विवेक देबरॉय यांची आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना केली असून नीति आयोगाचे सदस्य विवेक देबरॉय यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 


पंतप्रधानांनी स्थापन केलेल्या या ५ सदस्यीय आर्थिक सल्लागार परिषदेत प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. 
आर्थिक सल्लागार परिषदेचे मुख्य कार्य हे पंतप्रधान यांना विविध आर्थिक प्रकरणांमध्ये सल्ला देणे हे असेल. 

देबरॉय यांच्याशिवाय डॉ. सुरजित भल्ला, डॉ. रथिन रॉय आणि डॉ. आशिमा गोयल यांनाही अर्धवेळ सदस्य करण्यात आले आहे. त्याचबरोबर नीति आयोगाचे सदस्य सचिव रतन वाटल यांना परिषदेचे प्रधान सल्लागार म्हणून नेमण्यात आले आहे.



एसबीआयकडून ‘मिनिमम बॅलन्स’ची मर्यादा शिथिल
भारतीय स्टेट बँक अर्थात एसबीआयने मुख्य शहरांमधील शाखांसाठी एक चांगले पाऊल उचलले आहे. किमान मासिक शिल्लक (Monthly Average Balance) रकमेची मर्यादा एसबीआयने ५ हजारांवरून ३ हजारांवर आणली आहे. 

तसेच किमान शिल्लक ठेवता न आल्यास आकारण्यात येणारे शुल्कही कमी करण्यात आले आहे.
‘सेमी अर्बन’ शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात हे शुल्क २० ते ४० रूपये असेल. तर मुख्य शहरांमध्ये हे शुल्क ३० ते ५० रुपये असणार आहे. 

पेन्शनर, सरकारी योजनांचा लाभ घेणारे खातेदार आणि अल्पवयीन खातेदारांना मिनिमम बॅलन्स ठेवण्याचे कोणतेही बंधन ठेवण्यात आले नाही.




ISRO च्या मंगळ मोहिमेला तीन वर्ष पूर्ण झालेत
ISRO ने नियोजित केलेल्या मार्स ऑरबिटर मिशन (MOM) ला मंगळाच्या परिभ्रमण कक्षेत तीन वर्षे पूर्ण झालेली आहेत. लाल ग्रह म्हणून ओळखल्या जाणार्‍या मंगळ ग्रहावरची ही मोहीम ISRO ची तुलनेने कमी खर्चाची मोहीम ठरलेली आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने २४ सप्टेंबर २०१४ रोजी MOM उपग्रहाला (मंगलयान) यशस्वीरित्या मंगळाच्या परिभ्रमण कक्षेत ठेवले. ५ नोव्हेंबर २०१३ रोजी आंध्रप्रदेशातल्या श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावरून उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला होता. 

यासोबतच मंगळावर पोहचणारा भारत हा आशिया खंडातला तसेच पहिल्याच प्रयत्नात पोहचणारा पहिला देश ठरलेला आहे.



कांडला बंदराचे नवे नाव आता दिनदयाल बंदर
गुजरातमधील कांडला बंदराचे नाव बदलून पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या नावाने ‘दिनदयाल बंदर’ असे करण्यात आले आहे. २५ सप्टेंबर २०१७ पासून हे नाव प्रभावी करण्यात आले आहे.

भारतीय बंदर अधिनियम १९०८ अंतर्गत केंद्र शासनाला बंदराचे नाव बदलण्याचा अधिकार मिळतो.

गुजरातमधील दिनदयाल (पूर्वीचे कांडला) बंदर हे भारतामधील १२ सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक आहे. सन १९३१ मध्ये महाराव खेंगर्जी यांनी समुद्रात लहान धक्का बांधून या बंदराच्या कार्यास सुरूवात केली. 


वित्तीय वर्ष २०१५-१६ मध्ये १०० दशलक्ष टन वजनाची मालवाहतूक हाताळून या बंदराने इतिहास घडवला आणि यासोबतच हा इतिहास घडवणारे कच्छच्या प्रदेशात स्थित आणि पश्चिम किनारपट्टीवरील प्रमुख बंदरांपैकी एक असे हे बंदर भारतातले सर्वात पहिले बंदर ठरले.







मुंबईत ‘INS तारासा’ जहाज भारतीय नौदलात सामील
२६ सप्टेंबर २०१७ रोजी ‘INS तारासा’ हे वॉटर जेट FAC जहाज भारतीय नौदलात सामील करण्यात आले. या जहाजाचे तळ मुंबईमध्ये असेल. ‘INS तारासा’ पश्चिमी नौदलाच्या आदेशाखाली असेल आणि ले. कमांडंट प्रविण कुमार या जहाजाचे कप्तान असतील

गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजीनियर्स (GRSE), कोलकाता द्वारा निर्मित हे जहाज नौदलाच्या वॉटर जेट फास्ट अटॅक क्राफ्ट (FAC) श्रेणीमधील (INS तारमुगली, तिहायु, तिलांचांग यानंतर) चौथे आणि शेवटचे आहे.

‘INS तारासा’ जहाजाची लांबी ५० मीटर असून तीन वॉटर जेटच्या सहाय्याने जहाज ३५ नॉट इतका कमाल वेग गाठू शकते. जहाज ३० मिमी स्वदेशी बनावटीची मुख्य तोफ तसेच हलक्या, मध्यम आणि अवजड मशीनगने सुसज्जित आहे. जहाज मदत व बचावकार्य, मानवतावादी कार्ये आदींसाठी योग्य आहे.



जागतिक पर्यटन दिवस: २७ सप्टेंबर 
दरवर्षी २७ सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिवस साजरा केला जातो. जगभरात पर्यटन क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने सन १९८० पासून संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने हा दिवस साजरा करीत आहे.

या वर्षी ‘सस्टेनेबल टूरिजम – ए टूल फॉर डेवलपमेंट’ (
विकासासाठी शाश्वत पर्यटनाचे आंतरराष्ट्रीय वर्ष) या संकल्पनेखाली हा दिवस साजरा केला जात आहे. या वर्षी या दिवसाचे आयोजकत्व दोहा (कतार) कडे देण्यात आले आहे. 

याचा उद्देश पर्यटन आणि त्याचे सामाजिक, सांस्कृतिक, राजनैतिक व आर्थिक मूल्यांच्या संदर्भात जागतिक पातळीवर समुदायांमध्ये जागृती निर्माण करणे. तसेच पर्यटनाला प्रोत्साहन देणे आणि पर्यटनाच्या माध्यमातून देशांना उत्पन्न वाढविण्यास प्रोत्साहन देणे हा आहे.

हे क्षेत्र जगाच्या सकल स्थानिक उत्पादनात अंदाजे १०% चे योगदान देते आणि जागतिक स्तरावर १० पैकी १ या प्रमाणात हे क्षेत्र रोजगार प्रदान करते. अंदाज आहे की, सन २०३० पर्यंत दरवर्षी ३.३% दराने पर्यटन क्षेत्राची वाढ होईल.

भारत जगातल्या पाच शीर्ष पर्यटक ठिकाणांपैकी एक आहे. भारतीय पर्यटन विभागाने सप्टेंबर २००२ मध्ये ‘अतुल्य भारत’ नावाने एक राष्ट्रीय अभियान सुरू केले. या अभियानाचा उद्देश म्हणजे भारतीय पर्यटनाला वैश्विक मंचावर चालना देणे. या अभियानांतर्गत हिमालय, वन्य जीव, योग आणि आयुर्वेद वर आंतरराष्ट्रीय समूहांचे लक्ष खेचले गेले.

सन १९७० च्या २७ सप्टेंबर या तारखेला संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक पर्यटन संघटनाचे (UNWTO) संविधान स्वीकारले गेले होते. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ २७ सप्टेंबरला हा दिवस साजरा केला जातो. जागतिक पर्यटन दिवसाचा रंग निळा आहे.