नेत्यांवरील खटल्यांसाठी विशेष न्यायालये 
गुन्हे दाखल असलेल्या खासदार आणि आमदारांसाठी केंद्र सरकारने १२ विशेष न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. १२ डिसेंबर रोजी केंद्र सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टात ही माहिती देण्यात आली असून, यासाठी ७.८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


सरकारी आकडेवारीनुसार २०१४ पर्यंत भारतातील एकूण १५८१ खासदार आणि आमदारांविरोधात १३५०० खटले सुरु आहेत. न्यायालयातील संथप्रक्रियेमुळे हे खटले प्रलंबित राहतात.

राजकीय नेत्यांवरील फौजदारी खटले वेगाने मार्गी लागावेत, यासाठी केंद्र सरकारने विशेष न्यायालये स्थापन करावीत, असे आदेश सुप्रीम कोर्टाने नोव्हेंबर महिन्यात दिले होते. यासाठी कोर्टाने ८ आठवड्यांची मुदतही दिली होती.



दिग्दर्शक, अभिनेते नीरज व्होरा कालवश 
‘खिलाडी 420’, ‘फिर हेराफेरी’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे, तर ‘विरासत’, ‘रंगीला’, ‘मन’ या चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारे प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक नीरज व्होरा यांचे १४ डिसेंबर रोजी सकाळी मुंबईत निधन झाले.



भारतातले DNA फिंगरप्रिंटचे जनक लालजी सिंह यांचे निधन
भारतातले DNA फिंगरप्रिंटचे जनक म्हणून ओळखल्या जात असलेल्या प्रसिद्ध DNA वैज्ञानिक डॉ. लालजी सिंह यांचे वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले आहे.

डॉ. लालजी सिंह यांनी भारतात प्रथमच गुन्हे अन्वेषणाला १९८८ साली नवी दिशा देण्यासाठी DNA फिंगरप्रिंट तंत्रज्ञान विकसित केले होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात BHU चे कुलगुरू पद तसेच हैदराबादच्या सेंटर फॉर सेलुलर मॉलिक्यूलर बायोलॉजी संस्थेचे संचालक पद सुद्धा भूषविलेले होते. 

त्यांनी माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या हत्येनंतर त्यांच्या शरीराची DNA तपासणी देखील केली होती. त्यांना पद्मश्रीने सन्मानित केले गेले होते.



सध्याचे कर्णधार रोहित शर्माचे विक्रमी व्दिशतक
दुसऱ्या भारत-श्रीलंका एकदिवसीय सामन्यात भारताने तब्बल ३९२ धावांचा डोंगर उभा केला. 

पहिल्या सामन्यात भेदक कामगिरी केलेल्या श्रीलंकेच्या गोलंदाजांनाप्रत्युत्तर देत कर्णधार रोहित शर्माने कारकिर्दीतील तिसरे व्दिशतक झळकाविण्याचा पराक्रम केला. रोहितने सलामीला येत नाबाद २०८ धावा केल्या. 

या आव्हानासमोर श्रीलंकेला ५० षटकांत २५१ धावांपर्यंतच मजल मारता आली. १४१ धावांनी मिळविलेल्या या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-१ अशी बरोबरी साधली.



नॉर्वेमध्ये इंटरनेटचा स्पीड सर्वाधिक
भारतामध्ये सध्या 2G, 3G आणि 4G सारखा इंटरनेट स्पीड दिला जात आहे. मात्र, भारत जगाच्या इंटरनेट स्पीडच्या तुलनेत ‘स्लो’ असल्याची माहिती समोर आली आहे. जगातील पहिल्या १०० देशांच्या यादीतही भारताला स्थान मिळालेले नाही.

‘ओक्ला’ या संस्थेने मोबाईल इंटरनेट स्पीडबाबत सर्वेक्षण केले होते. यामध्ये ही बाब पुढे आली आहे. इंटरनेटच्या स्पीडमध्ये सध्या भारत जगात १०९ व्या स्थानावर आहे. तर ब्राँडबँड स्पीडमध्ये ७६ व्या स्थानी आहे. 

नॉर्वेमध्ये मोबाईल इंटरनेटचा स्पीड सर्वाधिक म्हणजे ६२.६६ एमबीपीएस आणि नेदरलँडमध्ये ५३.०१ एमबीपीएस आहे. तर आईसलँडमध्ये ५२.७८ एमबीपीएस इतका आहे.


नेपाळमध्ये विरोधी पक्षाने संसदीय निवडणुकीत दोन तृतीयांश जागा जिंकल्या
नेपाळमध्ये संसदेच्या खालच्या सभागृहातील सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीत १६५ मतदारसंघापैकी डाव्या आघाडीने ११३ जागा जिंकल्या आहेत. 

तसेच सभागृहात सत्ताधारी नेपाळी कॉंग्रेस पक्षाला फक्त २१ जागा मिळाल्या. तर राष्ट्रीय जनता पक्ष (नेपाळ) ने ११ आणि संघिया समाजवादी फोरम (नेपाळ) ने १० जागा मिळवल्या. 

याशिवाय आतापर्यंत ३३० जागांपैकी ३२३ जागा सात प्रांतीय विधानसभा निर्वाचित झाल्या आहेत. CPN (UML) आणि CPN (माईस्ट सेंटर) च्या डाव्या आघाडीने २३५ जागा मिळवल्या आहेत. तर नेपाळी कॉंग्रेस पक्षाने ४० आणि इतरांनी ४८ जागांवर विजय मिळविला आहे.

नेपाळ हा दक्षिण आशियातील सर्वबाजुने भूमिने वेढलेला मध्यवर्ती हिमालयी देश आणि भारताचा शेजारी आहे. या देशाची काठमांडू ही राजधानी असून देशाचे चलन नेपाळी रुपया हे आहे. देशाचे वर्तमान राष्ट्राध्यक्ष बिध्या देवी भंडारी या आहेत.



ओमानमध्ये दुसरी UNWTO/UNESCO जागतिक पर्यटन व संस्कृती परिषद संपन्न
ओमानची राजधानी मस्कट येथे ११ व १२ डिसेंबर २०१७ रोजी संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक पर्यटन संघटना (UNWTO)/ संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) द्वारा आयोजित दुसरी ‘जागतिक पर्यटन व संस्कृती परिषद’ संपन्न झाली. ‘फोस्टरिंग सस्टेनेबल डेवलपमेंट’ या विषयाखाली ही परिषद भरवली गेली होती. 

केंद्रीय संस्कृती राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री डॉ. महेश शर्मा यांनी परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले.

संयुक्त राष्ट्रसंघाने २०१७ हे विकासासाठी शाश्वत पर्यटनाचे जागतिक वर्ष म्हणून घोषित केले. 
फेब्रुवारी २०१५ मध्ये कंबोडियामध्ये पहिली जागतिक परिषद भरविण्यात आली होती.

संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESC) ही फ्रान्सची राजधानी पॅरिस शहरात स्थित संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक/मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार/माहिती या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे.

 या संघटनेची स्थापना १६ नोव्हेंबर १९४५ रोजी लंडन, ब्रिटन येथे करण्यात आली. UNESCO मध्ये १९५ सदस्य राज्ये/राष्ट्रे आहेत आणि १० सहकारी सदस्य आहेत.

वर्ष १९७५ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक पर्यटन संघटना (UNWTO) याची स्थापना केली गेली. जागतिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या या संघटनेचे मुख्यालय मॅड्रिड (स्पेन) येथे आहे. संघटनेत १५६ सदस्य देश, ६ सदस्य प्रदेश आणि ५०० संलग्न सदस्य संस्था आहेत. 



संयुक्त राष्ट्रसंघाकडून दिवाली ‘पॉवर ऑफ वन’ पुरस्कारांनी ६ राजनैतिकांचा सत्कार
संयुक्त राष्ट्रसंघाच्या न्यूयॉर्कमधल्या मुख्यालयात शांतीपूर्ण आणि सुरक्षित जग उभारण्यामध्ये योगदान देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघामधील ६ राजनैतिकांना प्रथम दिवाली ‘पॉवर ऑफ वन’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

पुरस्काराचे विजेते – 
मॅथ्यू रिक्रॉफ्ट (ब्रिटिश राजदूत), 
नवाफ सलाम (लेबेनॉनचे राजदूत) 
लक्ष्मी पुरी (भारतीय महिला प्रमुख), 
मगेद अब्देलअजीज (इजिप्तचे माजी स्थायी प्रतिनिधी), 
इयॉन बोत्नारू (मोल्दोवाचे माजी स्थायी प्रतिनिधी) 
यूरी सर्गेयेव (युक्रेनचे माजी स्थायी प्रतिनिधी).

अमेरिकेच्या डाक सेवाद्वारा मागील वर्षी दिवाली स्टॅम्प प्रसिद्ध करण्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने दिवाली ‘पॉवर ऑफ वन’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.