बी.डी. गोएंका. दुर्गारतन अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते

त्यांची गाजलेली पुस्तके
शेक्सपिअर.. जगाचा नागरिक (पूर्वार्ध), शेक्सपिअर.. आंतरिक नाते (उत्तरार्ध), अफगाणिस्तान, नौरोजी ते नेहरू (१९६९), बाळ गंगाधर टिळक (१९७०), वाचता वाचता (पुस्तक परीक्षणांचा संग्रह, खंड १ आणि २ (अनुक्रमे १९७९ आणि १९९२), परिक्रमा (१९८७), अभिजात (१९९०), बदलता युरोप (१९९१), अक्षय (१९९५), ग्रंथ सांगाती (१९९२), डॉ. झिवागोचा इतिहास (लेख ललित दिवाळी अंक, २०१५), नेक नामदार गोखले, पुष्पांजली (व्यक्तिचित्रे, मृत्युलेख संग्रह), प्रासंगिक, बहार, मंथन, शेक्सपियर – वेगळा अभ्यास (लेख – ललित मासिक, जानेवारी २०१६), सत्तांतर (खंड १-१९७७ , 2-१९८३, व ३-१९९७), सोव्हियत साम्राज्याचा उदय आणि अस्त (खंड १ आणि २)

अग्निकांड : “युद्धाच्या छायेत” ह्या स्तंभलेखनाचा पुस्तकरूपी संग्रह

इराक दहन : सद्दाम हुसेन यांच्या पाडावाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या विरोधात अमेरिकेने पुकारलेल्या लढ्याची सखोल चिकित्सा



१ एप्रिलपासून पाच बँकांचे होणार एसबीआयमध्ये विलीनीकरण
१ एप्रिलपासून देशातील ५ बँकांचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण होणार आहे. १ एप्रिलपासून या पाच बँका स्टेट बँक ऑफ इंडियाचा एक भाग असणार आहेत. 


या बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ बीकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर आणि स्टेट बँक ऑफ पतियाळा या बँकांचा समावेश आहे.

१ एप्रिलपासून या सर्व बँकांच्या शाखा एसबीआयच्या ब्रँचच्या स्वरुपात काम करणार आहेत. 

भारतीय महिला बँकेचे सुद्धा एसबीआयमध्ये विलीनीकरण होणार आहे. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर भारतीय महिला बँकेचंही स्टेट बँकेत विलीनीकरण करण्याची घोषणा करण्यात आली आहे.



भारताचा मानवी विकास निर्देशांक १३१ व्या क्रमांकावर
जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या अर्थव्यवस्थेची म्हणजेच भारताची स्थिती मानवी विकास निर्देशांकाबाबतीत खूप खालावली आहे. 

भारताचा मानवी विकास निर्देशांक यादीमध्ये १३१ वा क्रमांक आहे. एका हाताला भारत अर्थव्यवस्थेबाबत अमेरिका, चीन सारख्या मोठ्या देशांसोबत स्पर्धा करत आहे तर मानवी विकास निर्देशांकाच्या बाबतीत भारताची स्थिती पाकिस्तान आणि नेपाळसारखी आहे. 

जगातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण, झपाट्याने वाढणारी आणि लक्षवेधी अर्थव्यवस्था मात्र मानवी विकासाबाबत उदासीन दिसत असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे. 
गेल्या काही वर्षांपासून भारताने मानवी विकास निर्देशांकाच्या बाबतीत काहीच प्रगती केली नसल्याचे दिसत आहे. 

२०१५ मध्ये भारत आणि चीनमध्ये सर्वाधिक परकीय गुंतवणूक झाली असल्याचे अर्थतज्ज्ञ सांगत आहेत परंतु २०१५ मध्ये देखील भारताची मानव विकास निर्देशांकाची स्थिती खालवलेली होती असे दिसून आले. 

२०१४ मध्ये देखील भारताचा या यादीतील क्रमांक १३१ वा होता. गेल्या काही वर्षात यामध्ये काहीच बदल न झाल्याने अद्यापही भारताचा या यादीतील क्रमांक १३१ आहे.



ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा मिळणार
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या जागी आता नवीन आयोग स्थापन केला जाणार आहे. 

या निर्णय़ानुसार आता देशातील ओबीसी प्रवर्गातील घटकांसाठी एससी-एसटी आयोगाच्या धर्तीवर ‘नॅशनल कमिशन फॉर सोशल अॅण्ड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस’ची स्थापना केली जाणार आहे. 

एनएसईबीसी ही घटनात्मक संस्था असणार आहे. त्यामुळे ओबीसीमध्ये नव्या जातींचा समावेश करण्यासाठी अथवा त्यातून नावे हटवण्यासाठी संसदेची परवानगी लागणार आहे. 

एनएसईबीसीच्या स्थापनेला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर आता केंद्र सरकार संसदेत विधेयकातील सुधारणा प्रस्ताव मांडणार आहे. सद्यस्थितीत ओबीसीमध्ये नवीन जातींचा समावेश अथवा नावे हटवण्यासंदर्भात सरकार पातळीवर निर्णय घेतला जात होता. 

दरम्यान, जाट आरक्षणासह देशभरातून ओबीसी आरक्षणाची होणारी मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे, असे सांगण्यात येत आहे.

सद्यस्थितीत असलेल्या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग कायदा १९९३च्या जागी नवीन आयोगाची स्थापना करण्यात य़ेणार आहे. नॅशनल कमिशन फॉर सोशल अॅण्ड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस (एनएसईबीसी) या आयोगाची स्थापना करण्यात येईल. या आयोगावर एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि तीन सदस्यांची नेमणूक केली जाणार आहे.



विश्वचषक शॉटगन स्पर्धेत अंकुर मित्तलचा सुवर्ण वेध

भारताचा नेमबाज अंकुर मित्तल याने विश्वचषक शॉटगन नेमबाजीत दिमाखात तिरंगा फडकवताना सुवर्ण पदकाचा वेध घेतला. 

विशेष म्हणजे, यावेळी मित्तलने अंतिम फेरीत विश्वविक्रमाशी बरोबरी साधली. त्याने ऑस्ट्रेलियाचा प्रतिस्पर्धी जेम्स विलेटला पराजित करत बाजी मारली.

२३ मार्च रोजी झालेल्या सहा खेळाडूंच्या अंतिम फेरीत अंकुरने ८० पैकी सर्वाधिक ७५ गुणांसह भारताला स्पर्धेत पहिले पदक जिंकून दिले. 

तसेच दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या विलेटला ७३ गुणांसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.



भारत मॉरिशसला सहकार्य करणार
मॉरिशसच्या ऊर्जाविषयक गरजा भागविण्यासाठी भारत सतत पाठिंबा देत राहील, असे आश्वासन पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मॉरिशसचे उपपंतप्रधान शोकुताली सोधून यांना दिले.

प्रधान यांनी नवी दिल्ली येथे सोधून यांची भेट घेऊन व्दिपक्षीय मुद्यांवर चर्चा केली. भारताचा सार्वजनिक उपक्रम असलेली हायड्रोकार्बन क्षेत्रातील मंगलोर रिफायनरी अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (एमआरपीएल) ही रिफायनरी २००६ पासून मॉरिशसला पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा करीत आहे.

तसेच हे दोन्ही देश तेल आणि वायू क्षेत्रातील व्दिपक्षीय सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.



एलएचसी प्रयोगात पाच नवीन कणांचा शोध
अणूचे पाच नवीन उपकण लार्ज हैड्रॉन कोलायडर या महाकाय उपकरणाच्या मदतीने केलेल्या प्रयोगात शोधण्यात आले आहेत. एकाच निरीक्षणात अणूच्या उपकणातील पाच अवस्था सापडण्याचे हे दुर्मीळ संशोधन आहे.

एलएचसी प्रयोग हा जगातील सात कण भौतिकी शोधन प्रयोगांपैकी एक असून युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्युक्लीयर रीसर्च या संस्थेच्या नेतृत्वाखाली तो केला जात आहे. काही अणू उपकणांचे क्षरण यात आढळून आले असून त्यात द्रव्य-प्रतिद्रव्य असममिती दिसून आली आहे. 

नवीन कण हे उत्तेजित अवस्थेत असून त्यांची ऊर्जा क्षमता खूप जास्त आहे. यातील कणाचे नाव ओमेगा सी झिरो असे आहे, त्याला बेरीऑन असेही म्हणतात. त्यात तीन क्वार्क असतात.

ओमेगा सी झिरोचे क्षरण होऊन एक्सआय-सी-प्लस व काओन के हा कण तयार होतो, एक्स आय प्लस कणाचे क्षरण होऊन त्यात काओन के व प्रोटॉन पी व पियॉन पी प्लस हे कण तयार होतात. 

ओसी (३०००)०, ओसी (३०५०)०, ओसी (३०६६)०, ओसी (३०९०)० व ओसी (३११९)० अशी या कण अवस्थांची नावे असून त्यात त्यांचे वस्तुमान मेगाइलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये आहे, बेरीऑन मध्ये तीन क्वार्क कसे बंधित असतात व क्वार्कमधील परस्पर संबंधातून मल्टी क्वार्क स्टेटसचेही ज्ञान मिळणार आहे. त्यात टेट्राक्वार्क व पेंटाक्वार्कचा समावेश आहे.



भारतीय हवाई दलाचा इस्रायलमध्ये संयुक्त युद्धाभ्यास
भारतीय हवाई दलाचे वैमानिक इस्रायलमध्ये जाऊन युद्धाभ्यास करणार आहेत. अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनी यांच्यासह भारतीय वैमानिक संयुक्त युद्धाभ्यास करणार आहे. 

विशेष म्हणजे चीन आणि पाकिस्तानला या युद्धाभ्यासात स्थान देण्यात आलेले नाही. हा संयुक्त युद्धाभ्यास हवाई ड्रिल इतिहासातील सर्वात मोठा आणि जटिल संयुक्त युद्धाभ्यास मानला जातो आहे.

इस्रायलमध्ये करण्यात येणाऱ्या संयुक्त युद्धाभ्यासाची संपूर्ण माहिती अध्याप समोर आलेली नाही, असे वृत्त इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे. 

भारतीय हवाई दलाचे वैमानिक वर्षाच्या शेवटी ब्लू फ्लॅग एक्सरसाइजमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिल्याचे इकॉनॉमिक टाईम्सने म्हटले आहे. 

भारत पहिल्यांदाच इस्रायलमध्ये इतर देशांसह संयुक्त युद्धाभ्यास करणार आहे. इस्रायल भारताला लष्करी साहित्य आणि हत्यारे पुरवणारा प्रमुख देश आहे. 

भारतासह सात देश या युद्धाभ्यासात सहभाग घेणार आहेत. जवळपास १०० लढाऊ विमानांचा या युद्धाभ्यासात सहभाग असणार आहे.