बढत्यांमधील आरक्षण रद्द
सरकारी कर्मचाऱ्यांना बढत्यांमध्ये सरसकट ३३ टक्के आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा १७ वर्षांपूर्वीचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी अवैध ठरवून रद्दबातल केला.


राज्य सरकारने याबाबतचा निर्णय मे २००४ मध्ये घेतला होता. त्यानुसार भटके-विमुक्त, विशेष मागासवर्गीय आदी प्रवर्गात या बढत्या दिल्या जातात, परंतु न्यायालयाने बढत्यांमध्ये आरक्षणाचा निर्णय आज अवैध ठरवला. तर यापूर्वीच्या अशा बढत्यांमध्येही १२ आठवड्यांत आवश्‍यकतेनुसार बदल करण्याचे आदेशही दिले.

‘मॅट’नेही यापूर्वी राज्य सरकारचे संबंधित परिपत्रक अवैध ठरवले होते. या निर्णयाविरोधात कर्मचारी संघटनांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या.

राज्य सरकार या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. त्यासाठी निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी प्रमुख सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी केल्यानंतर न्यायालयाने आपल्या आदेशाला तीन महिन्यांची स्थगिती दिली



‘जेएनएनयूआरएम’मध्ये महाराष्ट्राची बाजी
केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान अभियानात (जेएनएनयूआरएम) महाराष्ट्राने अन्य राज्यांच्या तुलनेत बाजी मारली आहे. 

या अभियानात मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर आणि कुळगाव-बदलापूरसह राज्यातील पालिकांनी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे राज्याला चालू आर्थिक वर्षात दिलेले लक्ष्य नियोजित वेळेत पूर्ण झाले आहे.

नागरी भागांतील झोपडपट्ट्यांत राहणाऱ्या रहिवाशांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, निवासी वसाहतींचा विकास करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. 




अभिनेता अक्षय कुमार ‘यूपी’चा स्वच्छतादूत
अभिनेता अक्षय कुमारची ‘टॉयलेट एक प्रेम कहाणी’ या चित्रपटाची कथा स्वच्छतेवर आधारित आहे. याची दखल घेत अक्षय कुमारला उत्तर प्रदेशचा स्वच्छतादूत म्हणून नियुक्त केल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी जाहीर केले.



व्यंकय्या नायडू देशाचे नवे उपराष्ट्रपती
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणीत ‘रालोआ’चे उमेदवार व्यंकय्या नायडू यांनी काँग्रेसप्रणित ‘यूपीए’चे उमेदवार गोपाळकृष्ण गांधींचा पराभव केला आहे. महात्मा गांधीजींचे नातू असलेले डॉ. गोपाळकृष्ण गांधी हे पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आहेत. 

व्यंकय्या नायडू यांच्या पारड्यात ५१६ मते पडली असून गोपाळकृष्ण गांधी यांना २४४ मते मिळाली. उपराष्ट्रपतिपदासाठी लोकसभा व राज्यसभेचे खासदार मतदान करीत असतात. या निवडणुकीत ७९० मतदार होते. 

११ ऑगस्टरोजी नायडू यांचा शपथविधी होणार आहे. विद्यमान उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ १ ऑगस्टला संपला आहे.



अर्थतज्ज्ञ राजीव कुमार निती आयोगाचे नवे उपाध्यक्ष
निती आयोगाच्या उपाध्यक्षपदी अर्थतज्ज्ञ डॉ. राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. अरविंद पानगढिया यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारने राजीव कुमार यांना उपाध्यक्षपदावर संधी दिली आहे. तर दिल्लीतील एम्समधील बालरोगतज्ज्ञ डॉ. विनोद पॉल यांची निती आयोगाचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

१ ऑगस्ट रोजी पानगढिया यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. ३१ ऑगस्टरोजी ते आयोगातील पदभार सोडतील. 

डॉ. कुमार हे सध्या ‘सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च’ येथे कार्यरत आहेत. अर्थविषयक पुस्तकांचे लिखाणही त्यांनी केले आहे. याशिवाय ‘फिक्की’चे ते माजी महासचिवदेखील आहेत. 

लखनौ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतले असून २००६ ते २००८ या कालावधीत ते केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्यदेखील होते. एशियन डेव्हलपमेंट बँक, अर्थ आणि उद्योग मंत्रालयातील कामाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. 



बोल्टच्या १०० मीटरची शर्यतीची अखेर ब्राँझने
वेगाचा बादशहा अशी ओळख असलेला जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट याला आपल्या १०० मीटर शर्यतीच्या कारकिर्दीची अखेर ब्राँझपदकाने करावी लागली. अमेरिकेच्या जस्टिन गॅटलीनने सुवर्ण आणि ख्रिस्तीयन कोलोमनने रौप्यपदक पटकाविले.

जागतिक मैदानी स्पर्धेत १०० मीटर शर्यतीची शनिवारी मध्यरात्री अंतिम फेरी पार पडली. १०० मीटर कारकिर्दीची अखेर बोल्ट सुवर्णनेच करतो काय असे सगळ्यांना वाटत होते. मात्र, त्याला अपयश आले आणि ब्राँझवर समाधान मानावे लागले. 

बोल्टने लंडनमध्ये २०१२ च्या ऑलिंपिक स्पर्धेत १०० मीटर शर्यत पार करून जागतिक विक्रम केला होता. आता याच ठिकाणी त्याला कारकिर्दीची अखेर ब्राँझने करावी लागली. 

गॅटलीनने ९.९२ सेकंद आणि कोलोमनने ९.९४ सेकंदात शर्यत पूर्ण करत सुवर्ण व रौप्य मिळविले. तर, बोल्टने ही शर्यत ९.९५ सेकंदात पूर्ण केली. या स्पर्धेत बोल्ट २०० मीटर, ४०० मीटर आणि रिले शर्यतीत धावणार आहे.



पाकिस्तानच्या मंत्रिमंडळात २० वर्षानंतर हिंदू खासदार
पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहिद खान अब्बासी यांच्या मंत्रिमंडळात हिंदू खासदार दर्शन लाल यांचा समावेश करण्यात आला आहे. पाकिस्तानमध्ये २० वर्षांनंतर प्रथमच हिंदू नेत्याची मंत्रिपदी निवड झाली आहे.

नवाज शरीफ यांना ‘पनामा पेपर्स’ प्रकरणातील भ्रष्टाचारामुळे अपात्र ठरविल्यानंतर त्यांना पंतप्रधानपद सोडावे लागले. त्यांनी निकटचे सहकारी शाहिद खान अब्बासी यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली. 
पाकिस्तानचे राष्ट्रपती ममनून हुसेन यांनी एकूण ४७ खासदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. त्यातील १९ राज्यमंत्री आहेत.

पाकिस्तानच्या चारही प्रांतांच्या समन्वयाची जबाबदारी दर्शन लाल यांच्यावर खान यांनी दिली आहे. लाल हे पेशाने डॉक्‍टर आहेत. सध्या सिंध प्रांतात मीरपूर मथेलो शहरात वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. 

२०१३ मध्ये ते पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) पक्षाच्या तिकिटावर अल्पसंख्याक कोट्यातून दुसऱ्यांचा खासदार म्हणून निवडून आले आहेत. 

शरीफ यांच्या मंत्रिमंडळात सुरक्षा व ऊर्जा मंत्रालयाचा कारभार सांभाळणारे ख्वाजा आसिफ यांच्याकडे अब्बासी यांनी परराष्ट्र मंत्रालय सोपविले आहे. पाकिस्तान सरकारमध्ये २०१३ पासून कोणी पूर्णवेळ परराष्ट्रमंत्री नव्हते. हीना रब्बानी खर या तेथील शेवटच्या परराष्ट्रमंत्री होत्या. आता पाकिस्तानला हिंदू मंत्र्याशिवाय परराष्ट्रमंत्रीही मिळाला आहे



पॅरिस हवामान करारातून अमेरिकेची अधिकृत माघार
पॅरिस येथे २०१५ मध्ये मान्य करण्यात आलेल्या हवामान करारातून माघार घेत असल्याचा इरादा अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांना कळवला आहे. 

पॅरिस करारात कायम राहण्याबाबत ट्रम्प यांनी अनेक जागतिक नेत्यांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता पण त्याचा त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही. अमेरिकेने पॅरिस करारातून माघार घेतली हे खरे असले तरी ४ नोव्हेंबर २०२० पर्यंत अमेरिकेला यातून पूर्णपणे माघार घेता येणार नाही. पु

तापमान वाढण्यास कारणीभूत ठरणाऱ्या कार्बन उत्सर्जनात चीननंतर अमेरिकेचा जगात दुसरा क्रमांक आहे. ट्रम्प यांनी पॅरिस हवामान करारातून माघार घेण्याची घोषणा केली तेव्हा त्यांच्यावर टीकेचा भडिमार झाला होता