जयंत सिन्हा: मानवरहित हवाई वाहन तंत्रज्ञानासंदर्भात कृती दलाचे प्रमुख 

भारत सरकारने देशात मानवरहित हवाई वाहन तंत्रज्ञानासंदर्भात नागरी उड्डयन राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली 15 सदस्यांचे एक कृती दल (टास्क फोर्स) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. 

हे कृती दल मानवरहित हवाई वाहन (UAV) तंत्रज्ञानाला देशात जलद गतीने अंमलात आणण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकार, उद्योग आणि संशोधन संस्थांसाठी अंमलबजावणी करण्यायोग्य शिफारशींसह एक आराखडा तयार करणार. त्यासाठी दलाला सहा महिन्यांचा कालावधी दिला जाईल. 



नवी दिल्लीत दुसरी भारत मोबाईल काँग्रेस भरणार 
25-27 ऑक्टोबर 2018 या काळात नवी दिल्लीत ‘भारत मोबाईल काँग्रेस 2018’ (India Mobile Congress) या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.

यावर्षी परिषदेत ASEAN आणि BIMSTEC सदस्य देश सहभाग घेणार आहेत. परिषदेत 5G, स्टार्टअप वातावरण, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), बिग डेटा, कृत्रिम डेटा (AI), स्मार्ट शहरे आणि संबंधित उद्योग अश्या विविध क्षेत्रांमधील दूरसंचार उद्योगातील 2,000,000 पेक्षा अधिक व्यावसायिक उपस्थित राहतील.

भारत सरकारच्या दूरसंचार विभागातर्फे दरवर्षी भारत मोबाईल काँग्रेस (India Mobile Congress) आयोजित करण्यात येते. 27 सप्टेंबर 2017 रोजी नवी दिल्लीत प्रथम भारत मोबाईल काँग्रेस (IMC) भरविण्यात आली होती. 

भारतीय सेल्युलर संघ (ICA) आणि राष्ट्रीय सॉफ्टवेअर व सेवा कंपनी संघ (NASSCOM) यांचा हा एक संयुक्त उपक्रम आहे. ही परिषद मोबाइल, इंटरनेट आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांसाठी एक व्यासपीठ म्हणून काम करीत आहे.



तिसरी ‘भारत-रशिया लष्करी-औद्योगिक परिषद’ संपन्न 

चेन्‍नईच्या जवळ तिरुविदं‍ताई (कांचीपुरम जिल्हा) येथे आयोजित ‘डिफएक्सपो 2018’ च्या पार्श्वभूमीवर 13 एप्रिल 2018 रोजी तिसरी ‘भारत-रशिया लष्करी-औद्योगिक परिषद’ संपन्न झाली आहे. 

‘डिफएक्सपो 2018’ (संरक्षण प्रदर्शनी 2018) दरम्यान भारत आणि रशिया यांच्यात 7 करार झालेत. हे करार लष्करी उपयोगातील प्रणाली, उपकरणे आणि त्यांचे सुटे भाग आदींच्या निर्मितीशी संबंधित आहेत.

यापूर्वी भारत-रशिया लष्करी-औद्योगिक परिषद पहिल्यांदा मार्च 2017 मध्ये नवी दिल्लीत आणि दुसर्‍यांदा ऑगस्ट 2017 मध्ये मॉस्कोमध्ये आयोजित केली गेली होती.



न्यूझीलंड सरकारने नवीन सागरी तेल शोधकार्यांवर बंदी घातली 

हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा निर्णय घेत न्यूझीलंड सरकारने राष्ट्राच्या हद्दीत सागरी क्षेत्रात तेलाच्या नवीन शोधकार्यांवर संपूर्णता बंदी घातली आहे.

मात्र हा निर्णय जुन्या परावानगींना प्रभावित करणार नाही. पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांनी सरकारची योजना शून्य कार्बन-तटस्थता दर्शवित असल्याची स्पष्टता दिली.


दोन भारतीय खेळाडूंना नियमांच्या उल्लंघनामुळे राष्ट्रकुल खेळांमधून बाद केले 
भारतीय पैदल शर्यत खेळाडू के. टी. इरफान आणि ट्रिपल जंप खेळाडू व्ही. राकेश बाबू यांना राष्ट्रकुल खेळांच्या ‘नो नीडल’ धोरणाच्या उल्लंघनाच्या आरोपाखाली स्पर्धेमधून बाद केले आहे. 

राष्ट्रकुल क्रिडाग्राममध्ये त्यांच्या खोलीत आढळून आलेल्या सुयांबाबत स्पष्टता देण्यामध्ये ते अयशस्वी ठरल्याकारणाने हा निर्णय घेण्यात आला आहे. 

इरफानची 20 किलोमीटरची पैदल शर्यत स्पर्धा झालेली आहे, ज्यामध्ये तो 13 व्या स्थानी होता. तर बाबूला ट्रिपल जंपच्या अंतिममध्ये प्रवेश मिळाला होता. 



राष्ट्रकुल खेळ 2018 मुष्टियुद्धपटू मेरी कोम हिला सुवर्णपदक 

राष्ट्रकुल खेळ 2018 मध्ये भारताची मुष्टियुद्धपटू एम.सी. मेरी कोम आणि गौरव सोळंकी यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले.

मेरी कोम हिने महिलांच्या 48 किलो वजनी गटात अंतिम फेरीत उत्तर आयर्लंडच्या क्रिस्टिना ओहारा हिचा पराभव केला. तर मुष्टियुद्ध खेळाडू गौरव सोळंकी ह्याने पुरुषांच्या 52 किलो वजनी गटात अंतिम फेरीत उत्तर आयर्लंडच्या ब्रेंडन इर्विन ह्याचा पराभव केला. 

भालाफेकमध्ये नीरज चोपडा ह्याने अंतिम फेरीत 86.47 मीटर इतका दूर भाला फेकत सुवर्णपदक पटकावले आणि भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. शिवाय, नेमबाज संजीव राजपूत ह्याने 50 मीटर रायफल थ्री पोजिशन्समध्ये सुवर्णपदक जिंकले.

राष्ट्रकुल खेळ ही राष्ट्रकुल परिषदेमधील सभासद राष्ट्रांची एक क्रीडा स्पर्धा आहे. 1930 सालापासून राष्ट्रकुल खेळ स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजित केली जाते. स्पर्धेला 1954 साली ब्रिटिश एम्पायर खेळ, त्यानंतर ब्रिटिश एम्पायर व राष्ट्रकुल खेळ आणि 1970 सालापासून ब्रिटिश राष्ट्रकुल खेळ आणि 1978 साली राष्ट्रकुल खेळ हे नाव दिले गेले. राष्ट्रकुल खेळ महासंघ (CGF) याचे लंडनमध्ये मुख्यालय आहे.



इंदौरमध्ये ‘रिजनल 3-R फोरम’ची 8 वी बैठक संपन्न  

9-12 एप्रिल 2018 या काळात भारतात इंदौर (मध्यप्रदेश) मध्ये आशिया आणि प्रशांत क्षेत्रातल्या ‘रिजनल 3-R फोरम’ ची आठवी बैठक पार पडली. बैठकीच्या शेवटी ‘मिशन झीरो वेस्ट’ (शून्य कचरा मोहीम) चे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी इंदौर 3R जाहीरनामा स्वीकारला गेला. 

भारत सरकारच्या गृहनिर्माण व नागरी कल्याण मंत्रालय आणि जपान सरकारचे पर्यावरण मंत्रालय यांच्या सहकार्याने संयुक्त राष्ट्रसंघाचे क्षेत्रीय विकास केंद्र (UNCRD) तर्फे ही परिषद “अचिव्हिंग क्लीन वॉटर, क्लीन लँड अँड क्लीन एयर थ्रू 3R अँड रिसोर्स एफीश्यंसी – ए 21स्ट सेंचुरी व्हिजन फॉर एशिया – पॅसिफिक कम्यूनिटीज” या विषयाखाली आयोजित करण्यात आली होती. 

3-R – रिड्यूस (कमी करणे), रीयूज (पुनर्वापर) आणि रीसायकल (पुनर्नवीनीकरण) – या सिद्धांतावर आधारित या परिषदेचे उद्घाटन लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते करण्यात आले होते. 3-R फोरमची पुढील बैठक थायलंड सरकार बँकॉकमध्ये आयोजित करणार आहे. 

संयुक्त राष्ट्रसंघाचे क्षेत्रीय विकास केंद्र (United Nations Centre for Regional Development -UNCRD) क्षेत्रीय विकासासाठी 18 जून 1971 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) आणि जपान सरकार यांच्यात झालेल्या करारानुसार 1971 साली स्थापित करण्यात आले.