उत्तरप्रदेशात सामान्य प्रवर्गाच्या आर्थिकदृष्टया मागासांसाठी 10% आरक्षण लागू
18 जानेवारी 2019 रोजी उत्तरप्रदेश राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने राज्यातल्या सामान्य प्रवर्गाच्या आर्थिकदृष्टया मागास असलेल्या पात्र लोकांसाठी सरकारी नोकर्‍या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षणासाठी 10% आरक्षणाची अट लागू करण्यास मान्यता दिली.


राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतल्या गेलेल्या या निर्णयामुळे उत्तरप्रदेश हे गुजरात आणि झारखंडनंतर असे आरक्षण देणारे देशातले तिसरे राज्य ठरले आहे.



भारताने ऑस्ट्रेलियात प्रथमच एकदिवसीय क्रिकेट मालिका जिंकली
18 जानेवारी 2019 रोजी मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या एकदिवसीय (ODI) मालिकेच्या अंतिम सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आणि या विजयासह भारताने ऑस्ट्रेलियात प्रथमच द्वैपक्षीय एकदिवसीय मालिका जिंकण्याचा इतिहास रचला आहे.

हा पहिला संघ आहे ज्यांनी या दौऱ्यात टी-20, कसोटी आणि एकदिवसीय मालिका गमावली नाही. या सामन्यात 6 बळी घेणारा यजुवेंद्र चहल हा सामनावीराचा तर या मालिकेत तीन अर्धशतके झळकावणारा महेंद्रसिंग धोनी मालिकावीराचा मानकरी ठरला.

भारताचा फिरकीपटू यजुवेंद चहलने अंतिम सामन्यात 42 धावा देऊन सहा बळी घेत अनेक विक्रम केले आहेत. ऑस्ट्रेलियात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत त्याने भारताचा माजी गोलंदाज अजित आगरकरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. 

ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर एका ODI सामन्यात सर्वाधिक सहा बळी घेण्याचा विक्रम अजित आगरकरने 2004 साली केली होता. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क (6/43, 2015) आहे.



युरेनियमचा पुरवठा करण्याबाबत भारताचा उझबेकिस्तानाशी करार 
18 जानेवारी 2019 रोजी अहमदाबाद शहरात झालेल्या ‘व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषद 2019’ या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानाचे राष्ट्रपती शौकत मिर्झीयोयेव यांच्यात द्वैपक्षीय बैठक पार पडली.

बैठकीनंतर भारताच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी युरेनियम या किरणोत्सर्गी पदार्थाचा दीर्घकालीन पुरवठा करण्याबाबत भारतीय अणुऊर्जा विभाग आणि उझबेकिस्तानाच्या नोवोई मिनरल्स अँड मेटलर्जिकल कंपनी यांच्या दरम्यान करार करण्यात आला.

शिवाय, उझबेकिस्तानमधील गृहनिर्माण आणि सामाजिक पायाभूत प्रकल्पांना अर्थसहाय्य करण्यासाठी भारत सरकारकडून दिल्या जाणाऱ्या USD 200 दशलक्ष एवढ्याच्या कर्जासंदर्भात भारताची एक्झिम बँक आणि उझबेकिस्तान सरकार यांच्यात करण्यात आलेल्या कराराचे दोन्ही देशांनी स्वागत केले.

व्हिएतनाममध्ये ‘ASEAN-भारत पर्यटन मंत्र्यांची बैठक’ पार पडली
व्हिएतनाम देशाच्या हा लाँग सिटी या शहरात ‘ASEAN-भारत पर्यटन मंत्र्यांची बैठक’ या मालिकेची सातवी बैठक पार पडली. भारताचे केंद्रीय पर्यटन मंत्री के. जे. अल्फॉन्स यांनी या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व केले.

सिंगापूरमध्ये दि. 15 नोव्हेंबर 2018 रोजी झालेल्या ‘ASEAN-भारत इन्फॉर्मल ब्रेकफास्‍ट’ शिखर परिषदेत घेतलेल्या एका निर्णयानुसार, पर्यटन मंत्र्यांनी ‘ASEAN-भारत पर्यटन सहकार्य वर्ष 2019’ हा पर्यटनाला चालना देणारा नवा कार्यक्रम अनावरीत केला आहे. 

या कार्यक्रमामुळे आग्नेय आशियाई राष्ट्रांचा संघ (ASEAN) आणि भारत दरम्यान लोकांच्या आदान-प्रदानास प्रोत्‍साहन मिळण्याचे अपेक्षित आहे.

ASEAN समूहाचे देश आणि भारत या देशांना 2018 साली 139.5 दशलक्ष पर्यटकांनी भेट दिली, जी 2017 सालच्या तुलनेत 7.4% ने अधिक आहे. या दृष्याला पाहता, पर्यटन मंत्र्यांनी पर्यटन क्षेत्रात सहकार्याला बळकटी आणण्यासाठी ASEAN आणि भारत यांच्या दरम्यान 2012 साली झालेल्या सामंजस्य कराराच्या आराखड्याच्या अंतर्गत पर्यटनाच्या क्षेत्रात ASEAN-भारत सहकार्य वाढविण्यास देखील सहमती दिली आहे.



WEFचा ‘वैश्विक धोका अहवाल 2019’
बोर्ज ब्रेन्डे (अध्यक्ष) यांच्या नेतृत्वात असलेल्या जागतिक आर्थिक मंच (WEF) कडून ‘वैश्विक धोका अहवाल 2019’ (Global Risk Report) प्रसिद्ध करण्यात आला आहे.

मानवी समाजापुढे असलेल्या आव्हानांची आणि मुख्य धोक्यांची ओळख पट‍वून देणार्‍या या अहवालात वैश्विक धोके कमी करण्यासाठी कमकुवत आंतरराष्ट्रीय सहकार्य हे धोकादायक ठरत असून, त्याचा सामूहिक इच्छाशक्तीवर नकारात्मक प्रभाव पडत आहे, असे दिसून आले आहे.

2018 साली जगाला जटिल आणि एकमेकांशी जुळलेल्या वाढत्या आव्हानांचा सामना करावा लागला. हवामान-विषयक बदल आणि घटलेली जागतिक वाढ ते आर्थिक असमानता अश्या समस्यांना कमी करण्यास जग अपयशी ठरत आहे. 

आणि याचे परिणाम भविष्यात सर्वांना भोगावे लागणार, असा इशारा देखील दिला गेला आहे. अश्या परिस्थितीचे निराकरण न झाल्यास, चौथ्या औद्योगिक क्रांतीमधील वाढत्या अडथळ्यांमध्ये अधिकच वाढ होणार.