राज्यात जलयुक्त शिवारसाठी स्वतंत्र प्राधिकरण
जलयुक्त शिवार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली.


तसेच यावर्षी जलयुक्त शिवार योजनेतील निधी अखर्चित राहिला आहे. याबाबत भाजपाचे परिणय फुके यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. 

पाऊस आणि निवडणूक आचारसंहितेमुळे काही कामे उशिराने सुरू झाली. एकूण २१ कोटी १४ लाख रुपयांचा निधी अखर्चिक राहिला होता; मात्र तो मार्च अखेरीला खर्च करण्यात आला आहे. 

जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत गेल्या वर्षी २००१५ कामे हाती घेण्यातआली. त्यापैकी १३५८२ कामे पूर्ण झाली आहेत.



स्मार्ट सिटी योजनेचा कोरियन कंपनीशी करार
कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी महापालिकेने कोरिया लॅण्ड हाऊसिंग कॉर्पोरेशन या सरकारी कंपनीशी सामंजस्य करार केला. ही कंपनी महापालिकेस स्मार्ट सिटी प्रकल्पाकरिता तांत्रिक व आर्थिक सहाय्य पुरवणार आहे. 

कोरिया सरकार चार हजार कोटी रुपये अर्थसहाय्य देणार आहे. यामुळे प्रकल्प अधिक गतीमान होणार आहे. 

तसेच यावेळी कंपनीचे पदाधिकारी कॅन कून फाँग, हु से चँग, पार्थ ज्यून सिमो, सॉन्ग जी सॉन्ग यांच्यासह महापौर राजेंद्र देवळेकर, आयुक्त ई. रवींद्रन आणि कोरियन कंपनीचे सल्लागार विवेक विचारे आदी मान्यवर उपस्थित होते.



राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर 
नुकतीच ६४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा करण्यात आली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये हिंदीतील ‘नीरजा’, तर मराठीतील ‘कासव’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ‘कासव’ला ‘सुवर्णकमळ’ मिळाले आहे.

 सुपरस्टार अभिनेता अक्षय कुमारला संपूर्ण कारकिर्दीत प्रथमच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ‘रुस्तम’ चित्रपटातील भूमिकेसाठी अक्षयला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. रुस्तम या नानावटी खटल्यावर बेतलेल्या चित्रपटात अक्षय कुमारने नौदलातील अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार ‘दंगल’मधील झायरा वासिम हिला मिळाला आहे. जम्मू-काश्मीरच्या मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतल्याने चर्चेत आली होती. 

विमानाचे अपहरण झालेले असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून दहशतवाद्यांना थोपवून ठेवत शेकडो प्रवाशांचे प्राण वाचविणारी हवाईसुंदरी नीरजा भानोत हिच्या जीवनावर आधारित नीरजा चित्रपटात नायिकेची भूमिका सोनम कपूरने साकारली आहे. 

सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्सचा पुरस्कार ‘शिवाय’ला मिळाला. सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता पुरस्कार ‘दशक्रिया’साठी मनोज जोशीने पटकावला. व्हेंटिलेटरला सर्वोत्कृष्ट व्हिडिओ रेकॉर्डिंग, साऊंड मिक्सिंगचा पुरस्कार मिळाला. तर सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार ‘धनक’ला मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट चित्रपट (सुवर्णकमळ) : कासव

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : राजेश मापुस्कर (व्हेंटिलेटर)
सर्वोत्कृष्ट अभिनेता : अक्षय कुमार (रुस्तम)
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता : मनोज जोशी (दशक्रिया)
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री : झायरा वासिम (दंगल)
सर्वोत्कृष्ट पटकथा : दशक्रिया
सर्वोत्कृष्ट वेशभूषा : सायकल
सर्वोत्कृष्ट व्हिडिओ रेकॉर्डिंग, साऊंड मिक्सिंग : व्हेंटिलेटर
सर्वोत्कृष्ट संकलन : व्हेंटिलेटर
सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट : पिंक
झारखंडला विशेष पुरस्कार
सर्वोत्कृष्ट बालचित्रपट : धनक
स्पेशल इफेक्ट्स : शिवाय



बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारत दौर्‍यावर
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे चार दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी ७ एप्रिल रोजी येथे आगमन झाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळावर जाऊ न त्यांचे स्वागत केले. भारत दौऱ्यादरम्यान त्या पंतप्रधान मोदींशी विविध मुद्यांवर चर्चा करतील.

मोदी पंतप्रधान बनल्यानंतर हसीना यांचा हा पहिला भारत दौरा आहे. हसीनांच्या दौऱ्यात दोन्ही देशांत नागरी अणुसहकार्य आणि संरक्षणासह विविध महत्त्वपूर्ण क्षेत्रात किमान २५ करार अपेक्षित आहेत. 

तथापि, तीस्ता पाणीवाटपावर करार होण्याची शक्यता कमी आहे. मोदी आणि हसीना सविस्तर चर्चा करतील. 

भारत लष्करी पुरवठ्यासाठी बांगलादेशला ५० कोटी डॉलरचे कर्ज सुविधा देण्याच्या तयारीत आहे



संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतिदूतपदी मलाला युसूफजाई
युनोच्या शांतिदूतपदी नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझाईची निवड करण्यात आली आहे. जगातील एखाद्या नागरिकास संयुक्त राष्ट्राकडून देण्यात येणारा हा सर्वोच्च सन्मान असून, संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी मलालाच्या नावाची घोषणा केली आहे. 

मलालाच्या हातून लहान मुलींच्या शिक्षणाच्या प्रसाराचे कार्य वाढावे या हेतूने हा पुरस्कार देण्यात येत आहे, असे गुटेरेस यांनी म्हटले. सोमवारी याबाबतची औपचारिकता पूर्ण होईल असे त्यांनी म्हटले.


पाकिस्तानमध्ये शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या मलालाविरोधात तालिबानचे दहशतवादी होते. या भागात शिक्षणाचा प्रसार थांबव असे त्यांनी तिला वेळोवेळी सांगितले होते. परंतु मलालाने त्याकडे दुर्लक्ष करत शिक्षण घेणे आणि त्याचा प्रसार करणे थांबवले नाही. 

दहशतवाद्यांनी २०१२ मध्ये तिच्यावर हल्ला करत तिला ठार करण्याचा प्रयत्नही केला. त्या हल्ल्यातून ती बचावली आणि पुन्हा आपले शिक्षण प्रसाराचे कार्य सुरू ठेवले. 

तिच्या या कार्याची दखल घेत नोबेल कमिटीने तिला शांततेचा २०१४ चा नोबेल पुरस्कार दिला. हा पुरस्कार स्वीकारणारी ती जगातील सर्वात तरुण व्यक्ती ठरली. भारताच्या कैलाश सत्यार्थींनादेखील हा पुरस्कार देण्यात आला होता.

मलाला युसूफझाईने मलाला फंड या ट्रस्टची स्थापना केली आहे. त्याद्वारे ती जगभरात शिक्षणाचा प्रसार करते. आफ्रिकन देश असो वा मध्य आशिया देश असो, तिच्या संस्थेतर्फे शिक्षणाचे कार्य सर्व ठिकाणी केले जाते. तिचे या कार्यातील समर्पण पाहूनच तिला हा पुरस्कार दिल्याचे गुटेरेस यांनी म्हटले आहे