१ जुलैला ‘राज्य मतदार दिवस’ साजरा होणार
राष्ट्रीय मतदार दिनाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये १ जुलै रोजी ‘राज्य मतदार दिवस’ साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. भारत निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रामध्ये राज्य मतदार दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव होता. 


केंद्रिय निवडणुक आयोगाने भारतीय लोकशाही अधिक बळकट व्हावी या हेतूने मतदारांना जागृत करुन त्यांचा मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग वाढावा या हेतूने ‘स्वीप’ हा महत्वकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. 

भारत निवडणुक आयोगाकडून दरवर्षी २५ जानेवारीला ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभर मतदार जागृतीसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. 

तथापि ‘स्वीप’ कार्यक्रमाची अंमलबजावणी केवळ ‘राष्ट्रीय मतदार दिन’ या पुरती मर्यादित राहु नये तर मतदार जागृतीचे काम निरंतर सुरु राहावे या हेतून दरवर्षी राज्यस्तरावर ‘राज्य मतदार दिवस’ व प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा मतदार दिवस साजरा करावा या असे निर्देश भारत निवडणुक आयोगाने दिले आहेत.



तेजस ट्रेन २४ मे पासून सेवेत येणार
कोकण मार्गावर धावणारी आणि साडे आठ तासांत सीएसटी ते कर्माली अंतर कापणारी वेगवान अशी तेजस ट्रेन प्रत्यक्षात २४ मे पासून सेवेत येणार आहे. 

या ट्रेनला रेलवेमंत्री सुरेश प्रभु यांचा हस्ते २२ मे रोजी मुंबईतून हिरवा कंदील देण्यात येईल. वाय-फाय, सर्वोत्तम जेवण, चहा-कॉफीसाठी मशीन्स आणि सीटबरोबर एलसीडी स्क्रीन असलेली ही वातानूकूलीत रेल्वे असणार आहे



पाच दिवसात दोन वेळा ‘माऊंट एव्हरेस्ट’ सर, अरुणाचलच्या अंशुचा विक्रम
अरुणाचल प्रदेशमध्ये राहणाऱ्या अंशु जामसेन्पा हीने एक जागतिक विक्रम नोंदवून भारताची मान पुन्हा उंचावली आहे. जगातील सर्वोच्च शिखर असणाऱ्या माऊंट एव्हरेस्टवर तिने ५ दिवसात २ वेळा चढाई करुन या गौरवावर आपले नाव कोरले आहे.

अशाप्रकारचा विक्रम करणारी अंशु पहिली भारतीय महिला आहे. आतापर्यंत तिने जगातील सर्वोच्च शिखर पाचव्यांदा चढून पुर्ण केले आहे. २०११ मध्ये अंशुनेच १० दिवसांमध्ये हे सर्वोच्च शिखर पार केले होते. 

पुण्याच्या किशोर धनकुडेंनी जगातल्या सर्वात उंच अशा एव्हरेस्टवर दुसऱ्यांदा यशस्वी चढाई केली आहे. दोन्ही बाजुंनी एव्हरेस्ट सर करणारे ते महाराष्ट्रातील पहिलेच गिर्यारोहक आहेत. २०१४ मध्ये त्यांनी पहिल्यांदा उत्तर दिशेने म्हणजे चिनच्या दिशेने एव्हरेस्ट शिखर सर कलं होतं. तर आता त्यांनी दक्षिणेकडून म्हणेज नेपाळमधून एव्हरेस्ट शिखर सर केले.



भारतापेक्षा बांगलादेश, नेपाळ, भूतानची आरोग्य सेवा ‘बेस्ट’
ग्लोबल बर्डन ऑफ डिसिसने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या आरोग्य अहवालामध्ये गेल्या २५ वर्षांत पहिल्यांदाच भारताचा आरोग्य सेवा निर्देशांक शेजारील देशांपेक्षा कमी असल्याचं समोर आलं आहे. १९९०-२०१५ दरम्यानच्या कालावधीचा विचार करुन १९५ देशांच्या आरोग्य दराचा आढावा या अहवालात घेण्यात आला आहे. 

बांगलादेश, भुतान, श्रीलंका, चीन या देशांपेक्षा भारताचा आरोग्य सेवा निर्देशांक खालावल्याचं दिसून येत आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान ही दोनच राष्ट्र आरोग्य सेवा निर्देशांकाच्या बाबतीत भारताच्या मागे आहेत.

या अहवालानुसार गेल्या २५ वर्षांमध्ये भारताच्या आरोग्य दरामध्ये १४.१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. १९९० मध्ये ३०.७ टक्क्यांवर असलेला आरोग्य निर्देशांक २०१५ मध्ये ४४.८ टक्क्यांवर पोहोचला होता. अहवालात नमूद केल्यानुसार श्रीलंकेचा आरोग्यसेवा निर्देशांक ७२.८%, बांग्लादेशचा ५१.७%, भुतानचा ५२.७% आणि नेपाळचा ५०.८% टक्के इतका आहे. 

हृदयरोगाशी निगडीत विकारांवरील उपायांमध्ये भारत २५ व्या स्थानी आहे. तर, क्षयरोगाच्या उपचारांच्या बाबतीत भारत २६ व्या स्थानी आहे. मूत्रपिंडाशी निगडीत विकारांवरील उपायांच्या बाबतीत भारत २० व्या स्थानी आहे. 

यासोबतच इतरही विकारांवरील उपचारांच्या यादीतील भारताचं स्थान समोर आलं आहे. त्यात मधुमेह (३८ वं स्थान), अल्सरचे विकार (३९ वं स्थान) या विकारांवरील उपचार सेवा निर्देशांकाचाही समावेश आहे.



मुंबईने तिसऱ्यांदा आयपीएलचं जेतेपद पटकावले
मुंबई इंडियन्स संघाने रायझिंग पुणे सुपरजाएंट्स संघावर मात करून तिसऱ्यांदा आयपीएलचं जेतेपद पटकावलं. हैदराबादमध्ये रंगलेल्या या सामन्यात मुंबईने पुण्यावर एका धावेने रोमांचक विजय साजरा केला. 


केवळ १३० धावांचा आकडा धाव फलकावर असताना मुंबईने निराश न होता अखेरच्या षटकामध्ये विजय खेचून आणला. 



लंडन महाराष्ट्र मंडळाचे २ जूनपासून संमेलन
महाराष्ट्र मंडळच्या (लंडन) वर्धापन दिनानिमित्त ‘लंडन मराठी संमेलन’ हा उद्योजकता आणि सांस्कृतिक सोहळा २ ते ४ जून दरम्यान लंडनमध्ये होणार आहे.

जागतिक महाराष्ट्रीय उद्योजक परिषद आणि फिनेक्‍ट-२०१७ मुंबई-लंडन आर्थिक सेतू या दोन उपक्रमांचे उद्‌घाटन २ जूनला कॅनरी व्हार्फ हू या लंडनच्या आर्थिक केंद्रातील कॅनडा स्क्वेअरमध्ये होणार आहे. 

या वेळी सर चिंतामणराव देशमुखांच्या आठवणींना उजाळा देण्यात येणार आहे. या संमेलनात प्रथितयश मराठी उद्योजकांचा सन्मान करण्यात येणार आहे. अर्थशास्त्र, माहिती व तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीतील तज्ज्ञ संमेलनात मार्गदर्शन करतील.



अवकाश स्थानकात सापडलेल्या जीवाणूला एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव
अमेरिकेच्या नासा या संस्थेने आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात शोधून काढलेल्या एका नव्या जीवाणूला दिवंगत माजी राष्ट्रपती व ख्यातनाम वैज्ञानिक एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आले आहे. आतापर्यंत हा जीवाणू हा फक्त आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातच आढळला असून त्याचे पृथ्वीवर अस्तित्व नाही.

आंतरग्रहीय पातळीवर फिरणाऱ्या एका अवकाशयानात म्हणजेच आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात फिल्टरमध्ये हा जीवाणू सापडला होता. त्याचे नाव सोलिबॅसिलस कलामी असे ठेवण्यात आले आहे. त्यात भारतीय वैज्ञानिक कलाम यांच्या स्मृती जागत्या ठेवण्यात आल्या आहेत. सॉलिबॅसिलस हे प्रजाती नाव असून हा स्पोअर निर्माण करणारा जीवाणू आहे.


कलाम यांनी केरळात थुंबा येथे अग्निबाण प्रक्षेपण केंद्र सुरू करण्याच्या कामात सहभागी होण्याच्या आधी नासात १९६३ मध्ये प्रशिक्षण घेतले होते. 

सोलिबॅसिलस कलामी हा जीवाणू पृथ्वीवर आढळलेला नाही, त्यामुळे तो बाहेरील ग्रहावरचा असावा असे मानले जाते. हा जीवाणू अवकाश स्थानकातील प्रतिकूल स्थितीत टिकून आहे. 

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक हे फुटबॉलच्या मदानाच्या आकाराचे असून ते १९९८ मध्ये सोडण्यात आले. ते मानवनिर्मित सर्वात मोठी वस्तू मानले जाते. त्याचे वजन ४१९ टन असून तेथे एका वेळी सहा अवकाशवीर वास्तव्यास असतात. त्यासाठी १५० अब्ज डॉलर्स खर्च आला आहे. आतापर्यंत २२७ अवकाशवीरांनी या अवकाशस्थानकात वास्तव्य केले असून त्यामुळे तेथे अस्वच्छताही होते. तेथे पाणी व हवा यांचे फेरचक्रीकरण करून वापर केला जातो. 



इराणमध्ये रुहानी पुन्हा विजयी
जगाचे लक्ष लागलेल्या इराणच्या अध्यक्षीय निवडणुकीत सध्याचे अध्यक्ष हसन रुहानी हे विजयी झाले असून, त्यांनी लागोपाठ दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली आहे. ते सुधारणावादी मानले जातात. 

रुहानी यांना मोजणी झालेल्या ३.८९ कोटीपैकी २.२८ कोटी मते मिळाली आहेत. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी इब्राहिम रईसी हे कट्टर धर्मगुरू असून, त्यांना १.०१ कोटी मते मिळाली आहेत. ४ कोटी मतदारांनी कालच्या निवडणुकीत मतदान केले ही टक्केवारी ७० टक्के होती.

रुहानी यांच्यामुळे २०१५मध्ये इराणचा अणुकरार होऊ शकला होता. त्यातून इराणला काही र्निबधातून सूट मिळाली होती. राजकीय स्वातंत्र्यास त्यांनी महत्त्व दिले. शिवाय इतर देशांशी सौहार्दाचे संबंध निर्माण केले.

इराणचे अध्यक्ष तेथील राजकीय प्रणालीत दुसऱ्या क्रमाकाचे शक्तिशाली नेते असतात. देशाच्या सर्वोच्च नेत्यानंतर त्यांचा क्रमांक लागतो. सर्वोच्च नेता धर्मगुरूंचे पथक निवडत असते व धार्मिक नेताच सर्वोच्च राहतो.