कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्ष संतोस यांना शांततेसाठी नोबेल

०१. कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष जुआन मॅन्युएल संतोस यांना शांततेसाठीचा ‘नोबेल’ पुरस्कार शुक्रवारी जाहीर करण्यात आला आहे. शांततेसाठीच्या नोबेल पुरस्काराकडे जगभरात अतिशय प्रतिष्ठेने बघितले जाते. 


०२. यंदाच्या पुरस्कारासाठी एकूण ३७६ उमेदवारांची नावे चर्चेत होती. वास्तविक गेल्याच आठवड्यात संतोस यांनी जनमतासाठी ठेवलेला शांततेसाठीचा करार स्थानिक नागरिकांनी फेटाळला होता. तरीही संतोस यांनी समर्पित वृत्तीने केलेल्या कामाबद्दल त्यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात येत असल्याचे समितीने म्हटले आहे. 

०३. ओस्लोमध्ये पत्रकार परिषदेत संतोस यांच्या नावाची भारतीय वेळेनुसार शुक्रवारी दुपारी घोषणा करण्यात आली. देशातील विस्थापितांचे पुनर्वसन आणि नागरी हिंसाचार संपुष्टात आणण्यासाठी संतोस यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नावाची निवड करण्यात आली असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

०४. २०१० मध्ये संतोस यांनी कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतली. गेल्या अनेक वर्षांपासून शांततेसाठी लढा देणाऱ्या कोलंबियातील जनतेच्या पाठिवर दिलेली कौतुकाची थाप म्हणूनही या पुरस्काराकडे बघितले पाहिजे, असेही समितीने म्हटले आहे. 


०५. दक्षिण अमेरिकेत ५२ वर्षांपासून डाव्या विचारांच्या बंडखोर गटामुळे सुरू असलेल्या युद्धाला सँटोस यांच्यामुळे विराम मिळाला. मात्र ही निवड काही प्रमाणात वादग्रस्त ठरली आहे.
०६. कोलंबियन यादवी युद्धात २ लाख २० हजार लोक मरण पावले असून, ६० लाख लोक विस्थापित झाले आहेत. त्यांनी अतिशय कठीण परिस्थितीत हा लढा दिला आहे. त्यांचा सन्मानही या पुरस्काराने झाला आहे. सँटोस यांनी कोलंबिया सरकार व एफएआरसी बंडखोर यांच्यात शांतता करार घडवून आणला होता.



२०१८ पर्यंत भारत पाक सीमा होणार सील 

०१. २०१८ पर्यंत भारत आणि पाकिस्तान सीमारेषा संपूर्णपणे सील करु अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केली आहे. सीमारेषेवरील राज्यांमधील समन्वय वाढवण्यासाठी सेक्यूरिटी ग्रीड सुरु करु असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. याद्वारे राज्याराज्यांमधील सीमा रेषेवरील माहिती जमा केली जाईल आणि याचा फायदा होईल असे सिंह यांनी स्पष्ट केले.

०२. पाकिस्तानला लागून असलेल्या चार राज्यांचे मुख्यमंत्री आणि सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांसह भारत- पाकिस्तान सीमेवरील सुरक्षाविषयक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी जैसलमेरमध्ये आले होते. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडल्यावर राजनाथ सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.



हैतीमध्ये ‘मॅथ्यू’ चक्रीवादळाचा कहर 
०१. कॅरेबियन देश हैतीमध्ये मॅथ्यू चक्रीवादळाने मोठा कहर केला आहे. या वादळाने किमान  ९०० लोकांचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मॅथ्यू वादळाने संपूर्ण हैती शहर उद्ध्वस्त केले आहे. वादळामुळे हैतीमधील दक्षिण किनारपट्टीवरील रोश ए बातेऊ शहरात सुमारे ५० लोक दगावले आहेत.
०२. दरम्यान अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यात मॅथ्यू वादळ येण्याची शक्यता असल्यामुळे अध्यक्ष बराक ओबामा यांनी फ्लोरिडासाठी आणीबाणीची घोषणा केली आहे.

०३. हैतीच्या दक्षिण आणि पश्चिम भागाचा संपर्क तुटला आहे. कॅरेबियन देशात मागील एक दशकातील हे सर्वात विध्वंसक व शक्तिशाली वादळ असल्याचे सांगितले जाते. हैती आणि क्यूबामध्ये आपला परिणाम दाखवून या वादळाने बहामास द्वीपसमुहाकडे आगेकूच केली आहे.

०४. हैतीच्या दक्षिणेकडील एक शहर पूर्णपणे उदध्वस्त झाले आहे. या शहरात सुमारे २३ लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. गुरूवारी दुर्गम भागात सरकारी अधिकारी पोहोचल्यानंतर मृतांचा आकडा शंभरच्या वर गेला आहे.







प्रचारासाठी सार्वजनिक निधीचा वापर बंद
०१. प्रचारासाठी सार्वजनिक निधीचा वापर केल्यास राजकीय पक्षांची मान्यता रद्द  करण्याचे आदेश आयोगाने दिले आहे.

०२. भविष्यात कोणत्याही राजकीय पक्षाला स्वत:च्या प्रचारासाठी सार्वजनिक निधी, सार्वजनिक जागा अथवा सरकारी साधनांचा वापर करता येणार नाही, असे स्पष्ट आदेश शनिवारी निवडणूक आयोगाने दिले. या आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधित पक्षाची मान्यता रद्द करण्यात येईल, अशा इशाराही निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे.




गुजरातमधून पाकिस्तानला होणारी भाजी निर्यात बंद
०१. गुजरातमधील शेतक-यांनी पाकिस्तानला टोमॅटो आणि मिर्चीची होणारी निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतक-यांचे दिवसाला तीन कोटी रुपयांचा नुकसान होणार आहे.उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. 

०२. या पार्श्वभूमीवर गुजरातमधील शेतमालाचा व्यापार करणा-या संघटनेचे सचिव अहमद टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाले, गुजरातमधून दररोज सुमारे ५० ट्रक टोमॅटो आणि मिर्चीची पाकिस्तानला निर्यात होते. वाघा सीमारेषेवरुन हा भाजीपाला पाकिस्तानमध्ये पाठवला जातो. पण सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे दोन दिवसांपासून हा भाजीपाला पाठवणे बंद केल्याचे त्यांनी सांगितले. 


०३. १९९७ नंतर पहिल्यांदाच गुजरातमधील शेतक-यांनी पाकिस्तानला भाजीपाला पाठवणे बंद केले आहे. दोन्ही देशांचे संबंध पूर्ववत होईपर्यंत आम्ही भाजीपाला पाठवणार नाही असे पटेल यांनी स्पष्ट केले.



नवीन संशोधनानुसार मानवाचे सरासरी वय १२५ वर्षे
०१. मानवाचा जगण्याचा जास्तीत-जास्त कालावधी १२५ वर्षांपर्यंत असू शकते, असे नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे १२५ वर्षांपेक्षा अधिक जगणे अशक्य असल्याचेही संशोधकांनी स्पष्ट केले आहे.अमेरिकेतील अल्बर्ट आइन्स्टाइन वैद्यकीय महाविद्यालयातील अभ्यासकांनी हे संशोधन मांडले आहे. 

०२. १९व्या शतकापासून सरासरी आयुर्मान उंचावले असून संतुलित आहार, हवामान आणि उपचारांच्या सोयींमुळेच हे शक्य झाल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. मानवाच्या जगण्याचा सर्वाधिक कालावधी १२५ वर्षे असून मानवाने तो टप्पा गाठल्याचेही संशोधकांनी स्पष्ट केले. 

०३. १९९०मध्ये मानवाने १२५ वर्षांचा टप्पा गाठला. संशोधकांनी ४० देशांतील मानवी मृत्यूदराच्या आकडेवारीचा त्याचप्रमाणे लोकसंख्येचा अभ्यास केला.
०४. १९०० व्या वर्षांपासून या देशांतील आयुर्मानात चढउतार पहायला मिळतात. त्यानुसार मानवाचे सरासरी आयुर्मान ७० वर्षे किंवा त्यापेक्षा थोडे अधिक असे होते. त्यानंतर या सरासरी आयुर्मानात वाढ होत गेल्याचे अभ्यासात स्पष्ट झाले. 

०५. याच कालावधीत जीवनमान उंचावल्यामुळे आयुर्मानही उंचावले आणि मानवाचे आयुर्मान १०० पेक्षा अधिक झाले. त्यानंतर पुन्हा वेगाने आयुर्मानात घट झाल्याचेही पाहायला मिळाले. 

०६. त्यानंतर संशोधकांनी १९६८ ते २००६ या कालावधीतील ११० किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या अमेरिका, फ्रान्स, जपान आणि इंग्लंड या देशांतील नागरिकांवर लक्ष केंद्रित केले. या नागरिकांचे आयुर्मान १९७० ते १९९० या कालावधीत वाढल्याचे संशोधकांच्या लक्षात आले. त्याचप्रमाणे फ्रान्समधील एका महिलेचे वयाच्या १२२व्या वर्षी निधन झाल्यामुळे संशोधकांनी मानवाचा जगण्याचा अधिकाधिक कालावधी १२५ असल्याचा निष्कर्ष काढला.


ब्रिटनच्या पंतप्रधान पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर
०१. ब्रिटनच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्यानंतर थेरेसा मे या पुढील महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. राजधानी नवी दिल्लीमध्ये पुढील महिन्यात ७ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत ‘भारत-ब्रिटन टेक-समिट‘ होणार आहे. याच कालावधीमध्ये थेरेसा मे भारतात येण्याची शक्‍यता आहे. 

०२. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ब्रिटन दौऱ्यात केलेल्या घोषणांमध्ये या द्विपक्षीय तंत्रज्ञानविषयक चर्चासत्राचाही समावेश होता. 

०३. जूनमध्ये झालेल्या ‘ब्रेक्‍झिट‘विषयीच्या मतदानानंतर ब्रिटनने युरोपीय समुदायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी राजीनामा दिला. यानंतर थेरेसा मे यांनी पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली. 

०४. ‘युरोपीय समुदायाबाहेरील ब्रिटनचा विश्‍वासार्ह मित्र‘ अशा शब्दांत थेरेसा मे यांनी भारताचे वर्णन केले होते. ब्रिटनबरोबर मुक्त व्यापार करार करण्यासाठी भारतासह कॅनडा, चीन, मेक्‍सिको, सिंगापूर आणि दक्षिण कोरियाने उत्सुकता दर्शविली आहे. तसेच, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाबरोबरही हे करार करण्याची सुरवातही झाली आहे.