नदाफ एजाझला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर 
नांदेड जिल्हय़ाच्या अर्धापूर तालुक्यातील पार्डी (मक्ता) येथील नदाफ एजाझ अब्दुल रौफ याला यंदाचा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला.


यंदा देशातील १८ बालकांना राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नदाफ एजाझ अब्दुल रौफचा समावेश आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २४ जानेवारी २०१८ रोजी या शूरवीर बालकांना गौरविले जाईल.

नांदेड जिल्हय़ातील पार्डी (मक्ता) येथील एजाझने धाडस दाखवून दोन मुलींना तलावात बुडण्यापासून वाचविले होते. त्याने दाखविलेल्या साहसाची नोंद घेत त्याला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 

तसेच प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीला राजपथावर होणाऱ्या पथसंचलनातही तो सहभागी होणार आहे.



आण्विक क्षमतेच्या अग्नि-५ ची यशस्वी चाचणी
अग्नि-५ या जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या, आण्विक क्षमतेच्या क्षेपणास्त्राची ओडिशा येथे १८ जानेवारी रोजी यशस्वी चाचणी घेण्यात आली.

पाच हजार किमी पल्ला असलेल्या या क्षेपणास्त्राची येथील अब्दुल कलाम बेटावरुन सकाळी ९:५३ वाजता चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्याची माहिती संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.

अग्नि हे भारताच्या महत्त्वाकांक्षी क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमामधील अत्यंत महत्त्वाचे क्षेपणास्त्र मानले जाते.



वर्ष २०१७ मध्ये भारताला १० दशलक्षांपेक्षा अधिक परदेशी पर्यटकांनी भेट दिली
पर्यटन मंत्रालयाकडून प्राप्त आकड्यांनुसार, वर्ष २०१७ मध्ये भारताला १० दशलक्षहून (म्हणजेच १ कोटीहून) अधिक परदेशी पर्यटकांनी भेट दिली. यामुळे $२७ अब्ज (१७२८ अब्ज रुपये) ची कमाई झाली.

भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात पर्यटन क्षेत्राचे ६.८८% योगदान आहे आणि वर्ष २०१७ मध्ये प्राप्त एकूण रोजगारांपैकी १२% या क्षेत्राशी निगडीत आहेत. त्यामुळे ‘पर्यटन प्रतिस्पर्धात्मकता निर्देशांक’ यामध्ये भारत ४० व्या क्रमांकावर आहे, जो की २०१३ साली ६५ होता.


भारत सरकारच्या ‘सर्वांसाठी पर्यटन’ तत्त्वाखाली ५ ते २५ ऑक्टोबर २०१७ या काळात पर्यटनाचा राष्ट्रव्यापी उत्सव ‘पर्यटन पर्व’ आयोजित करण्यात आला होता.


विराट कोहली ठरला क्रिकेटर ऑफ द इयर
अंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती म्हणजेच आयसीसीच्या वार्षिक पुरस्कार जाहीर झाले आहेत. 

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार जाहीर झाला असल्याने सलग दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार भारतीय खेळाडूला मिळणार आहे.

विराटला यंदाच्या वर्षीचे तीन महत्वाचे सन्मान मिळाले आहेत. यामध्ये ‘आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर’, ‘आयसीसी ओडीआय क्रिकेटर ऑफ द इयर’ या दोन पुरस्कारांबरोबरच आयसीसीच्या कसोटी तसेच एकदिवसीय संघाचे कर्णधारपदाचे स्थान मिळाले आहे



बर्लिनमध्ये १० व्या ‘वैश्विक अन्न व कृषी मंच’ च्या बैठकीचा शुभारंभ
१८-२० जानेवारी २०१८ दरम्यान जर्मनीच्या बर्लिनमध्ये १० व्या ‘वैश्विक अन्न व कृषी मंच (GFFA)’ ची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

‘शेपींग द फ्यूचर ऑफ लाइव्हस्टॉक – सस्टेनेबली, रिस्पोंसीबली, एफीशीयंटली’ या विषयाखाली हा तीन दिवसीय कार्यक्रम आयोजित आहे. 

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्‍यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या नेतृत्वात भारतीय प्रतिनिधिमंडळ तेथे उपस्थित आहे.

वैश्विक अन्न व कृषी मंच (GFFA) ही एक आंतरराष्‍ट्रीय परिषद आहे, जी वैश्विक कृषी–अन्न क्षेत्रातल्या उद्योगांच्या भवितव्यासंबंधी प्रश्नांवर विचार करते. 

१९२६ सालापासून बर्लिनमध्ये पाळल्या जाणार्‍या ‘आंतरराष्‍ट्रीय हरित सप्‍ताह’ दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. GFFA चे आयोजन जर्मनीच्या संघीय अन्न, कृषी व ग्राहक संरक्षण मंत्रालय (BMEL) द्वारा केले जाते.