देशातील ‘टॉप टेन’ स्वच्छ शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश
सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात देशातील ‘टॉप १०’ स्वच्छ शहरांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत आठव्या स्थानावर नवी मुंबईचा समावेश झाला आहे. केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी यासंदर्भातील यादी आज (गुरुवार) जाहीर केली.


‘स्वच्छ भारत’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना आहे. ‘स्वच्छ सर्व्हेक्षण२०१७’ अंतर्गत या योजनेचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये देशातील ४३४ शहरातून माहिती घेण्यात आली. तर ३७ लाखाहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. 

या यादीत इंदौर सर्वांत वरच्या स्थानावर आहे. तर नवी मुंबईला आठवे स्थान मिळाले आहे

इंदौर (मध्य प्रदेश), भोपाळ (मध्य प्रदेश), विशाखापट्टनम (आंध्र प्रदेश), सूरत (गुजरात), म्हैसूर (कर्नाटक), तिरुचिरापल्ली (तमिळनाडू), एनडीएमसी (नवी दिल्ली), नवी मुंबई (महाराष्ट्र), तिरुपती (आंध्र प्रदेश), बडोदा (गुजरात) ही देशातील टॉप १० शहरे आहेत. 



सुवर्णदुर्ग किल्ल्याची होणार पुनर्बांधणी
पोली तालुक्‍यातील हर्णै येथील ढासळणाऱ्या सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या पुनर्बांधणीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुरातत्त्व विभागाने हाती घेतला आहे. पावसाळ्यानंतर हे काम सुरू होणार असल्याचे सूतोवाच पुरातत्त्व विभागाने केले आहे. 

पुरातत्त्व विभागाच्या मुंबई मंडळाच्या वतीने ‘स्वच्छ स्मारक, स्वच्छ भारत’ अंतर्गत या स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ सिंधुदुर्गातील विजयदुर्ग येथे १६ एप्रिलला करण्यात आला होता. ३० एप्रिलला हर्णै येथे सुवर्णदुर्ग या समुद्रातील किल्ल्यात त्याची सांगता करण्यात आली. 

अनेक शतकांपूर्वी बांधण्यात आलेल्या या किल्ल्याचे दगड डेक्‍कन लॅटराईट या प्रकारचे आहेत. हे दगड कोकणातील दगड खाणींमध्ये सहजासहजी सापडत नाही. यामुळे आता या किल्ल्याच्या बुरूजांच्या पुनर्बांधणीकरिता आवश्‍यक असणारा दगड जिल्ह्याच्या बाहेरून आणण्यात येणार आहे.



इसरोची नवी पर्यावरणपुरक कार
एकाच प्रक्षेपकातून तब्बल १०४ उपग्रह पाठविण्याचा विश्‍वविक्रम भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) केला, त्याचे जगभरातून कौतुक झाले. त्यानंतर आता इस्त्रोने एक सोलर हायब्रिड इलेक्ट्रिक कार तयार केली आहे. ही कार संपूर्णत: स्वदेशी बनावटीची आहे. 

तिरुअनंतपुरम येथे विक्रम साराभाई अंतराळ संशोधन केंद्र येथे या कारचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. ही पर्यावरणपुरक कार उंच, सखल भागावर देखील चालविता येत असल्याचे इस्त्रोने म्हटले आहे. 

पेट्रोल, डिझेल सारख्या इंधनावर चालणाऱ्या गाड्यांमुळे सध्या पर्यावरणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या नव्या कार सारखी वाहने बाजारात आल्यास प्रदुषण मुक्त अशी पर्यायी वाहतुक व्यवस्था निर्माण होऊ शकते असेही इस्त्रोने म्हटले आहे. 

इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार, या कारमध्ये हाय एनर्जी लिथियम बॅटरी बसविण्यात आली आहे. ही बॅटरी सूर्यप्रकाशावर चार्ज करता येणे शक्य आहे. अशा प्रकारची कार बनवितांना कारवर सोलार पॅनल बसविणे आणि त्याची बॅटरीशी जोडणी करणे हे मोठ आव्हान असल्याचे इस्त्रोने म्हटले आहे. 



‘जीसॅट – ९’चे यशस्वी प्रक्षेपण
दक्षिण आशियाई दूरसंचार उपग्रह ‘जीसॅट -९’चे आज यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. यशस्वी प्रक्षेपणामुळे अवकाशातही ‘सार्क-बंध’ अधिक दृढ झाले आहेत. ‘जीएसएलव्ही-एफ9’ या प्रक्षेपकाद्वारे याचे सायंकाळी ४:५७ वाजता सतीश धवन अवकाश केंद्रावरून प्रक्षेपण करण्यात आले. 

भारतीय अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’ने जीसॅट-९ची बांधणी केली आहे. यासाठी स्वदेशी क्रायोजेनिक इंजिन वापरण्यात आले आहे. याच्या निर्मितीसाठी २३५ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. 

दूरसंचार आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी या उपग्रहाची मदत शेजारी देशांना होणार आहे. दक्षिण आशियाई देशांना दूरसंचार आणि संकटकाळात मदत व परस्परांशी संपर्क उपलब्ध व्हावा, असे याचे उद्दिष्ट आहे. 

दक्षिण आशियातील भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, श्रीलंका, नेपाळ, मालदीव हे देश या उपक्रमात सहभागी आहेत. पाकिस्तान यात सहभागी झालेला नाही. 

या उपग्रहाचे वजन २२३० किलो असून कार्यकाल १२ वर्षे आहे. जीएसएलव्ही प्रक्षेपकाद्वारे याचे प्रक्षेपण करण्यात आले असून प्रक्षेपणासाठी स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनचा वापर करण्यात आला आहे.



भारत फिफा क्रमवारीत ‘टॉप १००’ मध्ये दाखल
जागतिक फुटबॉल महासंघाने (फिफा) प्रसिद्ध केलेल्या ताज्या जागतिक क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघाने ‘टॉप-१००’ मध्ये स्थान प्राप्त केलं आहे. तब्बल २१ वर्षांनंतर भारतीय फुटबॉल संघाला ‘टॉप-१००’ मध्ये पोहोचता आलं आहे. 

याआधी भारतीय फुटबॉल संघाला १९९६ साली पहिल्या १०० संघांमध्ये स्थान मिळवता आलं होतं. फेब्रुवारी १९९६ मध्ये भारताला ९४ वे स्थान मिळाले होते. आता पुन्हा एकदा ताज्या क्रमवारीत भारतीय संघाला १०० वे स्थान मिळाले आहे. 

भारतीय संघासोबतच निकारागुआ, लिथुआनिया आणि इस्टोनिया हे संघ देखील संयुक्तपणे या स्थानावर आहेत.

भारताचा आगामी काळात ७ जून रोजी लेबनान फुटबॉल संघाविरुद्ध मैत्रिपूर्ण सामना होणार आहे. यानंतर ‘एएफसी करंडक’ स्पर्धेत भारताची १३ जून रोजी भारताची किर्गीजस्तानविरुद्ध लढत होणार आहे



विकीपीडियावरील तुर्कस्तानमध्ये  बंदी 
ऑनलाइन एनसायक्‍लोपीडिया विकीपीडियाच्या संकेतस्थळावर घातलेली बंदी उठविण्यास तुर्कस्तानमधील न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला.
विकीपीडिया चालविणाऱ्या विकीमीडिया फाउंडेशनने न्यायालयात विकीपीडियावरील बंदीला आव्हान दिले होते. 

भिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार असला तरी काही प्रकरणांमध्ये त्यावर नियंत्रण आणायला हवे, असे न्यायालयाने विकीपीडियाचे आव्हान फेटाळताना स्पष्ट केले. 

तुर्कस्तानच्या दूरसंचार नियामक संस्थेने गेल्या आठवड्यात विकीपीडियाचे संकेतस्थळ बंद केले. यामागे राष्ट्रीय सुरक्षेला धोका असलेल्या संकेतस्थळांवर कारवाई सुरू असल्याचे कारण देण्यात आले होते. 

विकीपीडियावरील दोन लेखांमध्ये तुर्कस्तानचे मुस्लिम दहशतवादी गटांशी असलेले संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे विकीपीडियावर बंदी घालण्यात आली.