इस्रायल भारताला देणार विशेष कुंपण तंत्रज्ञान
सीमेवरील कुंपण मजबूत करण्यासाठी आपल्याकडील विशेष नैपुण्य भारताला उपलब्ध करून देण्याची तयारी इस्रायलने दर्शवली आहे. गेल्या आठवडय़ात उरी येथे हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानातून नियंत्रण रेषा ओलांडून भारतात आल्याचे मानले जात आहे. त्यामुळे हे महत्त्वाचे मानले जात आहे.




नासाने दोन ताऱ्यांभोवती फिरणारा ग्रह शोधला
०१. नासाच्या हबल दुर्बिणीच्या मदतीने खगोलवैज्ञानिकांनी दोन ताऱ्यांभोवती फिरणारा ग्रह शोधला आहे. दोन ताऱ्यांची ही प्रणाली आपल्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानाच्या नजीक ८००० प्रकाशवर्षे दूर आहे. हा ग्रह ताऱ्यांभोवती ३०० दशलक्ष मैल अंतरावरून फिरत आहे. 

०२. लघुग्रहांचा पट्टा आपल्या सूर्यापासून जेवढय़ा लांब अंतरावर आहे, तेवढय़ा अंतरावरून हा ग्रह फिरत आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे. 

०३. दोन लाल बटू तारे ओजीएलइ २००७ व बीएलजी ३२९ एकमेकांपासून ६० लाख मैल दूर आहेत, हे अंतर पृथ्वीभोवतीची चंद्राची जी कक्षा आहे त्या अंतराच्या चौदापट आहे.

०४. हबलच्या निरीक्षणानुसार पहिल्यांदाच दोन तारे व एक ग्रह अशी प्रणाली गुरुत्वीय भिंग तंत्राने शोधण्यात आली असून यात गुरुत्वीय भिंग स्थिती, पुढील ताऱ्याच्या गुरुत्वाने मागील ताऱ्याचा प्रकाश वाकतो व काही क्षण त्याला समांतर होतो, तेव्हा असते. प्रकाशवर्धनाचा हा गुणधर्म पुढील ताऱ्याचे गुणधर्म दाखवू शकतो व इतर ग्रहांविषयी माहिती मिळू शकते. 


०५. २००७ मध्ये तीन घटकांची ही प्रणाली शोधण्यात आली होती व त्यात मायक्रोलेन्सिंग ऑब्झर्वेशन, द ऑप्टिकल ग्रॅव्हीटेशनल लेन्सिंग एक्सपिरिमेंट, मायक्रोलेन्सिंह फॉलोअप नेटवर्क, द प्रोबिंग लेन्सिंग अ‍ॅनोमलीज नेटवर्क व रोबोनेट कार्पोरेशन या गटांचा सहभाग होता. 

०६. पृथ्वीवरील निरीक्षण केंद्रांनी हे तारे व ग्रह यांचा शोध लावण्यात भूमिका पार पाडली असून यातील तिसऱ्या घटकाचे अस्तित्व सिद्ध करण्यास मदत केली आहे. भूकेंद्रांनी दोन शक्यता वर्तवल्या होत्या. त्यात शनीइतक्या वस्तुमानाचा ग्रह द्वैतीत ताऱ्यांभोवती फिरत आहे व पृथ्वी इतक्या वस्तुमानाचा ग्रह एका ताऱ्याभोवती फिरत आहे, या दोन शक्यतांचा समावेश होता. 

०७. हबल दुर्बिणीने पाठवलेल्या प्रतिमा अधिक स्पष्ट असल्याने हा शोध लावणे शक्य झाले आहे. मागील तारा व पुढील तारा यांचे अस्तित्व त्यामुळे ओळखणे शक्य झाले.



भारत फ्रान्समध्ये राफेल करार
०१. भारत फ्रान्समधील बहुप्रतिक्षित राफेल करार अखेर मार्गी लागला आहे. शुक्रवारी भारत आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांनी दिल्लीत राफेल करारावर स्वाक्षरी केली आहे. राफेल करारानुसार पुढील पाच वर्षात भारताला फ्रान्सकडून ३६ लढाऊ विमान मिळणार आहे.

०२. भारत आणि फ्रान्समध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राफेल करारावर चर्चा सुरु होती. २००७ मध्ये राफेल करार चर्चेत आला. तत्कालीन सरकारला फ्रान्सकडून १२७ विमान हवे होते. यातले ३६ विमान हे विमानाची निर्मिती करणाऱ्या कंपनीकडून घेतले जाणार होते. तर उर्वरित विमान भारतात तयार केले जाणार होते. 

०३. मात्र कराराविषयी संभ्रम निर्माण झाले. शेवटी सरकारने विमान निर्माण करणाऱ्या कंपनीऐवजी फ्रान्स सरकारसोबत करार केला. १६ महिन्यांपूर्वी मोदींनी फ्रान्स दौऱ्यादरम्यान राफेल कराराला गती देण्यासाठी चर्चादेखील केली होती.

०४. शुक्रवारी दिल्लीत भारत आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांनी राफेल विमानासाठी करार केला. ७.८ बिलियन यूरोमध्ये (भारतीय चलनानुसार ५९ हजार कोटी रुपये) हा करार करण्यात आला आहे. 

०५. आगामी पाच वर्षात ३६ राफेल विमान भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होतील. हवेतूनच जमिनीवर अचूक निशाणा साधणाऱ्या या विमानांमुळे भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्यात भर पडली आहे. या विमानात मिटीअर आणि मायका या दोन मिसाईल प्रणाली असतील.

०६. भारत आणि फ्रान्समध्ये राफेल करारावरुन गेल्या दोन वर्षांपासून चर्चा सुरु होती. या विमानांसाठी फ्रान्सने ८९ हजार कोटी रुपयांची ऑफर दिली होती. मात्र केंद्र सरकारने या करारासाठी पैसे कमी करण्याचा मुद्दा लावून धरला. 

०७. प्रदीर्घ चर्चेअंती फ्रान्सने तब्बल २९ हजार कोटी रुपये कमी घेत ५९ हजार कोटी रुपयांवर करार करण्यास तयारी दर्शवली. विशेष म्हणजे जेवढ्या रुपयांमध्ये हा करार झाला त्यातली निम्मी रक्कम फ्रान्स भारतामध्येच गुंतवणार आहे. 



व्हाट्‌सऍपचा डेटा फेसबुकवर टाकू नका
०१. दिल्ली उच्च न्यायालयाने व्हॉट्‌सऍप या मेसेजिंग ऍपला आज दणका देत २५ सप्टेंबरपर्यंतचे सर्व मेसेज आणि अन्य डेटा डिलीट करण्याचे आदेश दिले आहेत. व्हॉट्‌सऍपवरील माहिती फेसबुकशी जोडण्याबाबत सुरू असलेल्या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने फेसबुकला वरील आदेश दिल्याने येत्या रविवारपर्यंत व्हॉट्‌सऍप फेसबुकशी जोडले जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

०२. फेसबुकच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे युजर्सची माहिती फेसबुकला देण्यात येणार आहे. याला आव्हान देण्यासाठी कर्मण्य सिंग सरीन आणि श्रेया सेठी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज मुख्य न्यायाधीश जी. रोहिणी आणि न्यायाधीश संगीता धिंग्रा सेहगल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या वेळी खंडपीठाने २५ सप्टेंबरपूर्वी अकाउंट डिलीट केलेल्या किंवा वापरात असलेल्या युजर्सचा कसलाही डेटा फेसबुकशी जोडू नये, असे म्हटले आहे. 

०३. न्यायालयाने या वेळी सरकार आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाला व्हॉट्‌सऍप आणि अन्य इंटरनेट मेसेजिंग ऍप नियामक चौकटीत आणण्याबात नियमावली ठरविण्यास सांगितले आहे.