जीएसटी विधेयक राज्यसभेत मंजूर
गेल्या कित्येक वर्षांपासून अडकून पडलेले वस्तू आणि सेवा कर विधेयक हे राज्यसभेतही मंजूर झाले आहे. २९ मार्च रोजी जीएसटीशी संबंधित चार विधेयके लोकसभेत मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर आता राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाले आहे. 


नव्या कायद्यामुळे देशभरात एकसमान करप्रणाली तयार होईल आणि त्यामुळे व्यवहारांमध्ये पारदर्शकता येईल. जीएसटी संदर्भातील शेवटची मंजुरी १७-१८ मे रोजी मिळेल असे अरुण जेटली म्हणाले. 


१ जुलैपासून या कायद्याची संपूर्ण देशभरात अंमलबजावणी केली जाणार आहे.जीएसटीमुळे सर्व देशात वस्तूंचे एकसमान दर राहतील. 

जीएसटी हे १९५० पासून आतापर्यंत सर्वात मोठे अर्थविषयक विधेयक होते. जीएसटी लागू झाल्यानंतर भाववाढ आणि चलन फुगवटा होऊ शकतो. १ जुलै पासून काही काळ ही भाववाढ अनुभवास येऊ शकते. नंतरच्या काळात किमती स्थिर देखील होतील. 

अवाजवी कर गुंता टाळून सुटसुटीतपणा आणणारा हा एक-सामाईक, किंबहुना एकमेव अप्रत्यक्ष कर संपूर्ण देशस्तरावर सारख्याच दराने लागू होईल. जीएसटी लागू झाल्यावर तो इतर सर्व करांची जागा घेईल.



आता रेल्वे विकास प्राधिकरण ठरवणार तिकिटांचे दर
रेल्वेच्या भाड्यात वाढ करण्याचे अधिकार आता रेल्वे मंत्र्यांकडे राहणार नाही. मोदी सरकारने रेल्वे विकास प्राधिकरणाला मंजुरी दिली असून या प्राधिकरणाकडे आता भाड्यात वाढ करण्याचे अधिकार असतील. 

केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वे विकास प्राधिकरणाला मंजुरी दिली आहे. रेल्वे विकास प्राधिकरण ही स्वायत्त संस्था असेल. या प्राधिकरणाचे मुख्य काम हे रेल्वेचे भाडे ठरवण्याचे असेल. 

यासोबतच रेल्वे प्रवाशांच्या हिताचे रक्षण करणे, प्रवासी भाड्याशिवाय अन्य मार्गातून उत्पन्न वाढवणे आणि त्याविषयी सुचना करणे अशी कामे या प्राधिकरणाकडे सोपवण्यात आली आहेत. तसेच फ्रेट कॉरीडोर सरकारी आणि खासगी भागीदारीवर कसे चालवता येतील यासंदर्भात विकास प्राधिकरणाच्या मताला महत्त्व असेल.

केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवलेल्या प्रस्तावानुसार रेल्वे विकास प्राधिकरणात एक अध्यक्ष आणि तीन सदस्य असतील. या सर्वांची पाच वर्षांसाठी नियुक्ती केली जाईल.

रेल्वे तिकिट दर आणि माल भाड्याचा वेळोवेळी आढावा घेऊन त्यात बदल करणे हे प्राधिकरणाचे मुख्य काम असेल असे सूत्रांनी सांगितले. याशिवाय रेल्वेतर्फे दिल्या जाणाऱ्या विविध सेवा आणि सुविधांवर किती दर आकारावा याचा निर्णयदेखील प्राधिकरणच घेईल. 

केंद्र सरकार काही रेल्वे मार्गांवर खासगी कंपन्यांना गाडी चालवण्याची परवानगी देण्याचा विचार करत आहे. अशा गाड्यांमधील दर किती असतील याचा निर्णयदेखील प्राधिकरणच घेणार आहे.



युवा वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या लालरिंन्नुन्गाला रौप्य पदक
जागतिक युवा वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भारताच्या जेरेमी लालरिंन्नुन्गाने ५६ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले आहे. 

इंटरनॅशन वेटलिफ्टिंग फेडरेशनकडून आयोजित करण्यात आलेल्या युवा वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताने पदकाची कमाई केली. जेरेमी लालरिंन्नुन्गाने रौप्य पदक जिंकत भारताला पहिले पदक पटकावून दिले.लालरिंन्नुन्गाने एकूण २४० किलो वजन उचलत दुसरे स्थान पटकावले. 

युवा वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या खेळाडूंना २०१८ च्या युवा ऑलिम्पिक खेळांमध्ये सहभागी होता होणार आहे. त्यामुळे युवा वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपला मोठे महत्त्व आहे.



सिंधूची क्रमवारीत द्वितीय स्थानी झेप
घरच्या मैदानावर जल्लोषी चाहत्यांच्या उपस्थितीत इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या पी.व्ही. सिंधूने जागतिक क्रमवारीत द्वितीय स्थानी झेप घेतली आहे. 

कारकीर्दीत सिंधूने क्रमवारीत घेतलेली ही सर्वोत्तम आगेकूच आहे. ‘भारताची फुलराणी’ सायना नेहवालनंतर क्रमवारीत अव्वल पाचमध्ये स्थान पटकावणारी सिंधू केवळ दुसरी भारतीय बॅडमिंटनपटू आहे. जपानच्या अकेन यामागुचीला मागे टाकत सिंधूने ७५७५९ गुणांसह दुसरे स्थान पटकावले.

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या कॅरोलिन मारिनला नमवत सिंधूने इंडिया खुल्या स्पर्धेच्या जेतेपदाची कमाई केली होती. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत महिला एकेरी प्रकाराच्या लढतीत कॅरोलिननेच सिंधूचे सुवर्णपदकाचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. 
सिंधूविरुद्धच्या पराभवामुळे कॅरोलिन क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आहे.

सायना नेहवालची क्रमवारीत एका स्थानाने घसरण झाली आहे. सायना आता नवव्या स्थानी आहे. मलेशिया स्पर्धेत सायनाला प्राथमिक फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. महिला क्रमवारीत तैपेईच्या ताइ झ्यु यिंग अव्वल स्थानी आहे. पुरुषांच्या क्रमवारीत अव्वल दहामध्ये एकही भारतीय बॅडमिंटनपटू नाही.



फिफा क्रमवारीत भारताची भरारी
फिफा क्रमवारीत भारताने १०१व्या स्थानापर्यंत झेप घेताना मागील दोन दशकांमधील सर्वोत्तम भरारी घेतली आहे. १९९६ मध्ये भारताने हे स्थान गाठण्याची किमया साधली होती.

मागील महिन्यात भारतीय संघ फिफा क्रमवारीत १३२व्या स्थानावर होता. मात्र आता ३१ स्थानांनी आगेकूच केली आहे. दोन महत्त्वाच्या विजयांमुळे आशियाई क्रमवारीतसुद्धा भारत ११व्या स्थानावर आहे. फिफा क्रमवारीत भारताने फेब्रुवारी १९९६ मध्ये ९४ व्या क्रमाकांवर मजल मारताना सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली होती.

मागील दोन वर्षांत भारताने १३ सामन्यांपैकी ११ सामने जिंकण्याची किमया साधली आहे. यात भूतानविरुद्धच्या अनधिकृत सामन्यांचाही समावेश आहे. या दोन वर्षांत भारताने एकंदर ३१ गोल झळकावले आहेत. 

नुकताच झालेल्या एएफसी आशिया चषक पात्रता फुटबॉल सामन्यात भारताने म्यानमारवर १-० असा ऐतिहासिक विजय मिळवला होता. ६४ वर्षांनंतर ही किमया भारताने साकारली होती. 

त्याआधी आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यात भारताने कंबोडियाचा ३-२ असा पराभव केला होता. याशिवाय गेल्या वर्षी भारताने प्यूटरे रिको संघाला ४-१ असे नामोहरम केले होते



मिस्बाह-उल-हकची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती
पाकिस्तानचा कसोटी संघाचा कर्णधार मिस्बा-उल-हकने आगामी वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

लाहोर येथे आज (गुरुवार) घेतलेल्या पत्रकार परिषदेत ४२ वर्षीय मिस्बाने निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये मी खेळत राहणार आहे, असे त्याने सांगितले. 

मिस्बा हा पाकिस्तानचा सर्वांत यशस्वी कसोटी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या ५३ सामन्यांपैकी २४ सामन्यांत पाकिस्तानने विजय मिळविलेला आहे.