शशिकला घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
जयललिता यांच्या निधनानंतर एआयएडीएमकेमध्ये कोणाचे वर्चस्व असणार याचे उत्तर अखेर मिळाले आहे. जयललिता यांच्या निकटवर्तीय आणि पक्षाच्या महासचिव शशिकला नटराजन यांच्याकडे पक्षाची आणि मुख्यमंत्रीपदाची सूत्र सोपवण्यात आली आहेत. 


रविवारी शशिकला नटराजन यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली असून यामुळे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा शशिकला यांचा मार्ग मोकळा झाला आहे. तामिळनाडूचे विद्यमान मुख्यमंत्री ओ.पन्नीरसेल्वम यांनीदेखील मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

जयललिता यांचे ५ डिसेंबर रोजी निधन झाले होते. जयललिता यांच्या निधनापासून मुख्यमंत्रीपदासाठी शशिकला यांचे नाव चर्चेत होते. पण शशिकला यांच्याऐवजी ओ.पन्नीरसेल्वम मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. 



३ लाखांच्यावर रोकड स्वीकारणाऱ्यास १०० टक्के दंड
रोकड व्यवहार पूर्णपणे थांबवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार कठोर पावले उचलणार आहे. ३ लाखांपुढील सर्व व्यवहारांवर केंद्र सरकार १०० टक्के दंड लावणार आहे. १ एप्रिलपासून हा नवा नियम लागू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

जर तुम्ही ४ लाख रुपयांचा व्यवहार केला तर तुम्हाला ४ लाख रुपये दंड बसेल आणि जर समजा तुम्ही ५० लाखांचा व्यवहार केला तर ५० लाखांचा दंड भरावा लागेल असे महसूल सचिव हसमुख अधिया यांनी म्हटले आहे. 

२ लाख रुपयांच्यावर व्यवहार करणाऱ्यांना पॅन कार्ड नंबर देणे आवश्यक आहे असे ते म्हणाले. अर्थसंकल्प २०१७-१८ मध्ये अरुण जेटलींनी आयकर कायद्यामध्ये कलम २६९ एसटी ही तरतूद टाकण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. 

बॅंक आणि सरकारी कामासाठी हे निर्बंध नसतील असे त्यांनी स्पष्ट केले. जी व्यक्ती ही रक्कम स्वीकारेल त्या व्यक्तीलाच दंडाची रक्कम भरावी लागणार असल्याची तरतूद आहे असे त्यांनी सांगितले. 

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने दिलेल्या अहवालात ५०,००० च्या वर रोख व्यवहार करण्यासाठी निर्बंध असावेत अशी सूचना करण्यात आली होती.



भारतातील उत्तेजक सेवनाच्या प्रकरणांमध्ये घट
जागतिक स्तरावर उत्तेजक प्रकरणे मोठय़ा प्रमाणावर आढळली जात असली तरी भारतात अशा अनिष्ट प्रवृत्तींवर योग्य नियंत्रण मिळवले असल्याचा दावा राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक समितीने (नाडा) केला आहे.

‘नाडा’ संस्थेने पत्रकात म्हटले आहे की, गतवर्षी १५१ चाचण्या घेण्यात आल्या. २०१५मध्ये १४८ चाचण्या घेण्यात आल्या होत्या. 

उत्तेजक घटनांबाबत २०१४मध्ये जागतिक स्तरावर भारताचा तिसरा क्रमांक होता. त्या वेळी भारतात उत्तेजकाच्या ९५ घटना घडल्या होत्या. २०१५ मध्ये भारतास दुसरे स्थान होते. त्या वेळी १२० खेळाडूंवर उत्तेजकाची कारवाई झाली होती. गतवर्षी ही संख्या ७३पर्यंत खाली आणण्यात ‘नाडा’ संस्थेस यश मिळाले आहे. 



अरुणाचलमधील तवांगपर्यंत धावणार भारतीय रेल्वे
भारतीय रेल्वे आता एक नवीन शिखर गाठण्यासाठी सज्ज झाली आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये भारत चीन सीमारेषेजवळ असलेल्या तवांगपर्यंत रेल्वे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पुढील वर्षांपासून या मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरु होणार आहे.


अरुणाचल प्रदेशमधील तवांग हा भाग सुमारे १० हजार फूट उंचावर असून सीमा रेषेवरील भाग असल्याने हा भाग देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. या भागात रेल्वे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी पूर्वोत्तर रेल्वेच्या अधिका-यांची टीम कामाला लागली आहे. 

या रेल्वे प्रकल्पासाठी सुमारे ५० ते ७० हजार कोटी रुपये ऐवढा खर्च अपेक्षित आहे.

भालूकपूंग ते तवांग हा पट्टा आमच्यासाठी सर्वात कठीण असेल. या भागातील उंची ५०० फूटांवरुन थेट नऊ हजार फूटांवर पोहोचते याकडेही रेल्वेच्या अधिका-यांनी लक्ष वेधले. 

सैन्याच्या मदतीने सीमारेषा भागातही रेल्वे पोहोचवण्याचा प्रयत्न केले जात आहेत. आता प्रत्यक्षात तवांगपर्यंत रेल्वे कधी पोहोचणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.



आता वन डेतही सुपर ओव्हर
ट्वेन्टी-२० सारख्या झटपट क्रिकेट सामन्यात टाय झाल्यास आयसीसीचा ‘सुपर ओव्हर’चा थरार आता वन डेतही अनुभवता येणार आहे. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत यंदा सुपर ओव्हर खेळविण्यात येणार आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम फेरीतील सामन्यासाठी सुपर ओव्हरचा पर्याय उपलब्ध असल्याचे आयसीसीने जाहीर केल्याचे वृत्त आहे. 

दुबईमध्ये झालेल्या आयसीसीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. स्पर्धेसाठीच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले असून उपांत्य आणि अंतिम फेरीत सामना टाय झाल्यास सुपर ओव्हर खेळविण्यासाठीची मान्यता आयसीसीने दिली आहे.

वन डेमध्ये आजवर एकदाही सुपर ओव्हर खेळविण्यात आलेली नाही.

महिला क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा यंदा इंग्लंडमध्ये खेळविण्यात येणार आहे. याशिवाय, महिला विश्वचषक स्पर्धेसाठी डीआरएस पद्धत देखील उपलब्ध असणार आहे. यापुढील काळात पुरूष आणि महिला अशा दोन्ही ट्वेन्टी-२० स्पर्धांसाठी देखील डीआरएस प्रणालीला मान्यता दिली आहे.



भारताला ज्युनिअर स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद
अव्वल मानांकित भारतीय संघाने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना अंतिम सामन्यात मलेशियाला २-० असे पराजित करून ज्युनिअर स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत मुलांचे विजेतेपद पटकावले. 

एकतर्फी झालेल्या या लढतीत भारताने मलेशियाला पुनरागमनाची फारशी संधी दिली नाही. भारताच्या मुलांच्या संघाने दुसऱ्यांदा या स्पर्धेत बाजी मारली आहे. 

तसेच याआधी २०११ साली भारताच्या मुलांनी येथे जेतेपद उंचावले होते. कोलंबो येथे झालेल्या स्पर्धेत भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धक्का देत आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. 

आशियाई वैयक्तिक आणि ब्रिटिश ज्युनिअर ओपन विजेत्या सेंथिलकुमारने मलेशियाचा व्दितीय मानांकित ओंग साई हुनला धक्का देत भारताचे विजेतेपद निश्चित केले.



चीनचे मध्यम पल्ल्यांच्या अण्वस्त्रांचे लष्करी कवायतीमध्ये प्रदर्शन
चीनने नुकताच तयार केलेल्या रॉकेट फोर्सने आपल्या अण्वस्त्राचे प्रदर्शन केले आहे. लष्करी कवायतीदरम्यान त्यांच्याकडे मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र असल्याचे लक्षात आले. या क्षेपणास्त्राचे नाव डी-एफ १६ असे आहे. डी-एफ १६ चा पल्ला १,००० किमी आहे. 

आपल्या शस्त्रास्त्रांबाबत चीन नेहमी गुप्तता पाळतो परंतु यावेळी मात्र त्यांनी डीएफ-१६ चा व्हिडिओ माध्यमांना दिला आहे. क्षेपणास्त्रांच्या व्यवस्थापनासाठी नुकताच चीनने रॉकेट फोर्सची स्थापना केली आहे. वसंत उत्सवादरम्यान झालेल्या कवायतीमध्ये त्यांनी आपल्या क्षेपणास्त्रांचे प्रदर्शन घडवले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पद स्वीकारल्यापासून चीनमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. ट्रम्प यांच्यावर निशाणा साधण्याची एकही संधी चीनी वृत्तपत्रे सोडत नाहीत. दक्षिण चीनी समुद्राच्या मुद्दावरुन असणाऱ्या मतभेदांमुळे चीन आणि अमेरिकेमध्ये संघर्ष होऊ शकतात त्याच तयारीचा भाग म्हणून देखील चीनने आपली शक्ती प्रदर्शित केली असावी असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 



ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लिमांच्या प्रवेश बंदीबाबत जारी केलेल्या आदेशाला सियाटलचे जिल्हा न्यायाधीश जेम्स रोबार्ट यांनी देशव्यापी हंगामी स्थगिती दिली आहे. 


सात मुस्लिम बहुल देशांतील मुस्लिमांना अमेरिकेत येण्यास बंदी घालणारा वादग्रस्त आदेश ट्रम्प यांनी जारी केला होता. रोबार्ट यांनी त्यावर हंगामी स्थगिती आणणारा आदेश जारी केला असून तो वॉशिंग्टनचे महाधिवक्ता बॉब फर्ग्युसन हे या प्रवेश बंदीच्या आदेशाचा पूर्ण आढावा घेत नाहीत तोपर्यंत लागू राहील. 

दरम्यान यावर व्हाईट हाऊसने सांगितले की, संघराज्य न्यायाधीशांच्या निकालास आव्हान दिले जाईल. न्याय खाते त्यावर स्थगिती आदेश मिळवेल कारण ट्रम्प यांचा आदेश कायदेशीर व योग्य आहे. 



गुगल ठरला जगातील सर्वात लोकप्रिय ब्रॅंड
गुगलने प्रतिस्पर्धी टेक्नॉलॉजी कंपनी अॅपलला मागे टाकत जगातील सर्वात लोकप्रिय ब्रॅंड म्हणून आपले नाव कोरले आहे. 

ब्रॅंड फायनान्स या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार २०१७ मध्ये गुगल सर्वात विश्वासार्ह आणि मौल्यवान ब्रॅंड बनला आहे. 

ब्रॅंड फायनान्सनुसार गुगलची किंमत १०९.४ अब्ज डॉलर (७१९४ अब्ज कोटी रुपये) आहे. वर्ष २०११ पासून अॅपल एक नंबरवर विराजमान होता. मात्र, यंदा गुगलने हे स्थान काबीज केले. आकड्यांनुसार गुगलने मागील वर्षीच्या तुलनेत गुगलने २४ टक्क्यांनी वाढ मिळवली आहे. 

अॅपलची ब्रॅंड व्हॅल्यू १४५ अब्ज डॉलर होती यावर्षी ती १०७ अब्ज डॉलर इतकी झाली आहे. गेल्या वर्षी आयफोन ७ आणि ७ प्लस लाँन्च करुनही अॅपलची ब्रॅंड व्हॅल्यू कमी झाली. 

तसेच या सर्वेक्षणानुसार, तिसऱ्या स्थानावर अॅमेझॉन आहे, चौथ्या स्थानावर अॅटी अॅंड टी आहे, पाचव्या स्थानावर मायक्रोसॉफ्ट आणि सहाव्या स्थानावर सॅमसंग आहे.



व्दितीय राणी एलिझाबेथ यांची सफायर ज्युबिली
ब्रिटिश राजवटीत सफायर ज्युबिली (६५ वर्ष) पूर्ण करण्याचा मान राणी एलिझाबेथ व्दितीय यांना मिळाला आहे. इतक्‍या दीर्घ कालावधीसाठी सिंहासनावर राहण्याचा आणि राणीचा मुकुट मिरविण्याचा बहुमान मिळविलेल्या त्या जगातील पहिल्याच राणी ठरल्या आहेत.

नोरफोल्क येथील सॅण्ड्रिगहॅम इस्टेट या त्यांच्या निवासस्थानी खासगीरीत्या सफायर ज्युबिलीचा कार्यक्रम साजरा झाला. याचे औचित्य साधून बकिंगहॅम पॅलेसतर्फे राणींचे नीलम या मौल्यवान खड्यांचे दागिने घातलेले छायाचित्र पुन्हा जारी करण्यात आले. 

२०१४ मध्ये प्रसिद्ध छायाचित्रकार डेव्हिड बेली यांनी हे छायाचित्र काढले होते. त्या वेळी ब्रिटनला जगभरात नेण्यासाठी राबविलेल्या एका मोहिमेसाठी हे छायाचित्र काढण्यात आले होते. या चित्रात राणी एलिझाबेथ व्दितीय यांनी घातलेला हा नीलम खड्यांचा निळ्या रंगांचा हार त्यांचे पती किंग जॉर्ज सहावे यांनी १९४७ मध्ये त्यांना लग्नाच्या वाढदिवसाची भेट म्हणून दिला होता.

तसेच या दिवशी ६ फेब्रुवारी १९५२ ला राणी एलिझाबेथ व्दितीय यांचे वडील पंचम जॉर्ज यांचा मृत्यू झाला होता. या झालेल्या विशेष कार्यक्रमात ग्रीन पार्क येथे अश्‍व तोफखाना विभागाने ४१ तोफांची सलामी दिली, तर तोफखाना विभागाने ६२ तोफांची सलामी दिली. या कार्यक्रमाप्रसंगी निळ्या रंगाचे पाच पौंडच्या टपाल तिकिटाचेही अनावरण करण्यात आले.

राणींची पूर्ण नाव ‘एलिझाबेथ ऍलेक्‍झांडर मेरी’ असे आहे. त्यांचा जन्म २१ एप्रिल १९२६ रोजी जन्म स्थळ लंडन येथे झाले.
तसेच त्यांची सत्ता कालावधी ६ फेब्रुवारी १९५२ ते आजपर्यंत आहे. त्यांचा राज्याभिषेक २ जून १९५३ रोजी झाला.