शिवा थापाला सुवर्ण
विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदकाचा मानकरी ठरलेल्या शिवा थापाने लाईटवेट (६० किलो) गटात राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये प्रथमच जेतेपदाचा (सुवर्ण) मान मिळविला. 


राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदकविजेता एल. देवेंद्रो सिंग (५२ किलो) याला अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदाचा मान एसएससीबीने (सेनादल) मिळविला. त्यांच्या बॉक्सर्सनी चार सुवर्ण, चार रौप्य आणि तीन कांस्य पदकांची कमाई केली. 

रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाने (आरएसपीबी) दोन सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्य पदकांसह दुसरे स्थान पटकावले.



बीडब्ल्यूएफची ‘मोस्ट इम्प्रुव्ह्ड प्लेअर’ बनली सिंधू
२०१६ हे वर्ष रजत पदक विजेती पी. व्ही. सिंधूसाठी गोल्डन ईयर ठरले आहे. 

बीडब्ल्यूएफ म्हणजेच बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या पुरस्कार सोहळ्यात सिंधूला ‘मोस्ट इम्प्रुव्हड् प्लेअर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तिला हा पुरस्कार दुबईत झालेल्या रंगतदार सोहळ्यात प्रदान कऱण्यात आला. 

सिंधूने २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये देशासाठी रजत पदक पटकावले. तर चायना ओपन सुपरसिरीज जिंकत तिने आपल्या बॅडमिंटन करिअरमधील पहिल्या सुपरसिरीज खिताबावर आपले नाव कोरले. 



‘युनीसेफ’ची सदिच्छा दूत बनली प्रियांका बनली !
युनीसेफ ग्लोबलची सदिच्छा दूत पिग्गी चॉप्स अर्थात प्रियंका चोप्रा आता झाली आहे. ती मुलांच्या हक्कंविषयी समाजात या माध्यमातून जागरुकता निर्माण करणार आहे. 

राष्ट्रीय पातळीवर प्रियांका युनीसेफसोबत काम करत आहे. युनीसेफची सदिच्छा दूत म्हणून ती काम करत आहे. पण आता ती हेच काम आंतरराष्ट्रीय पातऴीवर नेताना दिसणार आहे. 

‘क्वांटिको स्टार’ने युनीसेफच्या सत्तरीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला  हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचे आयोजन न्यूयॉर्कमध्ये करण्यात आले होते.



देशातील निम्मा ‘एफडीआय’ एकटय़ा महाराष्ट्रात
परकीय गुंतवणूकदारांना नेहमीच आकर्षक वाटणाऱ्या महाराष्ट्रात चालू आर्थिक वर्षांमध्ये थेट परकीय गुंतवणुकीचा (एफडीआय) ओघ आणखीनच वाढला आहे. 

गेल्या संपूर्ण वर्षांमध्ये (२०१५-१६) आलेल्या ‘एफडीआय’ला चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या सहा महिन्यांमध्येच मागे टाकले आहे. या ओघाने महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचे वेगळे सांगण्याची गरज उरली नाही. 

किंबहुना या कालावधीत आख्ख्या देशामध्ये आलेल्या ‘एफडीआय’मध्ये (१,४४,६७४ कोटी) एकटय़ा महाराष्ट्राचा हिस्सा जवळपास निम्मा आहे.

केंद्रीय उद्योग व व्यापार मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या औद्योगिक उत्पादन व प्रोत्साहन खात्याकडून (डीआयपीपी) ‘एफडीआय’च्या गुंतवणुकीचा तपशील जाहीर केला जातो.

‘डीआयपीपी’ने १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या पहिल्या दोन तिमाहीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचे अव्वलस्थान अधिकच झळाळून उठले आहे.

महाराष्ट्रातील ‘एफडीआय’ प्रामुख्याने वित्तीय सेवा, तंत्रज्ञानाधारित सेवा, दूरसंचार, संगणक, व्यापार आणि वाहनउद्योगात आला आहे.



एलईडी दिवे वापरात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
वीज बचतीसाठी ऊर्जा मंत्रालयाने राबविलेल्या एलईडी दिवे वापराच्या उपक्रमात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आला आहेत. तर गुजरात प्रथमस्थानी आहे.

वर्षभरपासून सुरू झालेल्या एलईडी वितरण प्रणालीमध्ये देशात १८ कोटी ३० लाख दिव्यांचे वाटप करण्यात आले. 

राज्यात पुण्याने आघाडी घेतली असून या जिल्ह्यात ३० लाख एलईडी वाटप झाले आहेत.त्यानंतर नागपूरचा क्रमांक लागतो. या जिल्ह्यात १३ लाख एलईडीचे वितरण करण्यात आले.

देशात तिसऱ्या स्थानावर आंध्र प्रदेश, चौथ्या स्थानी राजस्थान, पाचव्या स्थानी उत्तर प्रदेश, सहाव्या स्थानी कर्नाटक आहे.



पंकजचे १६ वे विश्वविजेतेपद
दिग्गज भारतीय खेळाडू पंकज अडवाणी याने आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करताना सिंगापूरच्या पीटर गिलख्रिस्टचे कडवे आव्हान परतावून ११व्या जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेवर कब्जा केला.

विशेष म्हणजे कारकिर्दीतील १६वे विश्वविजेतेपद पटकावताना अडवाणीने अंतिम सामन्यात गिलख्रिस्टला ६-३ असे नमवले.



स्वीडन पैसे मोजून खरेदी करतोय कचरा
स्वीडन या पर्यावरण पूरक देशात सध्या कचर्‍याची चणचण जाणवू लागली असल्याने बाहेरच्या देशातून येथे कचरा आयात केला जात आहे.

पर्यावरण क्षेत्रात अग्रणी मानल्या जाणार्‍या या देशात कचर्‍यापासून उष्णता मिळविण्याचा स्टेट ऑफ द आर्ट प्लांट सुरू केला गेला आहे व यात जमा केलेला कचरा जाळून त्यापासून मिळणारी उष्णता नागरिकांच्या घराघरातून पोहोचविली जाते.

स्वीडनमध्ये थंडीचे दिवस फार कष्टकारक असतात. यासाठी देशाने राष्ट्रीय हिटींग नेटवर्क स्थापन केले आहे. त्यात कचरा जाळून निर्माण होणारी उष्णता पाईपद्वारे घराघरांपर्यंत पोहोचविली जाते व घरे उबदार केली जातात. या एकाच प्रकल्पातून या पद्धतीने शेकडो घरांना उब पुरविली जाते. 

गतवर्षात स्वीडनने फक्त १ टक्का कचरा जमिनीत जिरविला आहे. बाकी कचरा उष्णता निर्माण करण्यासाठी वापरला गेला आहे. आता मात्र येथे कचरा कमी पडू लागल्याने अन्य देशांकडून तो पैसे मोजून आयात केला जात आहे.



चेन्नईला धडकले ‘वरदा’
‘वरदा’ चक्रीवादळ ताशी १२० किलोमीटरच्या वेगाने चेन्नईच्या किनार्‍यावर धडकले असून किनारपट्टीवरील अनेक वृक्ष सोसाट्याच्या वार्‍याने उन्मळून पडली आहेत. 

चेन्नईत ठिकठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. ७००० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे चक्रीवादळाचा कुठलाही धोका निर्माण होऊ नये, यासाठी अणूऊर्जा प्रकल्पात आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे.

तामिळनाडूत आलेल्या चक्रीवादळाला वरदा हे नाव पाकिस्तानने ठेवले.

चक्रीवादळांना नाव देण्याची परंपरा २० व्या शतकापासून सुरु झाली. चक्रीवादळांना एखादं विशिष्ट नाव देण्याचं कारण म्हणजे, चक्रीवादळासंदर्भात दोन देशात माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी मदत होणं हे मुख्य कारणं आहे.

माहितीची देवाण-घेवाण करताना जर एकाच चक्रीवादळाला अनेक नावांनी संबोधले तर घोळ होऊ शकतो. तसेच, अनेक अफवा पसरु शकतात. 

त्यामुळे प्रत्येक देशांने येणा-या चक्रीवादळाला नाव देण्याचं ठरवलं. चक्रीवादळाला नाव देण्याचा करार अटलांटिक क्षेत्रात १९५३ साली झाला.

भारतानं २००४ साली हिंदी महासागरात येणार्‍या वादळाला नाव देऊन या परंपरेला सुरूवात केली.  भारतानं आत्तापर्यंत अग्नि, आकाश, बिजली आणि जल अशी नावं दिली आहेत.

भारताच्या भौगोलिक अथवा सागरी क्षेत्रात निर्माण होणार्‍या चक्रीवादळांना नावं देताना भारतीय हवामान खातं भारतीय उपखंड परिसरातील अन्य देशांच्या वेधशाळांशी संपर्क करते. 

म्हणजेच ओमान, पाकिस्तान, मालदीव, श्रीलंका, बांग्लादेश, म्यानमार, थायलंड इत्यादी देशांशी संपर्क करून सर्वांच्या संमतीनं एखादे नाव निश्चित केलं जातं. 

वरदा या वादळापूर्वी हुडहुड हे वादळ आलं होतं. या वादळाला ओमान या देशानं नाव ठेवलं होतं. त्याआधीच्या वादळाला फायलीन हे नाव थायलंडने दिले होतं.