गुरुग्राममध्ये धावणार देशातील पहिली कॅटरपिलर ट्रेन
०१. हरियाणामध्ये देशातील पहिली कॅटरपिलर ट्रेन धावणार आहे. प्रवासी वाहतूक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी गुरुग्राममध्ये कॅटरपिलर ट्रेनची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. 


०२. विशेष म्हणजे कॅटरपिलटर रेल्वेचे डिझाईन भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने तयार केले आहे. यासाठी भारतीय रेल्वेतील अधिकाऱ्याला अमेरिकेतील एमआयटीचा पुरस्कारदेखील मिळाला आहे.

०३. अश्वनी उपाध्याय या रेल्वे अधिकाऱ्याने इमिल जेकब यांच्या मदतीने कॅटरपिलर ट्रेनची संकल्ना विकसित केली. एमआयटीमधून या दोघांची पीएचडी झालेली आहे.

०४. कॅटरपिलर ट्रेनचे वजन कमी असते. ही ट्रेन मेट्रो किंवा मोनोरेलसारखी असते. एका कॅटरपिलर ट्रेनच्या रुळांवरुन दुसरी ट्रेनदेखील जाऊ शकते. एक ट्रेन रुळांवरुन जात असताना दुसरी ट्रेन रुळांच्या खालील बाजूने जाऊ शकते, हे कॅटलपिलर ट्रेनचे वैशिष्ट्य आहे. १०० किलोमीटर प्रतितास वेगाने कॅटरपिलर ट्रेन धावू शकते.



बँकिंगचा वृद्धीदर ५४ वर्षांच्या नीचांकावर
०१. नोटाबंदीमुळे बँकिंग क्षेत्राचा वृद्धीदर तब्बल ५४ वर्षांच्या नीचांकावर गेला आहे. गृह, वाहन आणि ग्राहक कर्जाची मागणी प्रचंड घटल्याने बँकांना मोठा फटका बसला आहे.

०२. रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवड्यात डाटा जारी केला आहे. त्यानुसार, ९ डिसेंबरला संपलेल्या १५ दिवसांत बँकांच्या कर्जाचा वँद्धीदर ५.८ टक्क्यांवर आला आहे. हा १९६२ नंतरचा सर्वाधिक कमी वृद्धीदर ठरला आहे. 

०३. दोन महिन्यांपूर्वी कर्जाचा वृद्धीदर ८ टक्के होता. देशातील आर्थिक हालचाली निर्धारित करण्यात कर्जाचा वृद्धीदर महत्त्त्वाचा आहे. नोटाबंदीमुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने कर्जाची मागणी घटली आहे.




विराट क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा ‘कॅप्टन ऑफ द इयर’
०१. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या यावर्षीच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून विराटची निवड केली आहे. त्याआधी आयसीसीने निवडलेल्या यावर्षीच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्वसुद्धा विराटकडे सोपवण्यात आले होते.

०२. आश्चर्याची बाब म्हणजे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या संघाचे नेतृत्व ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्हन स्मिथऐवजी विराट कोहलीकडे सोपवले आहे.



कलमाडी, अभय चौटाला IOAच्या आजीवन अध्यक्षपदी
०१. वादग्रस्त क्रीडा प्रशासक सुरेश कलमाडी आणि अभय सिंह चौटाला यांची भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या आजीवन अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

०२. २०१० साली दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तयारीत झालेल्या घोटाळ्यामुळे सुरेश कलमाडी वादाच्या भोवऱ्यात सापडले होते, तर इंडियन नॅशनल लोकदलाचे नेते असलेल्या अभयसिंह चौटाला यांच्यावर बेहिशेबी उत्पन्नाप्रकरणी खटला सुरू आहे.

०३. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या चेन्नईत झालेल्या सर्वसाधारण सभेत कलमाडी आणि चौटालांची आजीवन अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव आयओएचे संयुक्त सचिव राकेश गुप्ता यांनी ठेवला. त्यानंतर बैठकीस उपस्थित असलेल्या १५० सदस्यांनी एकमताने हा प्रस्ताव पारित केला. 

०४. अभय चौटाला यांनी याआधी विविध क्रीडा संघटनांवर प्रशासक म्हणून काम पाहिले आहे. तसेच ते सध्या हरयाणा ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आहेत. तर सुरेश कलमाडी हे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत. 



अॅड. रोहित देव राज्याचे नवे महाधिवक्ता
०१. अॅड. श्रीहरी अणे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या महाधिवक्तापदावर अॅड. रोहित देव यांची नियुक्ती करण्यात आली असून देव हेसुद्धा नागपूरचे आहेत. 

०२. देव यांची जून २०१५ मध्ये सहयोगी महाधिवक्तापदी नियुक्ती करण्यात आली होती. श्रीहरी अणे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या महाधिवक्तापदाचा प्रभार सहयोगी महाधिवक्ता रोहित देव यांच्याकडे सोपविण्यात आला होता. 



ओबीसी’साठीचे नवीन खाते मुख्यमंत्र्यांकडेच राहणार
०१. ओबीसी समाजासाठी भरीव कामगिरी करुन त्यांना न्याय देण्यासाठी राज्यात स्वतंत्र ओबीसी खाते स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला. 

०२. विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग यांच्या सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हे नवीन खाते निर्माण केले जाणार आहे.

०३. त्यासाठी सचिव, अधिकारी, कर्मचाऱ्यांची ५१ पदे निर्माण केली जाणार असून त्यासाठी तीन कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.  

०४. विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यांची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या तीन कोटी ६८ लाख ८३ हजार इतकी आहे.



डीआरडीओकडून अँटी-एअरफिल्ड शस्त्राची चाचणी
०१. संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण आणि संशोधन विकास संघटनेने (डीआरडीओ) भारतीय हवाई दलाच्या एका विमानातून स्‍मार्ट अँटी-एअरफिल्ड शस्त्राची (एसएएडब्‍ल्‍यू) यशस्वी उड्डाण चाचणी केली.

०२. एसएएडब्‍ल्‍यू स्वदेशात तयार आणि विकसित केलेले स्मार्ट हत्यार आहे. त्याचे वजन १२० किलोग्राम एवढे आहे. डीआरडीओने ते विकसित केले असून १०० किलोमीटरच्या परिघातील जमिनीवरील लक्ष्य ते अचूकतेने भेदू शकते.

०३. या उड्डाणाच्या संपूर्ण कालावधीत ओडिशामधील चांदीपुर येथील एकीकृत चाचणी केंद्र (आईटीआर) येथून रडार आणि टेलिमॅट्री ग्राऊंड स्‍टेशनांकडून कॅप्टिव्ह व रिलीज चाचण्यांचा मागोवा घेण्यात आला. 

०४. संरक्षण खात्याच्या संशोधन व विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे चेअरमन डॉ. एस. क्रिस्‍टोफर यांनी या यशस्वी मोहिमेबद्दल डीआरडीओ आणि हवाई दलाचे अभिनंदन केले आहे. 

०५. सरकारने सप्टेंबर २०१३ साली या प्रकल्पासाठी ५६.५८ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर केले होते. भारताव्यतिरिक्त फक्त अमेरिका आणि इस्राएल हेच असे हत्यार विकसित करत आहेत.



‘अग्नी-५’ची यशस्वी चाचणी
०१. भारताने अग्नी-५ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. ओडिशाच्या तटावर अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली आहे. डिफेन्स रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनकडून (डीआरडीओ) ही चाचणी करण्यात आली आहे. 

०२. आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची ही चौथी आणि शेवटची चाचणी होती. यावेळी पूर्ण क्षमतेने या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. १७ मीटर लांब आणि ५० टन वजनाच्या या क्षेपणास्त्राने आपल्या सर्व लक्ष्यांना भेदण्यात यश मिळविले. 


०३. संपूर्ण चीन अग्नी-५ च्या कक्षेत असणार आहे. अग्नी-५ अण्वस्त्र वाहून नेण्यातही सक्षम आहे.

०४. ओडिशाच्या व्हिलर बेटावरुन (एपीजे अब्दुल कलाम आयलँड) अग्नी-५ ची चाचणी करण्यात आली. या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात चीन येत असल्यामुळे व्यूहनितीच्या दृष्टीने ही चाचणी अतिशय महत्त्वाची होती. 


०५. याआधी २०१२, २०१३ आणि २०१५ मध्ये अग्नी-५ ची चाचणी घेण्यात आली आहे. अग्नी-५ ची शेवटची चाचणी जानेवारी २०१५ मध्ये करण्यात आली होती. संपूर्ण क्षमतेनुसार मारा करण्यासाठी अग्नी-५ चे ३ टप्पे आहेत. 

०६. स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडला सुपूर्द करण्याआधीची अग्नी-५ ची ही शेवटची चाचणी होती. स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडची (एसएफसी) स्थापना २००३ मध्ये करण्यात आली आहे. देशाच्या अण्वस्त्रांच्या नियंत्रणाचे काम स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडकडे आहे.

०७. अण्वस्त्र डागण्याची क्षमता असलेल्या अग्नी-५ ला अगदी सहजपणे कोणत्याही ठिकाणी नेले जाऊ शकते. अग्नी-५ च्या माध्यमातून कोणत्याही ठिकाणाहून शत्रूवर अण्वस्त्र सोडले जाऊ शकते. 

०८. सध्या अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, ब्रिटन या देशांकडे ५ हजार किलोमीटरपर्यंत मारा करणारी क्षेपणास्त्रे आहेत. आता या देशांच्या पंगतीत भारताचा समावेश झाला आहे. ५ हजार किलोमीटरपर्यंत क्षेपणास्त्रे सोडू शकणारा भारत जगातील सहावा देश आहे.



हागणदारीमुक्तीत महाराष्ट्र गुजरातच्या पुढे!
०१. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील १० हजार ७७० ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या असून सिंधुदूर्ग नंतर आता सातारा, रत्नागिरी आणि कोल्हापूर हे जिल्हे हागणदारीमुक्त घोषित झालेले आहेत.

०२. देशात दुसऱ्या क्रमांकावर गुजरात (६३२४ गावे) तर तिसऱ्या क्रमांकावर उत्तराखंड (५६०४) राज्य आहे. 

०३. महाराष्ट्रात ५९ तालुके हागणदारीमुक्त झाले आहेत. देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र ग्रामीण स्वच्छतेत प्रचंड वेगाने पुढे जात आहे.

०४. महाराष्ट्रामध्ये १८ लाख शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी थेट लोकांपर्यंत जावून वैयक्तिक शौचालय बांधून त्याचा वापर व्हावा यासाठी राज्यभर नुकतेच एक अभियान राबविण्यात आले.२२ आॅगस्ट ते २ आॅक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छ महाराष्ट्रासाठी अठरा लाख भेटी’ या नावाने हे अभियान राबवले.



हॉलिवूड अभिनेत्री कॅरी फिशर यांचे निधन
०१. १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘स्टार वॉर्स’ या चित्रपटातील प्रिन्सेस लेया म्हणून नावारुपास आलेल्या अभिनेत्री कॅरी फिशर यांचे निधन झाले आहे. फिशर यांच्या जाण्याने हॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. 

०२. १९७५ मध्ये अभिनेता वॉरन बिटीसोबतच्या ‘शॅम्पू’ या चित्रपटाद्वारे फिशर यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘स्टार वॉर्स’ या चित्रपटाने कॅरी फिशर यांनी विशेष लोकप्रियता मिळाली. 

०३. अखेर वयाच्या ६० व्या वर्षी ‘स्टार वॉर्स’ चित्रपटातील एक हुकमी एक्का मानल्या जाणाऱ्या कॅरी फिशर यांचे निधन झाले.