मुंबईत उभारला जाणार बॉलिवूड संग्रहालय 
मुंबईतील बॉलिवूड हे देशासह जगभरातील चित्रपटप्रेमी आणि पर्यटकांसाठी मोठे आकर्षणकेंद्र आहे. हे लक्षात घेऊन याला पर्यटनाचे आकर्षण केंद्र बनविण्याच्या दृष्टीने भव्य बॉलिवूड संग्रहालय उभे केले जाईल. 


पर्यटन विषयाच्या अनुषंगाने नियम २९३ अन्वये विधानसभेत चर्चा झाली. या चर्चेला काल रात्री उशिरा उत्तर देताना रावल बोलत होते. 
या वेळी रावल म्हणाले, मंबईत असलेल्या बॉलिवूडला मोठा इतिहास आहे. हा इतिहास उजागर हेण्याच्या दृष्टीने तसेच देश विदेशातील पर्यटकांना मुंबईत आणखी एक टुरिस्ट ऍट्रॅक्‍शन निर्माण करण्याच्या दृष्टीने पर्यटन विभागामार्फत हे संग्रहालय उभारण्यात येईल.



उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरींचे नाव 
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरींचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. 

जळगाव येथे १५ ऑगस्ट १९९० रोजी उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती. यात जळगावसह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचा समावेश करण्यात आला होता.



‘आयुष्मान भारत’ योजनेला केंद्राची मंजुरी 
देशातील प्रत्येक गरीब कुटुंबाला प्रतिवर्षी पाच लाख रुपयांचे आरोग्यविमा कवच देणाऱ्या ‘आयुष्मान भारत’योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने २१ मार्च रोजी मंजुरी दिली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती.

या योजनेचा लाभ दारिद्रय़ रेषेखालील दहा कोटी कुटुंबांना होणार आहे. आता राष्ट्रीय स्वास्थ्य विमायोजना आणि ज्येष्ठ नागरिक आरोग्य विमा योजना या योजना आता ‘आयुष्मान भारत’ मध्येच समाविष्ट होणार आहेत. 

या योजनेनुसार रुग्णालयात दाखल करण्याआधीचा आणि नंतरचा खर्च दिला जाणार आहे.

ग्रामीण भागांत जे कुटुंब एकाच खोलीत राहाते आणि त्या खोलीच्या भिंती आणि छप्पर कच्चे आहे, ज्या कुटुंबात १६ ते ५९ या वयोगटातील कुणीही नाही, ज्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून अपंगावरच जबाबदारी आहे असे कुटुंब, कुटुंब प्रमुखाची जबाबदारी स्त्री पार पाडत असेल असे कुटुंब, अनुसूचित जाती व जमातीचे कुटुंब आणि मजुरीवर पोट भरणारे कुटुंब, यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे



‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्राकरून लक्ष्याचा अचूक वेध 
भारताने २२ मार्च रोजी ब्राह्मोस या स्वनातीत क्रूझ क्षेपणास्त्राची राजस्थानमधील पोखरण येथे यशस्वी चाचणी घेतली. या क्षेपणास्त्राने लक्ष्याचा अचूक वेध घेतला, अशी माहिती संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.

तीन महिन्यांपूर्वी सुखोई एमकेआय या लढाऊ विमानातून ब्राह्मोस क्षेपणास्त्राची पहिली चाचणी घेण्यात आली होती. भारत आणि रशियाचा संयुक्त प्रकल्प असलेल्या ‘ब्राह्मोस’चा पल्ला चारशे किलोमीटर आहे.

तसेच या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाल्याबद्दल संरक्षण मंत्रालयाने ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’चे अभिनंदन केले आहे.


राजा रविवर्मांच्या ‘तिलोत्तमे’चा लिलाव 
प्रख्यात चित्रकार राजा रविवर्मा यांनी काढलेले तिलोत्तमा या पौराणिक कथेतील अप्सरेचे चित्र येथील लिलावात ५.१७ कोटी रुपयांना विकले गेले आहे.

येथे मॉडर्न अँड कॉंटेम्पररी साउथ एशियन आर्ट या प्रदर्शनात हा लिलाव करण्यात आला. या चित्राला ३.९० कोटी रुपये अपेक्षित असताना त्याहून अधिक किंमत मिळाली. राजा रविवर्मा यांची फार निवडक चित्रे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध झाली असून, त्यातील तिलोत्तमेचे हे चित्र आहे.

पौराणिक कथेनुसार, सुंद आणि उपसुंद या दोन दैत्यबंधूंना मारण्यासाठी ब्रह्मदेवाच्या विनंतीनुसार तिलोत्तमा ही अप्सरा स्वर्गातून पृथ्वीवर आली होती. तिला मिळविण्याच्या इर्ष्येने दोन्ही भावांनी एकमेकांशी लढाई केली आणि त्यात त्यांचा अंत झाला.



कर्नाटकातील ST यादीत ‘नायका’ ला ‘परिवारा’ आणि ‘तलवारा’ हे समानार्थी शब्द समाविष्ट करण्यास मंजूरी 
केंद्रीय मंत्रिमंडळाने कर्नाटकातील अनुसूचित जमातींच्या (ST) यादीत क्र.३८ वर असलेल्या ‘नायका’ या शब्दाला समानार्थी शब्द म्हणून ‘परिवारा’ आणि ‘तलवारा’ या समुदायाला समाविष्ट करण्यास मंजुरी दिली आहे.

या निर्णयामुळे ‘परिवारा’ आणि ‘तलवारा’ समुदायातील व्यक्ती कर्नाटक राज्यातील अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळण्यास पात्र असेल आणि राज्यातील अनुसूचित जमातींसाठी असलेले सर्व लाभ मिळण्यासही पात्र असतील.



मालदीवमधील आणीबाणी अखेर उठवली 
मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी देशात ४५ दिवसांपासून लागू असलेली आणीबाणी २२ मार्च रोजी उठवली. देशातील स्थिती आता पूर्वपदावर आल्याने आणीबाणी उठवत असल्याचे यामीन यांच्या कार्यालयाने दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

सुरक्षा दलाचा सल्ला आणि देशातील स्थिती सामान्य करण्याच्या प्रयत्नाचाच भाग म्हणून अध्यक्षांनी आणीबाणी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या राजकीय कैद्यांची सुटका करण्याचा निकाल दिल्यानंतर मालदीवमध्ये राजकीय संकट निर्माण झाले. 

मात्र, आदेश पाळण्यास नकार देत अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी सुरवातीला ५ ते १५ फेब्रुवारीदरम्यान पंधरा दिवसांची आणीबाणी लागू केली होती.



IAFS-III च्या वचनाखातर आफ्रिकेत मोहीमा सुरू करण्यास मंजूरी 
केंद्रीय मंत्रिमंडळाने २०१८ ते २०२१ या चार वर्षांच्या कालावधीत आफ्रिकेत 18 नव्या भारतीय मोहिमांची स्थापना करण्यास मंजूरी दिली आहे.

तिसर्‍या भारत-आफ्रिका मंच शिखर परिषदेत भारताने दिलेल्या वचनाखातर, आफ्रिकेत बुरकीना फासो, कॅमेरून, केप वर्डे, चाड, कांगो प्रजासत्ताक, जिबूती, विषुववृत्ती गिनी, एरीट्रीया, गिनी, गिनी बिसाऊ, लायबेरिया, मॉरीटानिया, रवांडा, साओ तोमे व प्रिंसिपे, सिएरा लियोन, सोमालिया, स्वाझीलँड आणि टोगो या ठिकाणी १८ नव्या भारतीय मोहिमा निश्चित कालावधीत उघडले जाणार आहेत. याप्रकारे आफ्रिकेत भारतीय मोहिमांची संख्या २९ वरुन ४७ होणार.