प्रेरणादायी ‘कलाम स्मारका’चे मोदींकडून अनावरण
दिवंगत माजी राष्ट्रपती ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभालेल्या स्मारकाचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलाम यांच्या दुसऱ्या स्मृतीदिनी केले. कलाम २००२ ते २००७ या काळात भारताचे राष्ट्रपती होते.


कलाम यांच्या पैकरांबु या मूळ गावी येथे हे स्मारक बांधले आहे. या स्मारकाचे प्रवेशद्वार इंडिया गेटच्या धर्तीवर तयार केले आहे. स्मारकाच्या मागील भागात राष्ट्रपती भवनाच्या प्रतिमा उभारली आहे. 


लष्कराच्या संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) व केंद्र सरकारच्या अन्य खात्यांनी हे वैशिष्टपूर्ण स्मृतीस्थळ बांधण्यासाठी पुढाकार घेतला होता. तमिळनाडू सरकारने पैकरांबु येथे दिलेल्या जमिनीवर हे स्मारक १५ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे. 

‘विविधतेत एकता’ या संकल्पनेवर हे स्मारक उभारले आहे. अब्दुल कलाम यांनी शास्त्रज्ञ म्हणून केलेल्या कार्याच्या सन्मानार्थ या स्मारकात ‘अग्नी’ क्षेपणास्त्र आणि अंतराळ यानाच्या प्रतिमा उभारण्यात आल्या आहेत. 
तसेच डॉ.कलाम यांचा वीणा वाजवितानाच्या रूपातील पुतळ्याचे अनावरणही त्यांनी केले. असून यात कलाम यांचा ब्रॉंझचा पुतळा व शास्त्रज्ञ व राष्ट्रपती काळातील त्यांची ९०० चित्रे व २०० दुर्मिळ छायाचित्रे लावण्यात आली आहेत



नितीश कुमार सहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री
लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला धक्का देत महाआघाडीतून अचानक बाहेर पडत नितीश कुमार यांनी भाजपच्या पाठिंब्यावर पुन्हा एकदा म्हणजेच सहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 

पाटणा राजभवनात पार पडलेल्या शपथविधी समारंभात नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री व सुशीलकुमार मोदी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.



अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांसाठी नवा लोगोदिवसेंदिवस बोगस डॉक्टरांचे प्रमाण वाढते आहे. याचा फटका बर्‍याच रुग्णांना बसत आहे. या बोगस डॉक्टरांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशननेही पुढाकार घेतला आहे. 

अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने नवा लोगो तयार केला आहे. लवकरच हा नवा लोगो डॉक्टरांच्या क्लिनिकवर दिसेल.
 या नव्या लोगोच्या डिझाइनमध्ये रंग, अक्षर, आकार ठरवून दिलेला आहे. त्यामुळे लोकांना सहज अ‍ॅलोपॅथी डॉक्टर्स ओळखता येतील.

देशभरातील डॉक्टरांना त्यांच्या लेटरहेड आणि क्लिनिकच्या बाहेरील बोर्डावर हा नवा लोगो लावण्यासाठी बंधनकारक असणार आहे. हा लोगो केवळ अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांकरिता आहे. यामुळे बोगस डॉक्टरांना आळा घालता येईल.



२०२१ सालच्या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे आयोजकत्व भारताकडे
२०२१ सालच्या पुरुषांच्या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे आयोजकत्व प्रथमच भारताकडे सोपवण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटना (AIBA) आंतरराष्ट्रीय पातळीवर मुष्टियुद्ध स्पर्धा आयोजित करीत आहे. १९७४ सालापासून दर दोन वर्षांनी वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित केली जात आहे.



जेफ बेझोस ठरले जगात सर्वांत श्रीमंत
जगातील श्रीमंताच्या यादीत ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी पहिले स्थान पटकावले आहे. त्यांनी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्‌स यांना मागे टाकले आहे. ब्लूम्बर्ग आणि फोर्ब्स या माध्यम संस्थांनी अब्जाधीशांची यादी जाहीर केली आहे. 


ऍमेझॉन कंपनीच्या समभागात मागील चार महिन्यांत सुमारे २४ टक्के वाढ झाली आहे. बेझोस यांची एकूण संपत्ती ९०.५ अब्ज डॉलर आहे.

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्‌स हे अब्जाधीशांच्या यादीत मे २०१३ पासून अग्रस्थानी होते. त्यांच्यानंतर बेझोस यांचा क्रमांक लागत होता. आता बेझोस यांनी गेट्‌स यांना मागे टाकले आहे. गेट्‌स यांची एकूण संपत्ती ९० अब्ज डॉलर आहे. 

बेझोस हे ऍमेझॉनचे सहसंस्थापक असून, कंपनीचे १७ टक्के समभाग त्यांच्याकडे आहेत. बेझोस यांची सर्वांत मोठी गुंतवणूक ऍमेझॉनमध्ये असून, त्यांच्या मालकीची ब्लू ओरिजिन ही खासगी अवकाश संस्था आहे. वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राची मालकीही त्यांच्याकडेच आहे. 

फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, गेट्‌स हे यादीत मागील चार वर्षे प्रथम होते. यादी सुरू झाल्यापासून २२ पैकी १८ वर्षे गेट्‌स यांनी यादीत पहिले स्थान कायम ठेवले होते. 

मेक्‍सिको दूरसंचार क्षेत्रातील आघाडीचे उद्योजक कार्लोस स्लिम २०१० ते २०१३ या काळात यादीत पहिले स्थान पटकावत गेट्‌स यांना मागे टाकले होते



अमेरिकेने रशिया, इराण, उत्तर कोरियावर निर्बंध लादले
अमेरिका आणि त्याच्या मित्र देशांचे हित धोक्यात आणल्याचा आणि भांडखोर कृत्ये केल्याचा आरोप करीत अमेरिकेने रशिया, इराण आणि उत्तर कोरियावर निर्बंध लादले आहेत.

तसेच हे निर्बंध अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत लुडबुड केल्याबद्दल रशियावर आणि त्याने युक्रेन व सीरियावर केलेल्या लष्करी आक्रमणाबद्दल आहेत. 

दहशतवादाला सतत पाठिंबा दिल्याबद्दल इराणवर निर्बंध घातले आहेत. 



विशेष माहिती : डॉकलाम क्षेत्र भारत-चीन सीमाक्षेत्रामधील दशकापासून विवादित प्रदेशात चीनने उंच पर्वतीय रस्ता बांधण्यासाठी आपल्या सैन्यांसह बुलडोजर आणि उत्खनन करणारी उपकरणे पाठवलेली आहेत.

भूटान, भारत आणि चीन यांच्या सीमेलगत असलेल्या डॉकलाम पठार क्षेत्रातून चीनी लष्करी बांधकाम चमूला परत पाठविण्याकरिता गेल्या महिन्यात भारताने आपली सैन्य तुकडी पाठवली होती.

या तणावग्रस्त परिस्थितीत भारताने शांतीप्रस्ताव मान्य केला होता, मात्र दोन्ही पक्षांनी आपापले सैन्य मागे घेण्याची मागणी केली होती. मात्र त्याच्या सार्वभौम प्रदेशावर रस्ता बांधण्यास भारताने अटकाव करू नये असे चीनने इशारा दिला.

भूटान, भारत आणि चीन यांच्या सीमेलगत डॉकलाम पठार क्षेत्र आहे. हे क्षेत्र भूतपूर्व भूटानमध्ये २६९ चौरस कि.मी. क्षेत्रफळात पसरलेले आहे. भारतासाठी हे डॉकलाम पठार हे दुर्गम पूर्वोत्तर राज्यांना जोडणारा जमिनी मार्ग असल्याने त्या क्षेत्रावर नियंत्रण राखणे भारताला आवश्यक आहे.

२०१२ साली भारत आणि चीन यांच्यात एक करार झाला. ज्यामध्ये डॉकलाम क्षेत्रामधील या दोन्ही देशांच्या क्षेत्राची स्थिती ही केवळ सर्व पक्षांच्या संयुक्त चर्चासत्रातूनच निश्चित केले जाईल असे निश्चित केले गेले.

या क्षेत्राच्या डोकोला शहरापासून ते झोम्पेलरी येथील भुटानी सैन्याच्या छावणीपर्यंत रस्ता बांधण्याचा चीनी सरकारचा मानस आहे.

भूटानच्या परराष्ट्र मंत्रालयाने असे स्पष्ट मत मांडले आहे की, अपूर्ण वाटाघाटी असलेल्या प्रलंबित क्षेत्रामध्ये एकतर्फी कारवाई करणे हे कृत्य सन १९८८ आणि सन १९९८ मध्ये झालेल्या शांतता कराराचे “थेट उल्लंघन” आहे.