ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं निधन
ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते.


ओम पुरी यांचा जन्म १८ आॅक्टोबर १९५० रोजी हरियाणातील अंबाला शहरात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पंजाबमधल्या पटियालामध्ये झाले.

पुण्यातील फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया आणि दिल्लीतील नॅशनल स्कूल आॅफ ड्रामाचेही ते विद्यार्थी होते.

१९८१ साली प्रदर्शित झालेल्या ‘आक्रोश’ या चित्रपटासाठी त्यांना पहिला फिल्म फेअर पुरस्कार मिळाला. तसेच ‘आरोहन’ आणि ‘अर्धसत्य’ या चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्तम अभिनेत्याचे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. 

१९९० साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

‘घायल वन्स अगेन’ हा त्यांचा हिंदीतील शेवटचा चित्रपट ठरला. ‘जंगल बुक’मधील बगिरा या व्यक्तिरेखेला त्यांना आवाज दिला होता.



आंध्र सरकारचे बक्षीस, नोबेल मिळवा, १०० कोटी जिंका
आंध्र प्रदेश सरकारने नोबेल जिंकणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी बंफर ऑफरची घोषणा केली आहे. राज्यातील शास्त्रज्ञांनी जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार पटकावल्यास त्यांना १०० कोटींचे बक्षीस दिले जाणार आहे. 

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिरुपती येथील श्री पद्मावती महिला विद्यापीठाच्या नॅशनल चिल्ड्रेन्स सायन्स काँग्रेसच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना ही घोषणा केली आहे.

सध्या नोबेल पुरस्कारासह ५.९६ कोटी रुपये बक्षिस म्हणून दिले जातात. नायडू यांनी दिलेली ऑफर देशातील अन्य कोणत्याही राज्यांद्वारे देण्यात येणाऱ्या बक्षिसाच्या रकमेपेक्षा कैकपटीने अधिक आहे. 



लवकरच एकाच राष्ट्रीय चाचणी सेवा परीक्षा 
देशात उच्चशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा घेण्यासाठी अमेरिकेतील ‘एज्युकेशन टेस्टिंग सर्व्हिस’च्या धर्तीवर राष्ट्रीय चाचणी सेवेची (नॅशनल टेस्टिंग सर्व्हिस – एनटीएस) स्थापना करण्याची शिफारस केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केंद्रीय मंत्रिमंडळाला केली आहे. 

सध्या देशात सीबीएसई, आयआयटी, आयआयएम आणि एआयसीटीईतर्फे कॅट, जेईई(मेन), जेईई (अ‍ॅडव्हान्स्ड), गेट, सीमॅट, नीट आणि नेट अशा प्रवेशपरीक्षा घेतल्या जातात. दरवर्षी देशभरातून त्यासाठी ४० लाखाहून अधिक विद्यार्थी बसतात.

यापूर्वी अनेक सरकारांनी विविध समित्यांच्या माध्यमातून अशी शिफारस केली होती. मात्र ती फलद्रुप होऊ शकली नव्हती. १९८६ च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी १९९२ साली तयार करण्यात आलेल्या कृती आराखडय़ात राष्ट्रीय चाचणी सेवेच्या स्थापनेची शिफारस केली होती. 

त्यानंतर राष्ट्रीय ज्ञान आयोग (२००६-२००९), जेईई पद्धतीच्या फेरविचारासाठी स्थापन केलेली अशोक मिश्रा समिती (२०१५) आदी समित्यांनी प्रवेशपरीक्षा घेण्यासाठी अशा सेवेच्या स्थापनेच्या बाजूने मत नोंदवले होते.

इंडियन सोसायटीज अ‍ॅक्ट्अंतर्गत जून २०१७ पर्यंत ही सेवा स्थापन करण्याचा मंत्रिमंडळाचा विचार आहे. सुरुवातीला ऑक्टोबर २०१७ ते मार्च २०१८ पर्यंत या सेवेकडून नीट, जेईई, गेट, यूजीसी-नेट या परीक्षा घेण्यात येतील.



क्रीडा विकास समितीत बात्रा व बिंद्राचा समावेश
क्रीडा विकास समितीत क्रीडा पदाधिकाऱ्यांविरुद्ध कायम आक्रमक असलेला अभिनव बिंद्रा आणि नारिंदर बात्रा यांची निवड केली आहे. बिंद्रा यांस जागतिक नेमबाजी संघटनेच्या क्रीडापटू समितीत काम करण्याचा अनुभव आहे तर बात्रा जागतिक हॉकी संघटनेचे अध्यक्षही आहेत. 

ते आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या घटनेस कोणताही धक्का न देता क्रीडा संघटनांना घटनेच्या चौकटीत आणतील, असेच मानले जात आहे.

क्रीडा सचिव इंजेती श्रीनिवास अध्यक्ष असलेली ही समिती क्रीडा प्रशासनाचे स्वरूप, क्रीडा संघटना प्रशासनासमोरील प्रश्‍न, न्यायालयाने याबाबत दिलेले निर्णय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील पद्धत याचा आढावा ही समिती घेईल. त्याद्वारे राष्ट्रीय क्रीडा विकाससंहिता तयार करण्याबद्दल सूचना करणार आहे. 

समितीत अंजू जॉर्ज, प्रकाश पदुकोण, नंदन कामत (वकिल), दीपा कर्माकरचे मार्गदर्शक विश्‍वश्‍वर नंदी, क्रीडा-पत्रकार विजय लोकापल्ली, क्रीडा खात्याचे सहसचिव यांचाही समावेश आहे.



महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी अभय आपटे
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी पुण्याचे संघटक अ‍ॅड.अभय आपटे, तर चिटणीसपदी रियाज बागवान यांची एकमताने निवड झाली. 

संघटनेचे खजिनदार विकास काकतकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संघटनेच्या कार्यकारिणीचे बैठकीत उपाध्यक्षपदी पुण्याचे विजयकुमार ताम्हाणे व रायगडचे चंद्रकांत मते यांची बिनविरोध निवड झाली.

लोढा समितीच्या शिफारसींनुसार नऊ किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे पदावर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना संघटनेचे कोणतेही पदावर राहता येणार नाही, अशी सूचना करण्यात आली होती.

त्यानुसार संघटनेचे अध्यक्ष अजय शिर्के, चिटणीस सुधाकर शानबाग, उपाध्यक्ष धनपाल शहा व कमलेश ठक्कर यांना आपल्या पदाचा त्याग करावा लागला. त्यांच्याजागी या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड झाली.



रॉकफेलर’च्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे राजीव शहा
मेरिकेतील सर्वांत मोठी आणि सर्वांत प्रभावशाली देणगीदार संस्था असलेल्या रॉकफेलर फाउंडेशनच्या अध्यक्षपदासाठी राजीव जे. शहा यांचे नाव निश्‍चित झाले आहे. यामुळे ते संस्थेचे सर्वांत तरुण आणि भारतीय वंशाचे पहिले अध्यक्ष ठरतील.

राजीव शहा २००९ ते २०१५ या काळात  युनायटेड स्टेट्‌स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटचे (यूएसएआयडी) माजी प्रमुख होते. त्यांनी अमेरिकेच्या कृषी विभागात मुख्य शास्त्रज्ञ आणि कनिष्ठ सचिव या पदांवरही काम केले आहे. बिल अँड मेलिंडा गेट्‌स फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेही ते आठ वर्ष कार्यरत होते.

शहा हे एक ते दोन दिवसांतच ज्युडीथ रॉडिन यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील, असे ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने म्हटले आहे. रॉडिन या मागील बारा वर्षांपासून या संस्थेच्या अध्यक्ष होत्या.

अत्यंत नावाजलेल्या आणि वर्षाला साधारण वीस कोटी डॉलर देणगी देणाऱ्या या संस्थेची सूत्रे त्यांच्या हातात येणार आहेत.शंभरहून अधिक जणांमधून शहा यांची निवड करण्यात आल्याचे रॉकफेलर फाउंडेशन मंडळाचे अध्यक्ष रिचर्ड पार्सन्स यांनी सांगितले. 



राज शहा ट्रम्प प्रशासनात महत्त्वाच्या पदावर
अमेरिकेचे नवनिर्वाचित डोनाल्ड ट्रम्प यांनी मूळ भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक राज शहा यांची व्हाईट हाऊसमधील ट्रम्प यांचे उपसहायक आणि संपर्क उपसंचालक व संशोधक संचालक पदावर नियुक्ती केली आहे.

अध्यक्षांच्या ‘ट्रांझिशन टीम’ने याबाबतची घोषणा केली असून, वयाच्या केवळ तिशीत असलेल्या राज यांना यामुळे ट्रम्प यांच्यासोबत काम करण्याची आणखी मोठी संधी मिळाली आहे. 

राज शहा हे सध्या रिपब्लिकन राष्ट्रीय समितीच्या ‘अपोझिशन रिसर्च’चे प्रमुख आहेत. ट्रम्प यांच्या प्रतिस्पर्धी व डेमॉक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्याविरोधात संशोधन करणाऱ्या पथकाचे नेतृत्व शहा यांनी केले होते.