अभिजीत कटके यंदाचा महाराष्ट्र केसरी
पुण्याच्या भूगाव येथे खेळवण्यात आलेल्या मानाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याचा पैलवान अभिजीत कटके ने बाजी मारली आहे. अंतिम फेरीत अभिजीतने साताऱ्याच्या किरण भगतवर १०-७ अशी मात केली. 


सामना जिंकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याहस्ते मानाची चांदीची गदा देऊन अभिजीतचा सत्कार करण्यात आला.

सामना सुरु झाल्यानंतर, सुरुवातीच्या काही क्षणांमध्ये अभिजीतकडे चांगली आघाडी होती. मात्र किरण भगतने जोरदार पुनरागमन करत सामन्यात ३-३ अशी बरोबरी साधली. यानंतर किरण भगतने काही खास डावपेच आखत अभिजीतला चांगलीच टक्कर दिली. 

किरण भगतच्या तुलनेत अभिजीत हा उंची आणि वजनाने उजवा खेळाडू आहे. याचा फायदा घेत अभिजीतने किरणला चितपट देत अखेर महाराष्ट्र केसरी किताब आपल्या नावावर केला.



मुंबईमध्ये भारतातली पहिली वातानुकूलित लोकल ट्रेन धावणार
देशात वातानुकूलित लोकल ट्रेन सुरू करण्याच्या उद्देशाने, भारतीय रेल्वे भारतातली पहिली वातानुकूलित लोकल ट्रेन मुंबईमध्ये सुरू करण्याची योजना करीत आहे.

मुंबई उपनगराच्या पश्चिम रेलमार्गावर पश्चिम रेल्वे चर्चगेट आणि बोरीवली आणि विरार स्थानक यादरम्यान १२ डब्ब्यांची ही ट्रेन धावणार आहे. पुढे टप्प्याटप्प्याने देशाच्या अन्य प्रमुख शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात येईल. वातानुकूलित लोकल ट्रेनमध्ये वातानुकूलित डब्बे आणि स्वयंचलीत दरवाजे असणार आहेत.



सुशासन दिवस २५ डिसेंबर
भारत सरकारच्या नेतृत्वात देशात २५ डिसेंबरला ‘सुशासन दिवस’ साजरा करण्यात येत आहे. 

यानिमित्त उत्तरप्रदेश राज्य शासनाने शिक्षा भोगलेल्या मात्र दंड भरू न शकणार्‍या ९३ कैदींना सोडण्याचा निर्णय घेतला.

२५ डिसेंबर हा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस आहे. त्यांच्या नेतृत्वाचा सन्मान करण्यासाठी भारतात हा दिवस ‘सुशासन दिवस’ म्हणून साजरा करण्याचे ठरविण्यात आले.

२५ डिसेंबर १९२४ रोजी जन्मलेले मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील अटल बिहारी वाजपेयी यांचा सुमारे चार दशकांहून अधिक काळचा संसदीय अनुभव आहे. १९५७ साली ते प्रथम लोकसभेवर निवडून आले आणि २००४ सालापर्यंत ते संसदेचे सक्रिय सदस्य होते. 

या काळात ते चार वेगवेगळ्या राज्यांतून (उत्तरप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश आणि दिल्ली) वेगवेगळ्या वेळी निवडून आलेले एकमेव संसदीय सदस्य आहेत. ते वर्ष १९९६ आणि वर्ष १९९८-२००४ अश्या दोन काळात देशाचे पंतप्रधान होते. 

२७ मार्च २०१५ रोजी त्यांना भारताचा सर्वोच्च सन्मान ‘भारत रत्न’ ने सन्मानित करण्यात आले.



फोर्ब्स इंडियाच्या ‘सेलिब्रिटी १००’ यादीत सलमान खान प्रथम स्थानी कायम
फोर्ब्स इंडियाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या १०० भारतीय ख्यातनाम व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत अभिनेता सलमान खान याने आपले पहिले स्थान कायम राखले आहे.

५१ वर्षीय सलमान खान वार्षिक २३२.८३ कोटी रुपयांसह ख्यातनाम श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी आहे. यादीतील शीर्ष तीन स्थानी यावेळीही सलमान खान, शाहरुख खान (दुसरा) आणि विराट कोहली (तिसरा) यांनी आपले स्थान कायम राखले आहे.


विजेंदर सिंहने ‘WBO ओरिएंटल अँड एशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट’ चे विजेतेपद जिंकले 
भारतीय मुष्टियोद्धा विजेंदर सिंहने ‘WBO ओरिएंटल अँड एशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट’ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. 

जयपुरमध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धेत विजेंदरने आफ्रिकेमधील घानाच्या अर्नेस्ट एमुजु याचा पराभव केला. या सोबतच विजेंदरने प्रो-बॉक्सिंगमध्ये सलग दहाव्यांदा आपला विजय नोंदवला.

जागतिक मुष्टियुद्ध संघटना (WBO) ही १९८८ साली स्थापना करण्यात आलेली एक मान्यता देणारी संघटना आहे, जी व्यावसायिक मुष्टियुद्ध (boxing) जगजेत्यांना मान्यता देते. याचे मुख्यालय सॅन जुआन (पोर्तो रिको) येथे आहे



सबा करीम BCCI चे नवे महाव्यवस्थापक (GM)
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (BCCI) च्या महाव्यवस्थापकपदी साबा करीम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

करीम १ जानेवारी २०१८ रोजी पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. ते एम. व्ही. श्रीधर (ऑक्टोबरमध्ये निधन) यांच्या राजीनाम्यानंतर या पदाचा स्वीकार करणार. ते CEO राहुल जोहरी यांना आपला अहवाल देतील.

करीम यांनी एक कसोटी आणि ३४ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. १८ वर्षांच्या त्यांच्या खेळाडूच्या कारकि‍र्दीत यष्टिरक्षक-फलंदाज रूपात १२० प्रथमश्रेणी, १२४ लिस्ट-ए सामने खेळलेले आहेत.

भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (BCCI) ची तामिळनाडू सोसायटी नोंदणी कायद्याच्या अंतर्गत डिसेंबर १९२८ मध्ये स्थापना करण्यात आली. याचे मुख्यालय महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये आहे.



SAFF अंडर-१५ महिला स्पर्धेत भारत उपविजेता ठरला
ढाकामध्ये खेळल्या गेलेल्या ‘दक्षिण आशियाई फूटबॉल महासंघ (SAFF) अंडर-15 महिला अजिंक्यपद’ स्पर्धेच्या अंतिममध्ये बांग्लादेशने भारताचा पराभव केला आहे.

दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ (SAFF) तर्फे या स्पर्धेचे आयोजन केले जाते. स्पर्धेची स्थापना ‘गोल्ड चषक’ या नावाने प्रादेशिक स्पर्धा म्हणून १९९३ साली केली गेली. 

पुढे १९९७ साली रूपांतरित SAFF चे बांग्लादेश, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका हे संस्थापक सदस्य देश आहेत. पुढे भूटान (२०००) आणि अफगाणिस्तान (२००५) SAFF मध्ये सामील झालेत.



‘टेम्पब्लिन’ उष्णकटिबंधीय वादळाची फिलिपीन्सला धडक
दक्षिण फिलिपीन्समध्ये ताशी १२५ किलोमीटरच्या वेगाने ‘टेम्पब्लिन’ या उष्णकटिबंधीय वादळाची धडक बसलेली आहे.

वादळामुळे प्रचंड पावसाचे थैमान सोबतच भूस्खलनामुळे जवळपास १८२ जन मृत्यूमुखी पडलेले आहेत आणि ५०००० हून अधिक लोकांना दुसर्‍या ठिकाणी हटविण्यात आले आहे.

फिलिपीन्स हा दक्षिण-पूर्व आशियातला एक देश आहे. पश्चिम प्रशांत महासागरात स्थित ७१०७ बेटांच्या समूहाने बनलेला हा देश आहे. मनीला शहर ही या देशाची राजधानी आहे. फिलीपाइन पेसो हे देशाचे चलन आहे.