मुख्य निवडणूक आयुक्तपदी ओम प्रकाश रावत 
मुख्य निवडणूक आयुक्तपदी ओम प्रकाश रावत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. केंद्र सरकारने या संदर्भातली घोषणा केली आहे. 


केंद्र सरकारने जारी केलेल्या एका पत्रकानुसार ही माहिती समोर आली आहे. अचल कुमार ज्योती यांच्या जागी आता ओम प्रकाश रावत आता काम पाहतील.

अचल कुमार ज्योती यांचा कार्यकाळ २३ जानेवारीला संपतो आहे. त्याचमुळे ओम प्रकाश रावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

ज्योती यांच्या आधी नसीम जैदी मुख्य निवडणूक आयुक्त होते त्यांचा कार्यकाळ जुलै २०१७ मध्ये संपला होता. त्यानंतर अचल कुमार ज्योती यांनी हे पद स्वीकारले. आता ज्योती यांचा कार्यकाळ संपल्याने ओम प्रकाश रावत हे मुख्य निवडणूक आयुक्त असतील.



आप सरकारच्या २० आमदारांचे सदस्यत्त्व रद्द 
लाभाचे पद स्वीकारणाऱ्या आपच्या वीस आमदारांचे सदस्यत्त्व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रद्द केले आहे. अर्थातच त्यांना अपात्र ठरवले आहे. त्यामुळे दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारसाठी हा सर्वात मोठा झटका मानला जातो आहे. 

निवडणूक आयोगाने कारवाई करत लाभाचे पद स्वीकारणाऱ्या आपच्या २० आमदारांना राष्ट्रपतींनी अपात्र ठरवावे अशी शिफारस केली होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही शिफारस मान्य करत २० आमदारांना अपात्र ठरवले आहे.

१९ जानेवारी रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने या संदर्भातली शिफारस राष्ट्रपतींकडे केली होती. त्यानंतर दोन दिवसांनी ही शिफारस मान्य करण्यात आली आहे.



लखनऊमध्ये चौथ्या ‘भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव’ आयोजित
लखनऊमध्ये चौथ्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे (IISF) आयोजित करण्याचे सुनिश्चित केले गेले आहे.

२०१५ साली IIT दिल्ली येथे प्रथम भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारा आयोजित केला जातो. IISF ही देशातील सगळ्यात मोठी तंत्रज्ञान आणि औद्योगिक प्रदर्शनी ठरलेली आहे. 

हा महोत्सव जनसामान्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार करण्यासाठी तसेच युवा वैज्ञानिकांना आपले अनुभव आणि ज्ञान वाटण्यासाठी आणि महत्त्वाच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरते. 


राष्ट्रीय शालेय ऍथलेटिक स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद
एस.व्ही.जे.सी.टी क्रीडा संकुल डेरवण येथे सुरु असलेल्या ६३ व्या राष्ट्रीय शालेय ऍथलेटिक स्पर्धेत महाराष्ट्राने ५० गुणांची कामे करीत सर्व साधारण विजेतेपद पटकावले. 

महाराष्ट्राच्या मुलींनी तब्बल ४३ गुण मिळवत तर मुलांच्या गटात दिल्लीने ३१ 
गुणांची कमाई करत प्रथम क्रमांक संपादन केला.

या स्पर्धेत मुली गटात सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान केंद्रीय विद्यालयाच्या गौतमी शेट्टीने तर मुलांच्या गटात विभागून दिल्लीच्या मनीष कुमार आणि शौर्य राजपूत यांनी संपादन केला. 

गेले तीन दिवस डेरवण येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय शालेय ऍथलेटिक्स स्पर्धेचा शेवटच्या दिवशी महाराष्ट्राने १ सुवर्ण, ३ रौप्य आणि २ कांस्य पदकाची कमाई करीत सर्वसाधारण विजेतेपदाचा मान मिळवला.



भारताने अंधांचा क्रिकेट विश्वचषक जिंकला
अंधांच्या विश्वचषक २०१८ यास्पर्धेत भारताने २० जानेवारी रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करत विश्वषचकावर आपले नाव कोरले. 

शारजा येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा दोन गडी राखून पराभव केला. 

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी ३०८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने हे आव्हान दोन गडी राखून पार केले.